मृग बहराच्या संत्रा फळांची काढणी पूर्ण करावी. त्यानंतर बागेस हलके पाणी द्यावे.संत्रा, मोसंबी फळझाडांच्या आळ्यात पाला-पाचोळ्याचे जाड आच्छादन करावे. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.
मृग बहराच्या संत्रा फळांची काढणी पूर्ण करावी. त्यानंतर बागेस हलके पाणी द्यावे. वाळलेल्या फांद्या (सल) करवतीने कापाव्या. कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट (१ किलो कळीचा चुना + १ किलो मोरचूद + १० लिटर पाणी) लावावा. झाडांवर कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. संत्रा झाडांवर आंबिया बहराची फळे वाटाण्याएवढी झाल्यावर झाडांना वयानुसार खताची मात्रा द्यावी. १० वर्ष किवा त्यापेक्षा जास्त वयाचे झाडांना ५०० ग्रॅम नत्र (१.२५० किलो युरिया) देऊन ओलीत करावे. खते झाडाच्या बुंध्याजवळ न देता दुपारी १२ वाजता झाडाची सावली पडते, त्या भागात बांगडी पद्धतीने द्यावीत. संत्रा, मोसंबी फळझाडांच्या आळ्यात पाला-पाचोळ्याचे जाड आच्छादन करावे. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. हस्त बहार लिंबू बागेस नियमित ओलीत करावे. फळांच्या आकार वाढीसाठी मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (०:५२:३४) ५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. पानांवर व फळांवर खैऱ्या रोगाचे डाग दिसत असतील तर, कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* १ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. केळी घडांची उत्कृष्ठ गुणवत्ता मिळण्यासाठी केळी घड स्कर्टिंग बॅगने झाकावेत. वेलवर्गीय भाजीपाला पिकावर भुरी रोगाची सुरुवात दिसताच, डिनोकॅप ०.५ मिली प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. टरबूज पिकास फळे पक्वतेच्या अवस्थेत जास्त पाणी देऊ नये, अन्यथा फळे तडकण्याची शक्यता असते. फळे तडकत असतील तर बोरॉन १ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. कांदा पिकावर फुलकिडे व करपा रोग आढळताच क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) १.२ मिलि अधिक मॅंकोझेब २.५ ग्रॅम अधिक स्टीकर १ मिलि प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. गॅलेर्डिया आणि मोगरा फुलपिकांना लागवडीनंतर १ महिन्याने अनुक्रमे हेक्टरी ५० व ६० किलो नत्र द्यावे आणिओलीत करावे. हळद काढून झाल्यावर जेठे/मातृ कंद पुढील लागवडीसाठी वेगळे करून व्यवस्थित थंड जागी सावलीत साठवावेत. बेणे साठविण्यापूर्वी त्यावर क्विनॉलफॉस १.५ मिलि अधिक कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. नंतर बेणे व्यवस्थित साठवावे. केळी बाग तणमुक्त ठेवावी. मुख्य खोडालगतची पिले धारदार विळीने जमिनीलगत कापावी. कापलेली पिले व तणांचा खोडाजवळ आच्छादन म्हणून वापर करावा.खोडाभोवती लोंबकळणारी रोगविरहित वाळलेली पाने अथवा पिवळी पाने कापू नये. या पानांमुळे खोडाचे उष्ण हवेपासून संरक्षण होते. केळी घड पक्वतेच्या अवस्थेतील मृग बागेस सिंचनाच्या पाण्यातून खत द्यावे. हजार झाडांसाठी प्रती आठवडा ५.५ किलो युरिया, ७ किलो पोटॅश ठिबक सिंचनातून द्यावा. भेंडीच्या परभणी क्रांती, अर्का अनामिका, अकोला बहार या जातींचे एकरी ४ किलो बियाणे पेरावे. बियाणे सपाट वाफ्यात ४५ बाय ३० सेमी अंतरावर टोकावे. नवीन लागवड केलेल्या फळझाडांना आळ्यात वाळलेल्या पाला-पाचोळ्याचे आच्छादन करावे. तसेच तुराट्या किंवा शेडनेटच्या साह्याने सावली करावी. गावरान बोरींच्या झाडांची जमिनीपासून १ ते २ फुटावर छाटणी करावी. ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये नवीन धुमाऱ्यावर सुधारित जातीचे डोळे भरता येतील. - गजानन तुपकर, ८२७५४१२०६४ (विषय विशेषज्ञ - उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, अकोला.)