डॉ. बी.व्ही. गोंधळी, सुभाष भालेकर, सुवर्णा बाचकरAgriculture Nursery: उन्हाळी हंगामामध्ये कलमे शेडनेट हाउसमध्ये ठेवल्यास त्यांचे अति उष्णता व कडक सूर्यप्रकाश यापासून संरक्षण होते. कलमे चांगल्या गुणवत्तेची तयार होतात. उन्हाळी हंगामामध्ये तयार केलेल्या गुटी व दाब कलमांची विशेष काळजी घ्यावी. कारण जास्त तापमान व प्रखर सूर्यप्रकाशामुळे मुळ्या तयार होण्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो..पावसाळ्यामध्ये तयार केलेल्या आणि उन्हाळी हंगामात तयार करण्यात आलेल्या कलमे, रोपांची उन्हाळी हंगामात विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. उन्हाळी हंगामात रोपांचा तजेलदारपणा टिकून राहण्यासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन आणि आच्छादनाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रोपवाटिकेतील कलमे, रोपांना पाटपाणी, प्लॅस्टिक पाइप व झारी, सूक्ष्म तुषार सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. ज्या कलमांचे हार्डनिंग (रोपे सामान्य वातावरणात वाढीसाठी तयार होणे) झाले आहे अशी कलमे, रोपे चरात किंवा सपाट वाफ्यात ठेवावीत. पाटपाणी द्यावयाचे असल्यास ४ ते ५ दिवसांच्या अंतराने हलकेसे पाणी द्यावे. पाणी जास्त काळ साचून राहू नये म्हणून चरास / वाफ्यास किंचित (०.१ ते ०.५ टक्का) उतार असावा. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी व कलमांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी पॉलिथिन कागदाच्या (मल्चिंग पेपर) व वाळलेल्या गवताच्या साह्याने आच्छादन करावे. तसेच चर, वाफ्याच्या तळाला पॉलिथिन पेपर टाकावा जेणेकरून मुळे जमिनीत जाणार नाही आणि पाण्याची बचत होईल..Nursery Management : शास्त्रशुद्ध रोपवाटिका उभारून कृषी क्षेत्राला बळकटी द्यावी .सूक्ष्म तुषार सिंचनाची सोय असल्यास पाण्याची साधारणतः २५ ते ३० टक्के बचत होते. कलमे, रोपांना आवश्यक तेवढेच पाणी देणे शक्य होते. त्यासाठी दोन तास प्रति दिवस या प्रमाणे सूक्ष्म तुषार सिंचन संच चालवावा. सूक्ष्म तुषार सिंचन संचाच्या वापरामुळे रोपवाटिकेत जमिनीलगत आर्द्रता तयार होते, त्यामुळे कलमे, रोपांची जोरदार वाढ होते. प्रखर सूर्यप्रकाशामुळे कलमांची पाने करपत नाहीत. सूक्ष्म तुषार सिंचनाद्वारे मिळणारे पाणी हे सूक्ष्म थेंबाद्वारे मिळत असल्यामुळे नाजूक कलमे, रोपांना इजा होत नाही..शेडनेटचा वापरसध्या बाजारामध्ये ५० आणि ७५ टक्के क्षमतेचे शेडनेट उपलब्ध आहेत. लोखंडी अँगल व जी.आय. पाइपच्या साह्याने कायमस्वरूपी किंवा कमी खर्चात निलगिरी, सुरू व बांबूचा वापर करून तात्पुरते उन्हाळी हंगामापुरते शेडनेट हाउस तयार करावे. उन्हाळी हंगामामध्ये कलमे शेडनेट हाउसमध्ये ठेवल्यास त्यांचे अति उष्णता व कडक सूर्यप्रकाश यापासून संरक्षण होते. कलमे चांगल्या गुणवत्तेची तयार होतात..फॉगर्स, मिस्टर्सचा वापरउष्ण व कोरड्या हवामानाचा कलमे, रोपांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यासाठी फॉगर्स व मिस्टर्सचा वापर करावा. त्यांच्या वापरामुळे उष्णता कमी होऊन हवेतील आर्द्रता वाढण्यास मदत होते. त्यामुळे कलमे, रोपे ताजी व टवटवीत राहतात व जोमदार वाढ होते..Nursery Management Training: रोपवाटिका व्यवस्थापन कौशल्यावर प्रशिक्षण.खत व्यवस्थापनउन्हाळी हंगामात योग्य प्रकारे खत व्यवस्थापन केल्यास कलमे, रोपांची जोमदार वाढ होते. डीएपी. ५० ते ७० ग्रॅम प्रति वाफा (३ × २ मी.) आणि प्रति महिना पाणी देण्यापूर्वी द्यावा. तसेच पाण्यात विरघळणारी १९:१९:१९ या प्रकारची खते फवारणीद्वारे देता येतील. त्यासाठी १ टक्का तीव्रतेच्या द्रावणाची रोपांच्या पानावर फवारणी करावी.सूक्ष्म तुषार सिंचनाची सोय असल्यास त्याद्वारेच पाण्यात विरघळणारी खते देणे जास्त परिणामकारक ठरेल, परंतु फवारणीद्वारे किंवा सूक्ष्म तुषार सिंचनाद्वारे खते देताना द्रावणाची तीव्रता योग्य प्रमाणात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण जास्त तीव्रतेच्या द्रावणाचा कलमे, रोपांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते..माती मिश्रणावर प्रक्रियाकलमे, रोपे तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या माती मिश्रणावर प्रक्रिया करणे गरजेचे असते. रोपवाटिकेत तयार करावयाच्या कलमे/ रोपांचे आधीच नियोजन करून त्यासाठी लागणारे माती मिश्रण उन्हाळी हंगामातच तयार करून ठेवावे, कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर कोरडा पोयटा व माती मिळणे कठीण असते. रोपवाटिकेसाठी वापरण्यात येणाऱ्या मिश्रणामधील बुरशी, सूत्रकृमी व तणांचा नाश करण्यासाठी मिश्रण निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असते.माती मिश्रणावर पांढरा पॉलिथिन पेपर झाकून ठेवल्यास उन्हाळ्यातील ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाला मिश्रणाचे चांगले निर्जन्तुकीकरण होऊ शकते. माती मिश्रणावर रासायनिक प्रक्रियेसाठी ३ टक्के फॉर्मालीन या रसायनाचा वापर करतात. तसेच बुरशीनाशकांचा वापर करावा. सदरचे मिश्रण निर्जंतुकीकरण करून झाकून किंवा शेड मध्ये ठेवावे जेणेकरून पावसात ते भिजणार नाही..बियाणे पेरणीसीताफळ, आवळा, चिंच व खिरणी तसेच बीपासून तयार होणाऱ्या झाडांच्या बिया उन्हाळी (मार्च ते मे) हंगामात गोळा करून ठेवाव्यात. खिरणीचे बी ताजे पेरावे लागते.बी गोळा करून योग्य ती बीजप्रक्रिया करून गादीवाफ्यावर किंवा पिशवीत पेरावे. खिरणीची रोपे पुढील हंगामात चिकू कलमे बांधण्यासाठी उपयोगी पडतात.वारा प्रतिबंधक वनस्पतींचा ताटवा रोपवाटिकेभोवती लावावा. उदा. शेवरी, पांगारा. यामुळे उन्हाळी हंगामात प्रसंगी वाहणारा वारा तसेच वादळापासून रोपवाटिकेचे संरक्षण काही प्रमाणात करता येते.रोपवाटिकेभोवती तसेच आतमध्ये चर खोदून त्यात पाणी सोडावे त्यामुळे विशेषतः एप्रिल- मेमध्ये हवेतील तापमान खूपच वाढलेले असताना रोपवाटिकेतील तापमान काहीसे कमी होऊन आर्द्रता वाढते, ज्यांचा रोपांच्या वाढीवर अनुकूल परिणाम होतो..गुटी आणि दाब कलमाची काळजीडाळिंब, पेरूची अभिवृद्धी गुटी कलमांनी केली जाते. अंजिराची अभिवृद्धी छाट कलमाद्वारे केली जाते. सदर फळझाडांच्या वर्षभर असलेली मागणी पाहता थंडीचा २ ते ३ महिन्यांचा कालावधी सोडला तर वर्षभर कलमांची मागणी सुरू असते.उन्हाळी हंगामामध्ये तयार केलेल्या गुटी व दाब कलमांची विशेष काळजी घ्यावी. कारण जास्त तापमान व प्रखर सूर्यप्रकाशामुळे मुळ्या तयार होण्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यासाठी उन्हाळी हंगामामध्ये तयार केलेल्या गुटी व छाट कलमांना १५०० ते २००० पीपीएम तीव्रतेचे आयबीए संजीवक कलम करण्याच्या जागेवर लावावे, म्हणजे मुळ्याची लवकर व तंतुमय वाढ होते..कलमे बांधलेल्या पेरू, डाळिंब व अंजीर रोपांना पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.वाळलेला पालापाचोळा व गवत किंवा पॉलिथिन पेपरच्या साहाय्याने आच्छादन केल्यास ओलावा जास्त दिवस टिकून राहतो..पावसाळी हंगामात तयार केलेल्या आंबा, पेरू, डाळिंब या कलमांची कडक उन्हाळा व तीव्र सूर्यप्रकाश यापासून योग्य प्रकारे पाणी नियोजन करून काळजी घ्यावी. डिसेंबर, जानेवारी महिन्यांत तयार केलेली सीताफळ कलमेसुद्धा नाजूक व कोवळी असल्याने कडक उन्हाळा व तीव्र सूर्यप्रकाशापासून योग्य प्रकारे पाणी नियोजन करून काळजी घ्यावी.- बी. व्ही. गोंधळी ९४२१२६४१३४(प्रभारी अधिकारी, विभागीय कृषी संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे)