Raju Shetti Agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetti : शेतीमालाचे दर पडतात तेव्हा सरकार झोपा काढते का?

Agriculture Commodity Rate : आज दर वाढले म्हणून ग्राहकांसाठी सरकार खरेदीसाठी उतरले. मात्र अशा पद्धतीने टोमॅटोचे दर पाडण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला.

Team Agrowon

Nashik News : खरेतर शेतीमालाचे दर नियंत्रणात आणण्याचा सरकारला कुठलाही अधिकार नाही. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोचे दर पडल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकला. त्या वेळी जर सरकारने शेतकऱ्यांचा टोमॅटो खरेदी करून आधार दिला असता, तर दर नियंत्रणात आणण्याचा नैतिक अधिकार राहिला असता.

मात्र त्या वेळी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. आज दर वाढले म्हणून ग्राहकांसाठी सरकार खरेदीसाठी उतरले. मात्र अशा पद्धतीने टोमॅटोचे दर पाडण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला. शेतीमालाचे दर पडतात तेव्हा सरकार झोपा काढते का? असा रोखठोक सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला केला.

शेट्टी गुरुवारी (ता. २०) नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे, ज्येष्ठ नेते साहेबराव मोरे, कुबेर जाधव आदी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, की टोमॅटो महाग झाला म्हणून कोणी मरत नाही. त्यास पर्यायी भाजीपाला ग्राहकांनी खरेदी करावा. ज्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी ५० पैसे, एक रुपये प्रति किलोने टोमॅटो विकला. त्याचा ग्राहकांनीसुद्धा विचार केला आहे, असे परखड मत या वेळी त्यांनी मांडले.

नाशिक जिल्हा बँकेसंबंधी ते म्हणाले, की स्वतः बिऱ्हाड आंदोलन पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर केले होते. त्या वेळी लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले गेले. राष्ट्रीय बँकेप्रमाणे एकवेळ समझोता योजना आणू, असे सहकारमंत्र्यांनी सांगितले. मात्र काहीच झाले नाही. राजकीय नेत्यांनी बँक लुटली ते नामनिराळे झाले; मात्र ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून कष्टाने शेतीमाल पिकवला त्याला व्यापाऱ्याने फसवले.

दर मिळाले नाहीत, आता त्या शेतकऱ्याच्या जमिनी लिलावात निघत आहेत. ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे. राज्य सरकारला वेळोवेळी याची जाणीव करून दिली आहे. आता सरकारने अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेला १ हजार कोटी दहा वर्षांकरिता द्यावेत त्यातून ही बँक सुरळीत होईल, असे राज्य सरकारला सूचवल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्याला मत द्यावे

राज्यात अनेक पक्ष शेतकऱ्यांच्या बाबतीत भुलभुलय्या करत आहेत. १० वर्षांपूर्वी काही लोक गुजरात पॅटर्न घेऊन राज्यात आले होते. त्यांनी शेतीमालाच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली. तर २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचे सांगितले.

मात्र तो भुलभुलय्या ठरला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही; मात्र कर्ज दुप्पट झाले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर असे कोणी घोषणा घेऊन येत असतील तर ते तपासले पाहिजे. तरच शेतकऱ्यांनी विश्वास ठेवावा. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्याला मत दिले पाहिजे, असे आवाहन शेट्टी यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT