आर. एन. गायकवाड, डॉ. ए. डी. कडलगआधुनिक तंत्राचा वापर करून कमी खर्चात खोडव्याच्या जास्त उत्पादनाबरोबरच जमिनीची सुपीकता टिकवली जाते. म्हणून खोडव्यात पाचट ठेवण्याच्या तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. खोडव्याला पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांत वाफसा आल्यानंतर बगला फोडून घ्याव्यात. त्यामध्ये रासायनिक खताची पहिली मात्रा द्यावी. पहारीने खत मात्रा दिल्यास बगला फोडण्याची आवश्यकता नाही..महाराष्ट्र राज्याची सरासरी ऊस उत्पादनापैकी ३० टक्के वाटा खोडवा ऊस पिकाचा आहे. खोडव्याची सरासरी उत्पादकता लागण उसापेक्षा २० ते २५ टक्के कमी मिळते. राज्याची सरासरी ऊस उत्पादकता ७५ ते ८० मे. टन प्रती हेक्टर आहे. खोडवा पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास लागणी इतके ऊस उत्पादन येऊ शकते. खोडव्याची उत्पादकता २० ते २५ टक्क्यांनी वाढल्यास राज्याची सरासरी ऊस उत्पादकता हेक्टरी १०० टनांपर्यंत जाऊ शकते. तसेच सरासरी साखर उतारा १२ टक्क्यांपर्यंत मिळू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी खोडवा उत्पादनाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे..Sugarcane Farming: उसासाठी पाण्याचे योग्य नियोजन.महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी कारखाना कार्यक्षेत्रात ६० ते ६५ टक्के लागण व ३५ ते ४० टक्के खोडवा ऊस पीक असते. परंतु खोडवा उसाची उत्पादकता लागणीच्या उसापेक्षा कमी असल्याने शेतकरी खोडवा पिकाकडे दुर्लक्ष करतात. सध्या राज्यातील ऊस उत्पादनापैकी ३० टक्के वाटा खोडवा उत्पादनाचा आहे. खोडवा पिकाची योग्य जोपासना, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पाचटाचे योग्य व्यवस्थापन केल्यास खोडव्याचे उत्पादन हे लागण पिकाएवढे येऊ शकते..खोडवा पिकाचा शरीरक्रिया अभ्यासखोडवा पिकामध्ये जमिनीत असणाऱ्या बुडखा कांडीमधून फुटवे निघतात.फुटव्यांचे प्रमाण जास्त असल्यास फुटवा मरीचे प्रमाण लागण उसापेक्षा २० ते २५ टक्के जास्त असते.खोडवा वाढीचा वेग लागण उसापेक्षा जास्त असतो.खोडव्याच्या पानामध्ये हरितद्रव्याचे प्रमाण कमी असते.खोडवा पिकामध्ये नत्र वापराची कार्यक्षमता कमी असते. पक्व पानांचे क्षेत्रफळ खोडवा पिकामध्ये कमी असते.खोडव्याची मुळे उथळ असल्याने पाण्याचा ताण लवकर जाणवतो.खोडवा पीक उत्पादन खर्च लागण उसापेक्षा ३५ ते ४० टक्यांनी कमी येतो.खोडव्याची पक्वता लागण उसापेक्षा हंगामानुसार दोन महिने लवकर येते..Sugarcane Farming: ऊस पिकात खते देण्यासह आंतरमशागतीस वेग.खोडवा पिकामध्ये पाचटाचे महत्त्वऊस लागवड क्षेत्रात सर्वच भागात सेंद्रिय पदार्थांची कमतरता आहे. ऊस उत्पादनाच्या १२ ते १५ टक्के पाचट मिळते. ८० टन ऊस उत्पादन आल्यास प्रति हेक्टरी ८ ते ९ टन पाचट मिळते.चांगल्या कुजलेल्या ऊस पाचटामध्ये शर्करायुक्त पदार्थ, सेंद्रिय आम्ल, फॉलिक आम्ल, अमिनो आम्ल यांसारख्या पाण्यात विरघळणाऱ्या घटकांचे प्रमाण २० टक्के असते.८० टक्के भाग सेल्युलोज, हेमी सेल्युलोज, लिग्निन व खनिजद्रव्ये यासारखे पदार्थ पाचटामध्ये असतात..सुरवातीस नत्र, स्फुरद व पालाश वाहून जातात. पाचटाचे वजन कमी होते. त्यानंतर सेल्युलोज, लिग्निन यांचे विघटन चालू होते.पाचटाचे कर्ब नत्र गुणोत्तर ८०:१ ते १०० : १ असते. त्यामुळे जमिनीत कर्बाचे संवर्धन होते.बाहेरून नत्र दिले तर सेल्युलोज घटकाचे विघटन लवकर होते. म्हणून आच्छादन केलेल्या पाचटावर एकरी ५० किलो युरिया, ४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ४ किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धकाचे मिश्रण पसरावे.पाचट कुजल्यानंतर कर्ब नत्र गुणोत्तर २०:१ ते ३०:१ पर्यंत कमी होतो..AI in Sugarcane Farming: सुरु उसाला एआयची जोड देऊन उत्पादन कसे वाढवता येईल?.खोडवा पाचट व्यवस्थापनऊस तुटल्यानंतर पाचटाची कुट्टी करावी किंवा अखंड पाचट बुडक्यावरून सरीत लोटावे.बुडक्यावरील पाचट काढल्याने सूर्यप्रकाश पडून येणारे कोंब जोमदार येतात.बुडखे जमिनीलगत छाटून घेतल्यामुळे जमिनीखालून येणारे कोंब जोमदार असतात.बुडखा छाटणी केल्यानंतर बुरशीनाशक आणि कीडनाशकाची फवारणी घ्यावी. त्यामुळे जमिनीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा तसेच किडीस प्रतिबंध होतो.बुडखा छाटणी न केल्यास जमिनीच्या वरील कांडीपासून येणारे फुटवे कमकुवत असतात, त्याचे उसात रूपांतर होत नाही..पाचट कुजण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंची गरज असते. त्यासाठी सरीत पसरविलेल्या पाचटावर एकरी ३२ किलो युरिया, ४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ४ लिटर पाचट कुजविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा वापर करावा. त्यानंतर पाणी द्यावे. पाचटामुळे सुरवातीस पाणी पोहोचण्यास वेळ लागतो. तरी सुरुवातीस सर्वत्र पाणी बसेल याची दक्षता घ्यावी.ऊस बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास मदत होऊन फुटव्यांची एकूण संख्या वाढते. जमिनीखालून येणारे कोंब जोमदार असतात. ऊस तोडणी यंत्राने ऊस तोडणी केल्यास बुडखा छाटणे आवश्यक नसते.बुडखा छाटणी न केल्यास जमिनीच्यावरील कांडीपासून डोळे फुटतात, असे येणारे फुटवे कमजोर असतात. क्वचित त्याचे उसामध्ये रूपांतर होते..आंतरमशागत, रासायनिक खतांचा वापरखोडव्याला पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांत वाफसा आल्यानंतर बगला फोडून घ्याव्यात. त्यामध्ये रासायनिक खताची पहिली मात्रा द्यावी. जर पहारीने खत मात्रा दिल्यास बगला फोडण्याची आवश्यकता नाही.पहारीने खत मात्रा देताना बुडक्यापासून १० ते १५ सेंमी अंतरावर १५ ते २० सेंमी खोल छिद्र घेऊन सरीच्या एका बाजूस पहिली खत मात्रा द्यावी. दोन छिद्रांमधील अंतर ३० सेंमी ठेवावे. दुसरी खत मात्रा विरुद्ध बाजूस त्याचपद्धतीने १२० दिवसांनी द्यावी आणि नेहमी प्रमाणे पाणी द्यावे.खोडव्यामध्ये पहारीने खत दिल्यास बगला फोडण्याची आवश्यकता नसते कारण बगला फोडताना जुनी अकार्यक्षम मुळे तुटतात, नवीन मुळे फुटून अन्न व पाणी शोषण्याचे काम सुरू होते..पाचटाच्या पूर्ण आच्छादनामुळे जमिनींच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. त्यामुळे शेतात ओलाव्याचे प्रमाण जास्त काळ टिकून राहते. पाण्याच्या पाळीतील अंतर वाढले तरी ऊस वाढ चांगली होते.सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीची जलधारण क्षमता वाढते, भौतिक गुणधर्म सुधारतात. उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते.सेंद्रिय पदार्थ विघटन होत असताना मुख्य अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होत असतात.पाचट कुजल्यामुळे त्यापासून कार्बनिक आणि इतर आम्ल तयार होऊन जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.जमिनीचे तापमान थंड राखले जाते. मुळांची वाढ भरपूर प्रमाणात होते.सूक्ष्म जिवाणू आणि गांडुळांच्या मार्फत तयार झालेली आम्ले, वाढवर्धके, संप्ररके यांची वाढ होऊन उसाची जोमदार वाढ होते.खते पहारीच्या साह्याने टाकल्यामुळे ती पाण्याबरोबर वाहून जात नाहीत. बाष्पीभवनाद्वारे ऱ्हास होत नाही.- आर. एन. गायकवाड ९८८१३२७३५५(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु), पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.