जगामध्ये भारत आल्याच्या उत्पादनात अग्रेसर आहे. भारतातून आल्याची पन्नासपेक्षा जास्त देशात निर्यात केली जाते. विशेषतः मध्य पूर्व देशांत मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. आजच्या भागात आपण आसाममधील ‘जीआय’ मिळालेल्या ‘कार्बी अँगलोंग आले’ या नावाने प्रचलित असलेल्या आल्याविषयी जाणून घेऊयात.
भारत देश जागतिक पातळीवर मसाल्याच्या उत्पादनामध्ये अग्रेसर मानला जातो. भारतामध्ये हळद, लवंग, वेलची, मिरी, वेलदोडा, जायफळ, दालचिनी, आले इ. मसाला पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी आले सकाळी बनणाऱ्या चहापासून ते खाण्याच्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरले जाते. या पिकाची ओडीसा, केरळ, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, मेघालय, अरुणाचल प्रदेश तसेच आसाम आणि महाराष्ट्रातही लागवड केली जाते. आल्याचे आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे.
कार्बी अँगलोंग या जिल्ह्यामध्ये आल्याची पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने लागवड केली जाते. साधारणपणे मार्च-एप्रिल या कालावधीत या पिकाची लागवड केली जाते. हे पीक नऊ ते दहा महिन्यांत पूर्णपणे तयार होते. येथील शेतकरी आल्याच्या लागवडीसाठी झूम (Jhum System) पद्धतीचा वापर करतात. उत्तर पूर्वीय क्षेत्रीय कृषी विपणन निगम लिमिटेड यांच्या अभ्यासानुसार कार्बी अँगलोंग या जिल्ह्यात सुमारे पाच हजाराहून अधिक शेतकरी या आल्याची लागवड करतात. त्यातून वर्षाकाठी सुमारे ४०,००० मेट्रिक टन एवढे उत्पन्न मिळते. कार्बी अँगलोंग हे आले काही बाबतीत इतर अल्यांपेक्षा खास आहे. नाडीया आणि आयझोल या दोन वाणांच्या आल्याची लागवड या जिल्ह्यामध्ये केली जाते. या दोन्ही वाणांच्या खोडाचा आकार वेगवेगळा आहे. नाडीया या वाणाच्या खोडाचा आकार मध्यम तर आयझोल वाणाच्या खोडाचा आकार मोठा असतो. आर्द्रतेचे प्रमाण ८-१२ टक्के व १०-१५ टक्के इतके असते. अल्कोहोलचे प्रमाण पाच ते सात टक्के इतके आहे. क्रूड फायबरचे प्रमाण ५.४ टक्के इतके आहे. आसाम राज्यातील गुवाहाटी येथील उत्तर पूर्वीय क्षेत्रीय कृषी विपणन निगम लिमिटेड या संस्थेने २९ ऑगस्ट २०१३ मध्ये भौगोलिक मानांकन नोंदणीसाठी अर्ज सादर केला होता. तब्बल एक वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर या आल्याचे वेगळेपण सिद्ध करण्यात या संस्थेला यश आले आणि जीआय रजिस्ट्रीने या वैशिष्ट्यपूर्ण आल्याचे वेगळेपण मान्य करून ते २५ नोव्हेंबर २०१४ रोजी जर्नल क्रमांक ६२ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर चार महिन्यांचा आक्षेप घेण्याचा कालावधी संपल्यानंतर जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स (रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन) ॲक्ट १९९९ नुसार २५ मार्च २०१५ रोजी जीआय प्रमाणपत्र देण्यात आले. नुकत्याच वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या बातमीमध्ये भारतातून मसाल्याची निर्यात वाढल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. बँकॉक येथील थायफेक्स या जागतिक फूड प्रदर्शनात अमेरिकन कंपन्यांनी आकाराने मोठे असलेले आले प्रदर्शनात ठेवले होते. पण त्याच्या नैसर्गिक गुणधर्माची पडताळणी आसामच्या या जीआय मिळालेल्या आल्याशी केली तर आपले हे भारतीय आले श्रेष्ठ ठरू शकते. भारत सरकारच्या स्पाइस बोर्ड ऑफ इंडियाने या आल्याला जीआय लावून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळविण्यास आग्रही केले आहे. पारंपरिक पद्धतीने अाल्याची लागवड
आसाममधील कार्बी अँगलोंग या जिल्ह्यामध्ये पारंपरिक पद्धतीने आल्याचे उत्पादन घेतले जाते. येथील हवामान आणि माती कार्बी अँगलोंग आल्याच्या लागवडीसाठी पोषक आहे. उत्तर पूर्वीय क्षेत्रीय कृषी विपणन निगम लिमिटेड याच्या अभ्यासानुसार सुमारे १९५१ पासून या भागात या आल्याची लागवड केली जाते. कार्बी अँगलोंग हे आले औषधी गुणधर्म युक्त आहे. शिवाय या आल्यामुळे पदार्थाला विशेष चवही येते. शेती जीआयचा संबंध नैसर्गिक वातावरणाशी असतो. कार्बी अँगलोंग या जिल्ह्यामध्ये आले पिकाची योग्य वाढ होण्यासाठी पोषक वातावरण आहे. या जिल्ह्यात वर्षभरात सरासरी ११२१ मी. मी. इतका पाऊस पडतो. येथील हवामान उबदार, दमट असून योग्य पाण्याचा योग्य निचरा होणारी माती येथे आहे. वालुकामय व लाल चिकणमाती, सामुचे (पी.एच) प्रमाण साधारणतः ६ ते ६.५ इतके आहे. आल्याच्या योग्य वाढीसाठी येथील तापमानाचे प्रमाण १९ अंश सेल्सिअस ते २८ अंश सेल्सिअस तर हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ७० ते ९० टक्के फायदेशीर ठरते. अासाममध्ये कार्बी अँगलोंग आल्याची पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने लागवड केली जाते. संपर्क ः गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ (लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)