Summer Farming Management Tips: सामान्य सल्ला नव्याने लागवड केलेल्या आंबा व काजू कलमांना तसेच सुपारी व नारळाच्या रोपांना उष्णतेचा ताण टाळण्यासाठी व तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी शेडनेट किंवा नारळाच्या झावळ्यांद्वारे सावलीची व्यवस्था करावी.भेंडी व मूग पिकामध्ये रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी शेतात पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.उष्णता वाढीमुळे किंवा अन्य कारणांनी जंगलामध्ये वणवा लागण्याची शक्यता असते. काही वेळा या वणव्यामध्ये आंबा किंवा काजू बागा होरपळून जाण्याची शक्यता असते. वणवा लागण्यापासून बागांचे संरक्षण करण्याकरिता बागांमध्ये ठरावीक अंतराने वणवा निरोधक पट्टे काढावेत..आंबाआंबा फळांचे फळमाशीपासून, प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच फळांचा आकार व वजन वाढून डाग विरहित फळांसाठी, गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार २५ बाय २० सें.मी. आकाराच्या कागदी किंवा वर्तमानपत्रापासून बनविलेल्या पिशव्यांचे आवरण घालावे. आवरण घालताना आंबा फळाच्या देठाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.आंबा बागांमध्ये फळगळ झाली असल्यास जमिनीवर पडलेली व नुकसानग्रस्त फळे गोळा करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. त्यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो..Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग.आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. फळमाशीच्या प्रादुर्भाव झालेली फळे गळून पडतात. अशा परिस्थितीत बागेतील गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकर २ या प्रमाणात बागेत आंबा कलमांच्या फांद्यांवर लावावेत.गोटी किंवा अंडाकृती अवस्थेतील फळे असलेल्या बागेत फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (१ टक्के) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. फळांच्या वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत अशा एकूण तीन फवारण्या कराव्यात..फळधारणा झालेल्या बागेत शक्य असल्यास दर १५ दिवसांनी प्रति कलम १५० ते २०० लिटर पाणी द्यावे. अशाप्रकारे पाण्याच्या ३ ते ४ पाळ्या द्याव्यात. आंबा काढणीस तयार होण्याच्या एक महिना अगोदर पाणी देणे बंद करावे. जेणेकरून आंब्याच्या गुणवत्तेवर आणि टिकाऊपणावर कोणताही परिणाम होणार नाही.काढणीस तयार झालेल्या हापूस आंब्याची काढणी ‘नूतन’ झेल्याच्या सहाय्याने काळजीपूर्वक करावी. काढणीची कामे सकाळी १० वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ४ नंतर करावीत, ज्यामुळे फळांचे तापमान नियंत्रित राहून साक्याचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते..तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. कलम जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून दोनदा, तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसांतून दोनदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून दोनदा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसेच झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे..काजूपक्वता ते काढणी अवस्थापक्व काजू बी व बोंड यांची दोन दिवसाआड वेचणी करून बी बोंडापासून वेगळे करून स्वच्छ पाण्याने धुवावे. नंतर काजू बी उन्हामध्ये ३ दिवस वाळवावीत. बियांची एकसारखी वाळवणी होण्याकरिता दर २ तासांनी बियांची उलटापालट करावी.साधारण तीन दिवस वाळवणी झालेले काजू बी थंड करून गोणपाटामध्ये भरून ते कोरड्या ठिकाणी ठेवावे.नवीन लागवड केलेल्या कलमांना पहिल्या २ वर्षांत उन्हाळ्यात ८ दिवसांच्या अंतराने ३० लिटर पाणी प्रति कलम याप्रमाणे द्यावे..Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग.नारळनवीन लागवड केलेल्या नारळ बागेत पहिली ३ ते ४ वर्षे माडांना दर ३ ते ४ दिवसांनी पाणी द्यावे.पूर्ण वाढलेल्या एका नारळाच्या माडास ठिबक सिंचनाद्वारे प्रति दिवस ४० लिटर पाणी माडाच्या खोडापासून १.२५ मी. अंतरावर गोलाकार लॅटरल पाईप टाकून ३ ड्रिपरच्या साहाय्याने द्यावे..हळदहळदीची लागवड एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे महिन्यात करणे आवश्यक आहे. उशिरात उशिरा हळदीची लागवड जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. हळद हे जमिनीत वाढणारे खोड आहे. त्यामुळे जमीन जितकी भुसभुशीत तितके हळदीचे उत्पादन चांगले मिळते. त्यासाठी २ ते ३ वेळा जमिनीची उभी आडवी १८ ते २२ सें.मी. खोल नांगरणी करावी. त्यानंतर जमीन १५ ते २० दिवस उन्हात तापू घ्यावी. त्यानंतर दुसरी नांगरणी करून ढेकळे फोडून २५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून घ्यावे..माती परीक्षणसर्वसाधारणपणे माती परीक्षण दर तीन ते चार वर्षांतून एकदा खरीप पीक काढणीनंतर लगेच किंवा एप्रिल-मे महिन्यामध्ये करणे आवश्यक आहे. परंतु वर्षातून दोन ते तीन वेळा पिके घेत असलेल्या जमिनीचे माती परीक्षण दरवर्षी करणे जरुरीचे आहे. हंगामी पिके जसे की भात, नागली, भूईमुग पिकांकरिता २० ते २५ सें.मी. आणि फळबाग पिके आंबा, काजू, नारळ, सुपारीकरिता ६० सें.मी. खोलीवरचे मातीचे नमुने घ्यावेत..कुक्कुटपालनकुक्कुटपालन शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावीत. पक्ष्यांना स्वच्छ व पिण्याच्या थंड पाण्याचा सतत व पुरेसा पुरवठा करावा. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी खाद्य सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावे.पक्ष्यांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी कुक्कुटशेडच्या छतावर गवत, भाताचा पेंढा किंवा नारळाच्या झावळ्या आच्छादित कराव्यात. अतितीव्र उष्णतेच्या काळात शेडचे तापमान कमी करण्यासाठी छतावर पाणी शिंपडावे.- डॉ. वैभव राजेमहाडीक ९४२०६७३२६७- डॉ. यशपाल चव्हाण ८१४९४६७४०१(कृषिविद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.