Banana  Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Sunburn : उष्णतेमुळे खानदेशातील केळीपट्टा होरपळला

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात केळी पट्टा उष्णता व उष्ण वाऱ्यांमुळे होरपळला आहे. बागांची ३० ते ३५ टक्के हानी यात झाली असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. लहान व निसवलेल्या अशा सर्वच केळी बागांना या उष्णतेचा फटका बसत आहे.

खानदेशात मृग बहर व कांदेबाग केळी बागा आहेत. यात मृग बहर बागांची लागवड मागील वर्षी मे ते जुलै या कालावधीत झाली होती. तर कांदेबाग केळीची लागवड मागील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत झाली आहे. यात कांदेबाग केळी पीक सात ते पाच महिन्यांचे आहे. तर मृग बहर बागांत घड पक्व झाले आहेत. काही उशिराच्या बागांत निसवण १०० टक्के झाली आहे. या सर्वच बागांना उष्णतेचा फटका बसत आहे.

कारण केळी पीक ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानात तग धरत नाही. सिंचन, खत व्यवस्थापन काटेकोरपणे करूनही अति उष्णतेत बागांची हानी होते. त्यात निसवलेल्या व काढणीवरील बागांत झाडे मोडून पडणे, घड सटकून खाली पडणे अशा समस्या वाढल्या आहेत.

जे झाड मोडून पडते किंवा ज्याचा घड सटकून पडतो, ते झाड पुन्हा उत्पादन देत नाही. संबंधित झाडाचे १०० टक्के नुकसान होते. यात मध्येच वेगाचा वारा असतो. यातही बागांची हानी होत आहे. कारण सध्या रात्रीपर्यंत उष्ण झळा असतात. सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत तापमान अधिक असते.

खानदेशात मागील महिनाभरापासून कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. एप्रिलमध्ये सात दिवस कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. या महिन्यातही कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिले आहे. यामुळे बागांची वाढ खुंटून मोठी हानी झाली आहे. खानदेशात कांदेबाग व मृग बहर केळीची मिळून सुमारे ६२ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.

या सर्वच बागांत मिळून ३० ते ३५ टक्के नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. केळी बागांचे नुकसान रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव, पाचोरा-भडगाव, चाळीसगाव, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा आदी भागात झाली आहे. एकीकडे उष्णतेचा फटका आहे. दुसरीकडे कमी दरांमुळेही केळी उत्पादांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे केळी पट्ट्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

उपायही पडताहेत अपुरे

अनेक शेतकऱ्यांनी उष्णतेपासून बचावासाठी बागांभोवती वारा अवरोधक म्हणून हिरवी नेट लावली आहे. काहींनी नैसर्गिक वारा अवरोधक म्हणून बागांच्या पश्‍चिम व दक्षिणेला उंच वाढणाऱ्या गवताची लागवड केली आहे. परंतु अशातही बागांत उष्ण वारा शिरत आहे. कारण कमाल तापमान मागील २० ते २५ दिवसांपासून ४१ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे.

मी ऑक्टोबर २०२३ मध्ये केळीची लागवड केली आहे. सात हजार केळीझाडे आहेत. मागील अनेक दिवस कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिकही राहिले आहे. दुसरीकडे पाण्याची गरज पिकास अधिक आहे. विजेचा लपंडाव असतो. उष्णतेच्या समस्येवरील उपाययोजना करूनही अपयश येत आहे.
- अजय पाटील, केळी उत्पादक, रूखनखेडा, (ता. चोपडा, जि. जळगाव)
केळी पीक हे अति उष्णतेत तग धरत नाही. पिकाच्या संरक्षणासाठी नैसर्गिक वारा अवरोधक, काटेकोर पाणी व्यवस्थापन या बाबतच्या शिफारशी, सूचना आहेत. त्यांचा अवलंब केलेल्या केळी उत्पादकांना उष्णतेची समस्या दूर करण्यास बऱ्यापैकी आधार मिळत आहे.
- डॉ. चंद्रशेखर पुजारी, प्रमुख, केळी संशोधन केंद्र, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT