फळछाटणीनंतर ७ ते १० दिवसांचा कालावधी फार महत्त्वाचा असतो. या वेळी घड जिरण्याची समस्या दिसून येते. ज्या बागेत फळछाटणी होऊन आता प्रिब्लुम अवस्था आहे, अशा बागेत जर कॅनॉपी वाढली असेल तर फळकुजीची समस्या जास्त प्रमाणात दिसून येईल. लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास येत्या आठवड्यात पाऊस पडण्याची संभावना कमी राहील. अशा परिस्थितीमध्ये वातावरणात आर्द्रता काही दिवस ७० टक्यांच्या पेक्षा जास्त राहील. त्याचसोबत तापमानसुद्धा वाढताना दिसून येईल. हे वातावरण वेलीच्या वाढीकरिता पोषक असले तरी वाढत्या आर्द्रतेमुळे बागेत काही अडचणी निर्माण होतील. काही भागांत अजूनही फळछाटणी संपलेली नसल्यामुळे या वातावरणात फळकूज, घड जिरण्याची समस्या व डाउनी मिल्ड्युचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
फळछाटणीनंतर ७ ते १० दिवसांचा कालावधी फार महत्त्वाचा असतो. या अवस्थेला ‘पोंगा अवस्था’ असे म्हणतात. या वेळी घड जिरण्याची समस्या आढळून येते. या कालावधीत पाऊस होऊन मुळातील परिसरात पाणी जमा झाल्यास मुळी कार्य करणे कमी करते. याच मुळीद्वारे सायटोकायनीनचे उत्पादन होऊन वर वेलीस पुरवठा केला जातो. या वेलीमध्ये जर सायटोकायनीन जास्त असेल तरच वाढ नियंत्रणात राहते. रूट टिपच्या मागील भागात असलेल्या मुळीच्या काही भागामधून अन्नद्रव्य ओढून घेण्याची क्षमता असते; परंतु मुळाच्या भोवती पाणी जमा असल्यास वेलीस नत्राचा पुरवठा शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वातावरणात जास्त प्रमाणात आर्द्रता असते, तेव्हा पानांद्वारे हवेतून नत्र उचलले जाते. वेलीमध्ये वाढ होण्यास मदत करते. जेव्हा सायटोकायनीनचे उत्पादन कमी होते, तेव्हा जिबरेलीन्स वाढते, म्हणजेच शेंडावाढ (अपाईकल ग्रोथ) जास्त प्रमाणात होते. परिणामी संजीवकांचे वेलीमध्ये संतुलन बिघडते. घड जिरण्याची समस्या निर्माण होते. मुळाच्या भोवतील वातावरण कोरडे राहील याची काळजी घ्यावी. पाऊस झाला असल्यास ६ बीए (१० पीपीएम)ची फवारणी करावी. यामुळे फुटत असलेल्या डोळ्यामध्ये संजीवकांचे संतुलन राहील. डोळा फुटत असताना पोटॅश १ ते १.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काही बुरशीनाशके ज्यांचा कमी प्रमाणात वापर केल्यास वेलीमध्ये जीए३ ची पातळी कमी करण्यास मदत करते. यासाठी टेट्राकोनॅझोल ०.७ मि.लि. प्रतिलिटर किंवा मायक्लोबुटानील ०.४ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात वापर करून रोगनियंत्रण व वाढनियंत्रण शक्य होतील. फळकूज आणि रोगांचा प्रादुर्भाव :
ज्या बागेत फळछाटणी होऊन आता प्रिब्लुम अवस्था आहे, अशा बागेत जर कॅनॉपी वाढली असेल तर फळकुजीची समस्या जास्त प्रमाणात दिसून येईल. वाढत्या आर्द्रतेमध्ये डाउनी मिल्ड्युचा प्रादुर्भाव दिसतो. लवकर फळछाटणी झालेल्या बागेमध्ये प्रिब्लुम अवस्थेत जेव्हा पाऊस पडला असेल आणि अचानक आर्द्रता वाढली असल्यास (तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत व आर्द्रता ८० टक्यांच्या पुढे) जिवाणूजन्य करपा(झॅन्थोमोनस) रोगाची समस्या दिसेल. नाजूक घडावर जेव्हा पाऊस पडतो, त्या वेळी फुलाचा दांडा सडतो, त्यानंतर कुज सुरू होते. या वातावरणात बागेमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू शकतो. या कालावधीमध्ये आपण बुरशीनाशकांची फवारणी करत असतो. त्यामुळेसुद्धा पान तसेच घडावर ताण दिसतो. याचसोबत, वेलीवर या विपरित परिस्थितीमुळे ताण बसतो. पुन्हा कुज होण्यास किंवा घड जळल्यासारखा दिसण्यास सुरवात होते. कोवळ्या फुटींवर पावसाळी वातावरणात अँथ्रॅक्नोजचा प्रादुर्भाव दिसून येतो. सुरवातीच्या काळात करपा नियंत्रणाकरिता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्यानेच फवारणीचे उपाय करावेत. जर बागेत जास्त प्रमाणात आर्द्रता असल्यास ट्रायकोडर्मा ५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करता येईल; परंतु कॉपरयुक्त बुरशीनाशकाची फवारणी यावेळी टाळावी. जैविक नियंत्रणाचा वापर केल्या जातो, तेव्हा बागेत कॅनॉपीवर २ ते ३ फवारण्या लागोपाठ घ्याव्यात. जमिनीतूनसुद्धा ठिबक सिंचनाद्वारे उपलब्ध केल्यास त्याचे परिणाम चांगले मिळतील. कॅनॉपी मोकळी राहील याची काळजी घ्यावी. कारण बागेमध्ये रोगांची मुख्य समस्या म्हणजे दाट कॅनॉपी हेच असते. संपर्क : डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६० राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे