
Alibag News : पंधरा वर्षांपूर्वी मुरूड तालुक्यातील सुपीक जमिनी शेतकऱ्यांनी वेलस्पन मॅक्सस्टील या कंपनीला दिल्या. मुलांना नोकरीत सामावून घेतले जाईल, रोजगार मिळेल असे प्रलोभन दाखवून प्रशासनाने कवडीमोल भावाने जमिनी खरेदी केल्या.
परंतु अनेक वर्षे उलटूनही प्रकल्पग्रस्त नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे बळकावलेल्या जमिनी परत करा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
चेहेर, मिठेखार, वाघुळवाडी, नवीन चेहेर, साळाव निडी परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच न्यायासाठी महसूल प्रशासनाकडे धाव घेत अलिबागचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांना निवेदन दिले आहे.
प्रकल्पग्रस्त शेतकरी व कंपनी व्यवस्थापन यांची संयुक्त बैठक बोलावून न्यायिक मार्ग काढावा अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. १९८९-९० मध्ये पिकल्या जमिनी शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी दिल्या. संपादित केलेल्या जमिनीपैकी ६० टक्के जमिनींमध्ये प्रकल्प उभा केला.
मात्र उर्वरित ४० टक्के सुपीक जमीन आजपर्यंत पडीक ठेवण्यात आली आहे. त्यानंतर २००९-२०१० मध्ये संबंधित स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी वेलस्पन मॅक्सस्टील कंपनीच्या माध्यमातून संपादित करण्यात आल्या. ही कंपनीनंतर जेएसडब्ल्यूने ताब्यात घेतली, त्यानंतरही प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट थांबली नाही.
प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल
३६ महिन्यांत प्रकल्पग्रस्तांना रोजगार दिला जाईल. प्रकल्प येत नाही तोपर्यंत मानधन देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत सामावून घेण्यात येईल.
नव्याने संपादित जमिनींच्या मोबदल्यात वाढीव रक्कम दिली जाईल, असा करार त्या वेळी करण्यात आला होता. परंतु अद्याप प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या देण्यात आलेल्या नाहीत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.