विजय सांबरेWater Conservation: मानवी संस्कृतीची पायाभरणी जलस्रोतांवर झाली आणि त्या जलधारेभोवतीच सभ्यता फुलली, वाढली, टिकली. वेद-पुराणांपासून ते कोकणातील देवकुंडांपर्यंत पाण्याशी असलेले सांस्कृतिक, जैविक आणि आध्यात्मिक नाते आजही जिवंत आहे. मात्र विकासाच्या वेगात जलसृष्टीचा होत असलेला ऱ्हास चिंताजनक आहे. यातून आपण अजूनही पाण्याला ‘जीवन’ मानतो की केवळ ‘संसाधन’? असा प्रश्न निर्माण होतो..मारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. चेतनसृष्टीने पृथ्वीवर पदार्पण केले. सागरीतळात जीवोत्पत्ती झाली. सजीवांना जगवते ते पाणी, अशी एक सर्वमान्य व्याख्या आहे. पाण्यामध्ये अब्जावधी वर्षांपूर्वी सजीव निर्मिती झाल्याचे दाखले पुराणासह आधुनिक विज्ञान पण देते. मानवी उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर माणूस भटक्या अवस्थेतून स्थिर झाला, तो शाश्वत जलस्रोतांच्या आधारेच. तिथेच त्याने कृषी संस्कृतीची मुहूर्तमेढ रोवली. तो शेती करू लागला. एक वेळ अन्न नसेल तर सजीव काही काळ जगू शकतो; पण पाण्याविना तो जगू शकत नाही. म्हणूनच मानवी संस्कृती जलाधारे उत्क्रांत झाली, टिकली व आजही प्रत्येक व्यक्ती पाण्यासाठी संघर्ष करत आहे..ऋषी-मुनींनी रचलेल्या वेद-पुराण-आरण्यक-ब्राह्मण ग्रंथांत निसर्गातील सर्वच घटकांचे महात्म्य वर्णिलेले आहे. वेदांसारख्या आद्यग्रंथांनी जनसामान्यांत विविध जलस्रोतांविषयी आपुलकीची व पवित्र भावना रुजवली आहे. विवाह प्रसंगीच्या मंगलाष्टकात आपण ‘जलै समुद्र सरिता’ असा घोष करतो. लोक साहित्य, संत साहित्यात जलाधारित जीवनशैलीची वर्णने मिळतात. एकूणच जलाधारित मानवी वसाहती जगभर पसरलेल्या आहेत. काही वसाहती पूर्णत: पाण्यावर अवलंबून आहेत, तर काही अंशत:. उदाहरणार्थ पाणी वा दलदलीच्या प्रदेशातील मच्छीमार व इतर जनसमूह तसेच जमिनीवर राहणारे पशुपालक, शेतकरी व इतर समुदाय. सर्वांच्यादृष्टीने पाण्याची निकड एकसमान होती व आजही आहे..Water Conservation: वृक्षारोपण, जलसंवर्धनाचा प्रोत्साहक योद्धा.जलस्रोतांचे वैविध्यएका जागी स्थिर झालेल्या मानवाला आस होती ती पर्जन्यधारांची. विविध ऋतूंत बरसणारा पाऊस त्याला जगण्याची आशा निर्माण करणारा होता. पर्जन्यापोटी असणाऱ्या श्रद्धेतून वरुण देवतेची उत्पत्ती झाली व पावसाची देवता म्हणून त्यास मान्यता मिळाली. मानवाच्या दृष्टीने आकाशातील पाऊस व पृथ्वीवरील एक जागी स्थिर भासणारा समुद्र हे उभय जलस्रोत अति महत्त्वाचे. जल सृष्टी व्यवस्थेमधील लहानमोठे जलस्रोत पण तितकेच महत्त्वाचे मानले गेले. पर्वतातील झरे, कुंड, डबरा, झीरा, ओहळ, ओढे, नाले, नदी, पोखर, तलाव, पुष्करणी, सरोवर ते अगदी मानव निर्मित धरणे व कालवे अशी नानाविध उदकरुपे मानवी संस्कृतीचा आधार बनले आहेत. पाण्याचे स्रोत जपण्याची व निर्माण करण्यामागची मानवी प्रेरणा उत्कट होती. म्हणून त्याने जल परिसंस्थेतील सर्व घटकांना अभय देण्याचे कार्य केले आहे..पृथ्वीतलावर पाण्यातच पहिला जीव निर्माण झाला. त्यातून विविध जीवसृष्टीने जन्म घेतला. कोट्यवधी वर्षांचा कालखंड उलटून गेल्यावर मानवाची पृथ्वीवर निर्मिती झाली. मानवी उत्क्रांतीच्या विविध टप्प्यावर पाण्याशी त्याचा संबंध आला असणार. याचे प्रतिबिंब सर्वसाधारण चाळीस हजार वर्षांपूर्वी भाषेची निर्मिती झाल्यावर निश्चितच उमटले. विशाल समुद्राला नानाविध रूपात येथील गाव समाजाने समजून घेतले, त्याच्याशी सांस्कृतिक, भावनिक व व्यावहारिक नाते जोडले. विविध भाषांत त्याला वैविध्यपूर्ण नावे आहेत. पाण्याला आप, तोय, नीर, सलिल, जीवन, अंबू तर सागराला अंबूपती, क्षीरनिधी, वाराशी, महाकच्छ, मकारावास अशी कितीतरी नामाभिदाने आहेत. त्याची गणती करणे केवळ अशक्य..जल-जैव-सांस्कृतिक वारसासध्या जगभर जलस्रोतांचे ऱ्हासपर्व सुरु आहे. पण प्रत्यक्ष जल परिसंस्थांसोबत जगत असलेले नानाविध समुदाय पाण्याला व त्यातील जलचरांना पवित्र मानत आहेत, हे आशादायी चित्र म्हणावे लागेल. कोकणात कोळी मच्छीमार नारळी पौर्णिमेला सिंधूसागराला नारळ वाहून मासेमारी सुरु करतात. तलाव वा समुद्रात माशांच्या विणीच्या हंगामात मासेमारी होत नाही. यामागे स्थानिकांची एक संवेदनशील अशी शाश्वत व्यवस्थापन दृष्टी दिसते. महाराष्ट्रात कोळी, तारू या समाजाचे देवक व कुलदैवते हे पाण्याशी संबंधित आहेत..दख्खनच्या पठारावर तलाव खोदणाऱ्या व जपणाऱ्या अनेक जाती-जमाती होत्या. त्या पण पाण्याला पूजनीय मानत, उत्सव साजरे करत, लोकसाहित्यात त्यांचे जल व जलचरांविषयीचे प्रेम आदरभाव प्रतिबिंबित होतो. सह्याद्रीतील आदिवासी व इतर जलोपजिवी समुदायाने नदीतील कुंडांना पवित्र मानले आहे. पारंपरिक नीतिनियमांच्या आधारे जपवणूक केली आहे. अशा जलस्रोतांमधून मासेमारी होत नाही. महाराष्ट्रात असे ‘देवांचे डोह’ (Sacred Ponds) विविध ठिकाणी आढळतात. महाराष्ट्रात कोकणापासून ते विदर्भापर्यंत शेकडो देव कुंड आजही आहेत. रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात पाताळगंगा नदीत पिटसई कुंड आहे. रायगड किल्ल्याच्या घेऱ्यात वायळण कुंड प्रसिद्ध आहे. इकडे घाट माथ्यावर प्रवरा नदीकाठी रंधा गावाजवळ घोरपडादेवीचा व संगमनेरच्या पूर्वेला प्रवरा पात्रात जगुबाईचा डोह आहे. गावोगाव सातीआसरा (माऊलाई), म्हसोबा, अप्सरा आदी जलदेवता ओढे व नद्यांकाठी आढळतात. क्षेत्रपाळ देवता म्हणून त्यांचे पूजन होते. नदीला तर आई मानण्याचा प्रघात आहे..Water Conservation Farming: पाणी बचतीतून शेतीला नवे बळ.पालघर ते सिंधुदुर्ग अशा सागर किनारी मुख्यत्वे कोळी, भंडारी व आगरी समाज राहतो. समुद्राशी त्यांचे जैव-सांस्कृतिक नाते निर्माण झाले आहे. तारापूर सातपाटी ते अगदी अलिबाग-अष्टागर या प्रदेशातील कोळी बांधवांचे मुख्य दैवत आहे वेताळ. खांदेरी किल्ल्याच्या तटबंदीला लागूनच वेताळाचे मुख्य ठाणे आहे. दरवर्षी कोळी बांधव बोटीने वेताळाच्या दर्शनाला जातात. समुद्रात करवत नावाचा मासा (Saw fish) मिळतो. त्याचे तोंड करवतीसारखे लांब असते. ते कापून या वेताळाला वाहण्याची प्रथा आहे. वेताळाचे वाहन डॉल्फिन मासा हे आहे. स्थानिक कोळी भाषेत त्याला ‘गुलूम-मामूस’ असे म्हणतात. गुलूम-मामूस म्हणजे अत्यंत जवळचा नातलग म्हणजेच मामा. डॉल्फिन मासा वेताळाचे वाहन कसा झाला, याची एक रंजक लोककथा आहे. वेताळाचे वाहन ठरवण्यासाठी करवत मासा व डॉल्फिन यांच्यात लढाई झाली व त्यात डॉल्फिन जिंकला. खरंतर करवती माश्याला वेताळाचे वाहन होण्याची खूप इच्छा होती, पण डॉल्फिनने बाजी मारली, असो..सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्याजवळ मानसीश्वर नावाचे दैवत आहे. याचे वाहन चक्क खेकडा आहे. माघ महिन्यात येथील देवराईत हजारोंच्या संख्येने खेकडे जमा होतात. त्यावेळी मानसीश्वराचा वार्षिक उत्सव असतो. याच जिल्ह्यात निवती किल्ला आहे. तेथून जवळच समुद्र किनारी एका टेकडीवर डुंगोबा नावाचे दैवत आहे. देवाच्या नावाने देवराहाटी जपली आहे. समुद्र किनाऱ्यावरील खाऱ्या पाण्यातील जंगल व टेकडीच्या उतारावर जमिनीवरील गोड्या पाण्याचे जंगल असे मिश्र परिसंस्था या देवराईत पाहायला मिळते..रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात तळे-खाजण येथे ब्रह्मदेवाची देवराई व ऐन मुंबईत चेंबूर जवळ रामादेवी अशा कांदळवनातील देवराया आजही टिकून आहेत. गोव्यात तिसवाडी तालुक्यात मांडवी नदी जिथे समुद्राला मिळते, तेथे आखाडा नावाचे गाव आहे. ते एक बेटच आहे. तेथील कांदळवनात प्राचीन हुपली वनस्पतीचा विशाल पवित्र वृक्ष आहे. या कांदळवनात गावाची रक्षक देवता साख्यलोचे ठाणे आहे. तिची देवराई पण स्थानिकांनी जपली आहे..सामुहिक घटकांची शोकांतिकामानवी वसाहती जिथे आहे, तिथे सर्व सामुहिक निसर्ग घटकांची शोकांतिका होणे, याला जगभरात Tragedy of Commons या नावाने ओळखले जाते. उदाहरणच द्यायचे झाल इतर जल, जंगल, जमीन, वन्यजीव, नदी, कुरण इत्यादी नैसर्गिक घटक. सामुहिक घटकांचे पद्धतशीर व्यवस्थापन करणे, ही आपली जबाबदारी आहे, असे पूर्वीच्या सर्व गावसमाजाचे एकमत होते. त्यात एक प्रकारे व्यावहारिक शहाणपण पण दडलेले होते. इंग्रज भारतात येण्यापूर्वी सामुहिक नैसर्गिक घटक जपण्याची लोककेंद्री व्यवस्था कार्यरत होती. राज्यकर्त्या इंग्रजांनी अशा स्वयंशासित लोककेंद्री व्यवस्था जाणीवपूर्वक मोडून काढल्या. पुढे स्वातंत्रोत्तर काळात विकास प्रक्रिया राबवताना लोककेंद्री सामुहिक व्यवस्थापन प्रक्रियेकडे आपल्या सरकारी यंत्रणांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यातून आज नद्यांसारखे अनेक नैसर्गिक जल घटक फक्त (अक्षम्य) दुर्लक्षामुळे विनाश पावत आहेत..जलसृष्टी व्यवस्था व मानवाचे गहिरे नाते आहे. त्याला सांस्कृतिक, भावनिक, व्यावहारिक पदर, छटा आहेत. पण आजघडीला मानव हक्काच्या जलस्रोतांपासून दुरावत आहे. जल सृष्टी व्यवस्थेचा एक महत्वपूर्ण घटक असणारा मनुष्य प्राणी विकासाच्या या गतिमान चक्रात भरकटत चालला आहे. उद्ध्वस्त खेडी व बकाल शहरे यांत त्याची कोंडी होते आहे. अतिरेकी महानगरांच्या फाश्यात तो अडकतो आहे. जलाधारीत पारंपरिक गाव समाजाचा ‘आवाज’ क्षीण होतो आहे. तो कोणी ऐकणार आहे की नाही...?(जलाधारित उपजीविका धोक्यात येण्यामागची कारणे, आव्हाने व त्यावर आवश्यक उपाययोजना तथा कृती कार्यक्रम याविषयी पुढील भागात जाणून घेऊया.)९४२१३२९९४४vijaysambare@gmail.com(लेखक शेती, पशुपालन व शाश्वत विकास या विषयांचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.