सूर्यफूल पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८ दिवसांच्या अंतराने द्याव्यात. रोपावस्था व कळीची अवस्था, बोंडे लागणे, फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. पिकाची निंदणी करून पीक तणविरहित व स्वच्छ ठेवावे.
सूर्यफूल पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८ दिवसांच्या अंतराने द्याव्यात. रोपावस्था व कळीची अवस्था, बोंडे लागणे, फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. पिकाची निंदणी करून पीक तणविरहित व स्वच्छ ठेवावे. सूर्यफूल पिकात दाणे न भरण्याची समस्या आढळते. पिकामध्ये दाणे अधिक प्रमाणात भरण्यासाठी पीक फुलावर असताना तळहाताला पातळ कपडा बांधून सकाळी ८ ते १० वाजेच्या दरम्यान फुलावरून हात फिरवावा किंवा एक फूल दुसऱ्या फुलावर हळूवार घासावे. उन्हाळी भुईमुगास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८ दिवसांच्या अंतराने नियमित द्याव्यात. पिकास आऱ्या लागण्यापूर्वी कोळप्यास दोरी बांधून शेवटची कोळपणी करावी. त्यामुळे भुईमुगाच्या झाडास मातीची भर लागेल. कोळपणीमुळे झाडाच्या आऱ्या भरपूर प्रमाणात जमिनीत खोलवर जातील व शेंगाही चांगल्या पोसल्या जातील. आऱ्या लागण्याच्या अवस्थेपासून पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. लोहाची कमतरता आढळल्यास फेरस सल्फेट ५ टक्के (५० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीच्या पऱ्हाट्या शेतात राहिल्या असतील तर एप्रिल महिन्यात उपटून त्यांच्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खताच्या खड्ड्यात टाकाव्यात. शेतात गळून पडलेला पालापाचोळा, किडकी बोंडे इत्यादी गोळा करून जाळून टाकावीत. जमिनीची मशागत करावी, म्हणजे जमिनीत असलेले बोंडअळीचे कोष उघडे पडतील व तीव्र उन्हाळ्यात मरून जातील. खरीप हंगामात कापूस लागवड करावयाच्या शेताजवळ सूर्यफूल, भेंडी, वांगी यांसारखी पिके घेऊ नयेत. कारण या पिकांवरही हेलिकोव्हर्पा या किडीचा (फळे पोखरणारी अळी) प्रादुर्भाव होतो; जी कापसातील हिरवी बोंड अळी म्हणून नुकसानकारक ठरते. या पिकांमुळे या अळीला सातत्याने खाद्य मिळते. संपर्क : डॉ. एम. के. घोडके, ९४२३७७७५८५ (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)