कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचे नियोजन करताना उत्पादनवाढीच्या दृष्टीने विविध सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी सध्याच्या पावसाच्या पाण्याचे नियोजन महत्त्वाचे आहे.
अवर्षण प्रवण क्षेत्रात जून-जुलै मध्ये पाऊस सुरु होतो.जुलै-ऑगस्ट मध्ये पावसाचे प्रमाण घटते. सप्टेंबर महिन्यात १५० ते २०० मि.मी.पाऊस पडतो.ऑक्टोबरच्या मध्यानंतर पाऊस पूर्णपणे थांबतो म्हणून या भागातील ७० टक्के क्षेत्र रब्बी पिकाखाली असते. त्यापैकी ८० टक्के क्षेत्रावर शेतकरी रब्बी ज्वारीची पेरणी करतात.
रब्बी हंगामातील पिकांसाठी ओलावा साठविण्याच्यादृष्टीने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब जमिनीत, जिरवणे, मुरविणे आणि साठविणे अत्यावश्यक आहे. सपाट वाफे
कोरडवाहू शेतीमध्ये जेथे पाणी मुरण्याचा वेग जास्त आहे, फारसा उतार नाही अशा ठिकाणी उताराला आडवे वाफे तयार करावेत.वाफे तयार करताना प्रथम कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर बळीराम नांगराने उभे-आडवे ६ मीटर X ६ मीटर अंतरावर उतारास आडवे सपाट वाफे तयार करावेत. वरंब्याची उंची २० ते ३० सें.मी. ठेवावी. या पद्धतीचे वाफे जागोजागी पाणी मुरविण्यास मदत करतात. त्यामुळे नेहमीपेक्षा ५० टक्के जास्त ओल साठवली जाते. यामुळे रब्बी ज्वारीचे हेक्टरी उत्पादन २ ते ३ क्विंटलने वाढते. मध्यम ते भारी जमिनीत खरीप हंगामात बळीराम नांगराने उतारास आडवे तास घालावेत. त्यामुळे सऱ्या तयार होतात. पडणाऱ्या पावसाचे पाणी सऱ्या मधून जमिनीत मुरते. या पद्धतीत ८० टक्क्यापर्यंत पाणी जमिनीत मुरते. सऱ्यांची लांबी ९० मीटर पर्यंत ठेवावी. या पद्धतीमुळे उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ होते. मुख्य वरंबे उतारास आडवे ठेवावेत. बंदिस्त वरंबे उताराच्या दिशेने ठेवावेत.अशा रीतीने उताराला आडवे बंदिस्त सरी वरंबे तयार होतात. मुख्य वरंब्याची लांबी ६ मीटर आणि उंची ३० सें.मी.ठेवावी. बंदिस्त वरंब्याची उंची २० सेंमी. आणि दोन वरंब्यातील अंतर ३ मीटर ठेवावे. या पद्धतीत जास्त पाऊस पडला तरी बंदिस्त वरंबे फुटून संथ गतीने पाणी शेतातून बाहेर जाते. ही पद्धत कोरडवाहू भागात चोपण व क्षारयुक्त जमिनीत पाणी मुरविण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे जमिनीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण कमी होते. समपातळीत उतारास आडवे मातीचे बांध टाकण्याऐवजी अंजन, खस गवत आणि सुबाभूळ लागवड करावी. गवताचे ठोंब किंवा बी समपातळीत उताराला आडवे दोन ओळीत पावसाळ्याच्या सुरुवातीस लावावे. दोन ओळीत ३० सेंमी अंतर ठेवावे. दोन रोपातील अंतर १५ ते २० सेंमी ठेवावे. जैविक बांधामुळे वाहून जाणाऱ्या पाण्यास अडथळा निर्माण होऊन पाण्याचा वेग कमी केला जातो. जमिनीची धूप कमी होते. गवती बांधामुळे जनावरांना चारा मिळतो. सुबाभूळीच्या जैविक बांधाची उंची ३० सेंमी ठेवून कापलेल्या कोवळ्या फांद्याचा जनावरांना वैरण म्हणून किंवा जमिनीत गाडल्यास हिरवळीचे खत म्हणून उपयोग होतो. कोवळ्या फांद्या कापून टाकल्यास त्याचा धूप प्रतिबंधक म्हणून उपयोग होतो व सेंद्रिय कर्बाचे प्रमाणही वाढते.त्याद्वारे प्रती हेक्टरी २५ ते ५० किलो नत्राची बचत होते. जैविक बांधामुळे पीक उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ होते. जमिनीचे सपाटीकरण, नांगरणी, कुळवणी, कोळपणी यासारख्या मशागती व पेरणी समपातळीत पण उताराच्या आडव्या दिशेने कराव्यात. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो.पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. कोळपणी व खुरपणीमुळे जमीन भुसभुशीत होते. जमिनीतील भेगांमधून बाष्पीभवनाद्वारे होणाऱ्या पाण्याचा ऱ्हास कमी होतो.ओलावा जास्त काळ साठविला जातो. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब जमिनीत मुरवावा. नांगरट झाल्यानंतर शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.त्यानंतर कुळवाच्या पाळ्या देऊन शेतातील काडी कचरा, धसकटे वेचून शेत स्वच्छ करावे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी जमिनीच्या उतारावर वाफे तयार (३.६० X ३.६० चौ.मी. आकार) करावेत. वाफे तयार करताना सारा यंत्राने सारे करून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार होतात. वाफे रब्बी ज्वारीच्या पेरणीपूर्वी ४५ दिवस अगोदर करावेत. म्हणजे १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर हा काळ रब्बी ज्वारीच्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये पेरणी करण्यासाठी शिफारस आहे. १५ सप्टेंबर पूर्वी ४५ दिवस म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाफे तयार करावेत. पेरणीपूर्वी जेवढा पाऊस पडेल तेवढा त्यामध्ये जिरवावा. पेरणीच्या वेळी वाफे मोडून पेरणी करावी. पुन्हा सारा यंत्राच्या सहाय्याने सारे पडून आडवे दंड पडावेत म्हणजे पेरणीनंतर पाऊस पडल्यानंतर तो अडवून जिरवता येते. या तंत्राने रब्बी ज्वारीचे ३०ते ३५ टक्के उत्पादन वाढते. - डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ (एकात्मिक शेती पद्धती,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)