Wheat Grain Filling Stage Management: रब्बी हंगामातील गहू पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. पिकाचा हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या कालावधीत दाण्यांचे वजन, धान्याचा आकार आणि एकूण उत्पादन क्षमता निश्चित होते. पण सध्या दिवसाच्या तापमानात वाढ होणे, जमिनीच्या आर्द्रतेतील चढ-उतार आणि अधूनमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे दाणे सुकणे आणि वजन कमी होण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पिकाच्या या संवेदनशील टप्प्यात स्थिर उत्पादनासाठी पोषण व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः पालाश पोषक तत्त्वाचा वापर उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी एक प्रभावी उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. .कर्नाल येथील भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर)- भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्था (आयआयडब्ल्यूबीआर) यांच्या माहितीनुसार, पिकात दाणे भरण्याची अवस्था ही उष्णतेच्या ताणादरम्यान अत्यंत संवेदनशील मानली जाते. जेव्हा कमाल तापमान सलग दिवस ३५ अंश सेल्सिअसच्या जवळपास अथवा त्याहून अधिक राहते, तेव्हा पिकाचा दाणे भरण्याचा कालावधी कमी होतो. यामुळे दाण्यांमध्ये कार्बोहायड्रेटची निर्मिती पूर्णपणे होत नाही, ज्यामुळे धान्याचे वजन कमी होते. अशा परिस्थितीत, पालाश अन्नद्रव्य आधारित उपाययोजना अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. पालाशमुळे (पोटॅशियम) पिकाची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. .दाणे भरण्याच्या अवस्थेत पालाश का आहे महत्त्वाचे?पालाश हा कार्बोहायड्रेटचे वहन आणि पाण्याचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. दाणे भरण्याच्या अवस्थेत पानांमध्ये तयार होत असलेले अन्नघटक (प्रकाशसंश्लेषण) विकसित होत असलेल्या दाण्यांपर्यंत कार्यक्षमतेने पोहोचणे गरजेचे असते. पालाश या अन्नघटकांचे वहन करण्यास साहाय्य करते. जर पालाश कमी प्रमाणात असेल, तर दाण्यांकडे होणारे वहन मंदावते. परिणामी दाण्यांची वाढ पुरेशी होत नाही. परिणामी धान्याचे वजन कमी होऊन उत्पादनात घट होऊ शकते..Wheat Crop: मार्चमधील उष्णतेमुळे गव्हाला फटका बसणार.उष्णतेच्या ताणामुळे बाष्पोत्सर्जन वाढते आणि पेशींचे संतुलन बिघडू शकते. पुरेशा प्रमाणातील पालाशच्या पोषणामुळे पीक उष्णतेच्या ताणातही सहनशील बनते. यामुळे मार्च महिन्यात, विशेषतः दाणे भरण्याच्या अवस्थेत पालाश आधारित खतांचे व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. .म्युरिएट ऑफ पोटॅशचा डोस साधारणपणे पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात (बेसल डोस) दिला जातो. मात्र, ज्या शेतांत आधीच पुरेशा प्रमाणात पोटॅशियम दिलेले नसते, तिथे ताणाच्या परिस्थितीत दाणे भरण्याच्या अवस्थेत कमतरता दिसू शकते. यामुळे पिकाची वाढ खुंटणे, पानांची कडा पिवळसर पडणे अथवा पाने करपलेली दिसणे आणि दाणे पूर्णपणे न भरण्याची लक्षणे दिसून येऊ शकतात..Wheat Avakali Paus: गहू पिकावर अवकाळी आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम कसा रोखाल?.पालाशचा डोस भारतातील गहू पिकांसाठी ०:०:५० किंवा ०:५२:३४ किंवा पोटॅशियम नायट्रेट (KNO3) रासायनिकदृष्ट्या हे मातीत वापर होणाऱ्या प्रमुख पालाश खतांपैकी एक आहे. जेव्हा मातीत पोटॅशियमची पातळी मर्यादित स्वरुपात अथवा कमी असते, तेव्हा एमओपीचा वापर दाणे वाढीसाठी केला जातो. याचा वापर केल्याने दाण्यांची योग्य वाढ होते..मार्च महिन्यात उष्णतेचा ताण सहन करण्यासाठी भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्था आणि भारतीय गहू संशोधन केंद्राने पोटॅशियम नायट्रेट किंवा ०:०:५० किंवा ०:५२:३४ या खतांची १-२ टक्के द्रावण प्रमाणात फवारणीची शिफारस केली आहे. यासाठी प्रति एकर २०० लिटर पाण्यात ४ किलो पोटॅशियम नायट्रेट किंवा ०:०:५० किंवा ०:५२:३४ विरघळवून फवारणी करायला हवी. पालाश पाण्याचे संतुलन नियंत्रित ठेवण्यात मदत करते. तसेच पिकावरील ताण कमी करते. तर नायट्रेट नायट्रोजन प्रथिनांच्या निर्मितीस आणि दाणे वाढीस हातभार लावते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.