Solapur News: राज्यातील प्रमुख धरणांच्या तुलनेत सोलापूरची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणामध्ये सर्वाधिक ६३.६५ टीएमसी इतका मृत साठा आहे, एवढ्या प्रचंड प्रमाणात मृतसाठा असणारे उजनी हे एकमेव धरण आहे. उजनीची पातळी जेव्हा ‘शून्य’ होते, तेव्हा तिच्या पोटात राज्यातील दोन-तीन मध्यम धरणांइतके पाणी शिल्लक राहते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हा पाणीसाठा ‘मृत’ असला, तरी प्रत्यक्षात टंचाई किंवा सलग दोन वर्षांचा भीषण दुष्काळ पडला, तरी तो पचवण्याची ताकद केवळ शून्याखालच्या या मृतसाठ्यामध्ये आहे..उजनी धरणाचे जलशास्त्र तसे राज्यातील इतर मोठ्या धरणांच्या तुलनेत अत्यंत वेगळे आणि विस्मयकारक आहे. सामान्यतः धरणाचे दरवाजे ज्या पातळीवर असतात, त्याच्या खालच्या साठ्याला ‘मृत साठा’ म्हणतात. तांत्रिक भाषेत दरवाजाखाली असलेले हे पाणी, जे नैसर्गिक प्रवाहाने बाहेर पडू शकत नाही..Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय.इतर धरणांमध्ये हा साठा वापरणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. मात्र उजनीचे जलाशय त्याला अपवाद आहे, कारण उजनी धरण हे उथळ आणि विस्तीर्ण पसरलेले असल्याने, धरण उणे पातळीत गेल्यावरही मृतसाठ्यातील पाणी उपसता येऊ शकते, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच शंभराहून अधिक उपसा सिंचन योजना केवळ या पाण्यावर चालतात, तर सुमारे अडीच लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली आले आहे..शिवाय सोलापूर, नगर, पुण्यातील १२५ हून अधिक गावांच्या सार्वजनिक पाणी योजना आणि बॅकवॉटरमधील हजारो कृषिपंपांच्या माध्यमातून हे पाणी सहजपणे उपसले जाऊ शकते. टंचाई आणि दुष्काळाच्या काळात किंवा सलग दोन वर्षे दुष्काळ पडला, तरी हे पाणी सहज उपलब्ध होऊ शकेल, एवढी या अवाढव्य मृतसाठ्याची क्षमता आहे. त्यामुळेच उजनीचा मृत साठा कागदावर ‘डेड’ असला, तरी सोलापूरच्या शेतीसाठी तो पूर्णपणे जिवंत (लाइव्ह) ठरतो..Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले.उपयुक्तसाठा कमी, मृतसाठा अधिककोणत्याही धरणात ‘उपयुक्त साठा’ (लाइव्ह स्टोअरेज) अधिक असतो आणि ‘मृत साठा’ (डेडस्टॉक) कमी असतो. मात्र उजनीच्या बाबतीत हे गणित नेमके उलटे आहे. राज्यातील प्रमुख धरणांचा विचार करता जायकवाडीची उपयुक्त साठवण क्षमता ७६ टीएमसी आणि मृत साठा फक्त २६ टीएमसी आहे. कोयना धरणात १०० टीएमसी उपयुक्त साठा असून, मृत साठा केवळ ५ टीएमसी आहे. याउलट, उजनीचा एकूण क्षमता ११७.२७ टीएमसी आहे. त्यापैकी ५३.६२ टीएमसी उपयुक्तसाठा आणि तिचा सर्वाधिक तब्बल ६३.६५ टीएमसी इतका मृतसाठा आहे..उजनीचा ‘डेड स्टॉक’ सोलापूरसाठी निसर्गाने दिलेली देणगी आहे. पाऊस कमी झाला तरी हे पाणी किमान दोन वर्षे तारू शकेल, एवढी ताकद धरणाच्या मृतसाठ्यातील या पाण्यामध्ये आहे.प्रशांत माने, कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.