interculture Operation in kharif crop? Agrowon
ताज्या बातम्या

Interculture Operation : पाऊस थांबेना, आंतरमशागत होइना

Kharif Season : खानदेशात गिरणा पट्ट्यात पावसाने उघडीप दिल्याने आंतरमशागत आटोपत आली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात गिरणा पट्ट्यात पावसाने उघडीप दिल्याने आंतरमशागत आटोपत आली आहे. परंतु सातपुडालगत व इतर भागात पाऊस रोजच येत आहे. यामुळे वाफसा स्थिती होत नसल्याने आंतरमशागत, तणनियंत्रणाची कामे मागील १५ ते १८ दिवसांपासून ठप्पच आहेत.

तण वाढत आहे. तणनाशकांचाही उपयोग किंवा प्रभाव पिकात होताना दिसत नाही. उडीद. मूग, कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, ऊस, केळी या सर्वच पिकांत सर्रास तणनाशकांचा उपयोग शेतकरी करीत आहेत.

तणनाशकांचा उपयोग यंदा वाढल्याने यावरील खर्च व उलाढालही मोठी आहे. कृषी निविष्टींच्या बाजारात संप्रेरके, कीडनाशके याऐवजी तणनाशकांची विक्री अधिक आहे. सोयाबीनमध्ये मोठ्या पानांचे तण नष्ट करणाऱ्या तणनाशकांचा तुटवडा जळगाव, चोपडा, यावल व इतर भागात आहे.

गिरणा पट्ट्यात चाळीसगाव, भडगाव व पारोळा आदी क्षेत्रात कमी पाऊस आहे. या भागात पीकस्थिती बरी आहे. पावसाची अपेक्षा, प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. परंतु पावसाने उघडीप दिल्याने चाळीसगाव लगत पिकांत तणनियंत्रण, आंतरमशागत वेगात झाली.

परंतु एरंडोल, धरणगाव, अमळनेर, चोपडा, यावल, जळगाव, भुसावळ, जामनेर, धुळ्यातील साक्री, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील काही भाग, तळोदा, नवापूर भागात रोजच पाऊस येत आहे. पाच ते १० मिनीटे हलका पाऊस येतो.

किंवा सकाळीच भुरभूर पाऊस हजेरी लावतो. यामुळे शेतीकामे किंवा मजुरांकरवी तणनियंत्रण, बैलांकरवी आंतरमशागत करणे अशक्य झाले आहे. तणनाशकांचा उपयोग करूनही तण नष्ट होत नसल्याची स्थिती आहे.

कारण तणनाशके एका मर्यादेपर्यंतच तण नष्ट करतात. मोठे, मोठ्या पानांचे तण नष्ट होत नाही. त्याची फक्त पाने पिवळी होतात. पुन्हा ते काही दिवसात हिरवे होत आहे. यामुळे कापूस, तूर आदींमध्ये तण नष्ट करण्यासाठी केलेला तणनाशकांवरील अनेकांचा खर्च वाया गेल्यात जमा आहे.

तणांमुळे गवत वाढत आहे. यामुळे पाने खाणाऱ्या अळ्या व इतर किडीही वाढत आहेत. सकाळपासून पावसाळी वातावरण असते. सूर्यदर्शन मागील अनेक दिवसांपासून झालेले नाही. कोरड्या, सूर्यप्रकाशात वातावरणाची गरज आहे. त्याशिवाय तणांचा अटकाव व मशागत करणे शक्य नाही. अन्यथा पिकांची मोठी हानी तणांमुळे व वाफसा नसल्याने होईल.

पिके पिवळी, लाल पडू लागली

अनेक शेतांमध्ये काळ्या कसदार जमिनीतील सखल भागात पाणी साचले आहे. हे पाणी तसेच आहे. यात कापूस, सोयाबीन व इतर पिके पिवळी, लाल होऊन नुकसान होत आहे. ही नुकसान पातळीदेखील मोठी आहे. चोपडा, जळगाव, धरणगाव, यावल आदी भागात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ही समस्या आहे. यामुळे पीकहानी वाढेल, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT