Farmer Awareness: कीटकनाशकांची फवारणी करताना पुरेशी खबरदारी न घेतल्याने यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील विषबाधेचा पहिला रुग्ण दाखल झाला आहे. सोनवाढोणा येथील ज्ञानेश्वर चंद्रभान आडे यांना फवारणीनंतर त्रास जाणवू लागल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा फवारणीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याचे चित्र आहे..कीटकनाशकांची फवारणी करताना वैयक्तिक सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट रोजी ज्ञानेश्वर आडे यांना फवारणीनंतर विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिवसभर फवारणी केल्यानंतर सायंकाळी त्यांना मळमळ, उलटी आणि अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कीटकनाशक फवारणी केल्याने विषबाधा झाली असावी, असा अंदाज नातेवाइकांनी व्यक्त केला..Farmers Crisis: खरीप तोंडावर; शेतकरी संकटाच्या कोंडीत.मात्र, तपासणीत श्वसनवाटे अथवा त्वचेतून विष शरीरात गेल्याचे आढळले नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कीटकनाशकाच्या संपर्कातील आजाराची लक्षणे असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील विविध भागांतून दरवर्षी फवारणीमुळे विषबाधेचे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. उलटी, चक्कर, अंगावर खाज सुटणे यांसारखी लक्षणे काही रुग्णांमध्ये दिसून येतात. त्यांची तीव्रता कमी-अधिक असली तरी वेळेत उपचार मिळाल्यानंतर रुग्णांची प्रकृती सुधारते. आतापर्यंत अशा प्रकारचे पाच रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत..Orchard Management: तापमानवाढ, कमी आर्द्रता स्थितीत बागेचे व्यवस्थापन.दरम्यान, मागील काळात फवारणीमुळे झालेल्या विषबाधेची समस्या गंभीर राहिली आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा झाल्याने जवळपास ५०० शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यानंतर कृषी विभाग, विविध कीटकनाशक कंपन्या आणि जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. शेतकऱ्यांना सुरक्षा किटचे वितरणही करण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून मागील काही वर्षांत फवारणीमुळे विषबाधेचे प्रमाण नगण्य झाले होते. .यंदा मात्र फवारणी सुरू असताना जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविली जात नसल्याचे दिसून येत आहे. फवारणीपूर्वी सुरक्षा साधनांचा वापर, योग्य प्रमाणात कीटकनाशकाची मात्रा, फवारणीची योग्य वेळ आणि कीटकनाशक हाताळताना घ्यावयाची खबरदारी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. फवारणीच्या हंगामात विषबाधेचे रुग्ण वाढू नयेत, यासाठी कृषी विभागाने पुन्हा व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे..पिकांवर किडींचा प्रादुर्भावऑगस्ट महिन्यात पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांवर कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून फवारणी केली जात आहे. पावसाने काहीशी उघडीप दिल्याने ढगाळ वातावरण आणि पोषक वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे फवारणीचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सुरक्षा साधनांचा वापर करूनच फवारणी करणे आवश्यक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.