थंडीचा काळ संपल्यानंतर साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात सीताफळाचा आगाप बहर धरला जातो. झाडांची हलकी छाटणी करून जमिनीची मशागत, अन्नद्रव्ये आणि पाणी व्यवस्थापन सुरू करावे लागते. पहिले पाणी दिल्यानंतर एक महिन्यांनी म्हणजेच मार्च महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात फळधारणा व्हायला सुरुवात होते..फळबाग शेतीमध्ये बहर व्यवस्थापन हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आपल्या भागातील हवामान, जमीन, सिंचनाच्या सुविधा, बाजारभाव या सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य बहर निवडावा लागतो. सीताफळाचा विचार करता जून महिन्यात पावसाच्या आगमनाबरोबर झाडांना नवीन पालवी फुटते आणि सोबतच बहरही येतो. परंतु पुरेशा सिंचन सोईच्या उपलब्धतेनुसार आपणास पावसाळ्यापूर्वी किंवा लवकरही बहर घेता येतो यालाच आगाप बहर असे म्हणतात..Sitaphal Farming: तयारी सीताफळ बहर धरण्याची... .साधारणपणे सीताफळाचा हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबर अखेर संपतो. त्यानंतर थंडीचा हंगाम सुरू होतो. या पिकास थंडी मानवत नसल्याने या काळात झाडे सुप्तावस्थेत जातात. हळूहळू पाने करपू लागतात. थंडी संपल्यानंतर जसजसे तापमान वाढू लागते तसतसे झाडांची पूर्ण पानगळ होते. हलक्या प्रकारच्या जमिनीत लवकर तर भारी जमिनीत उशिरा पानगळ होते. भारी जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने बऱ्याचदा चैत्र महिन्यात झाडांना नवीन पालवी फुटते आणि बहरही येतो. परंतु वातावरणातील जास्त तापमान व पुरेशा आद्रतेच्या अभावी बहर गळून जातो, नवीन पालवीची वाढही खुंटते. हलक्या जमिनीत मात्र नवीन पालवी फुटत नाही..थंडीचा काळ संपल्यानंतर साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात आगाप बहर धरला जातो. झाडांची हलकी छाटणी करून जमिनीची मशागत, अन्नद्रव्ये आणि पाणी व्यवस्थापन सुरू करावे लागते. पहिले पाणी दिल्यानंतर एक महिन्याने म्हणजेच मार्च महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात फळधारणा व्हायला सुरुवात होते. सीताफळाच्या योग्य फळधारणेसाठी ३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान आणि ८० टक्यांपेक्षा जास्त आद्रतेची गरज असते. नेमके या काळात तापमान आणि आर्द्रता अनुकूल नसल्याने अपेक्षित फळधारणा होत नाही. पुरेशा फळधारणेकरिता काही आंतरपिकांचा अवलंब करावा लागतो..Sitaphal Farming : सीताफळ शेतीतून अर्थकारणाला गती!.महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संशोधनात वेगवेगळ्या पिकांचा अंतर्भाव केल्याने सीताफळाच्या आगाप बहर व्यवस्थापनात अपेक्षित फळधारणा झाल्याचे आढळून आले आहे. याकरिता छाटणीनंतर जमिनीच्या मशागती सोबत ज्वारी, बाजरी, ताग, धैंचा, सूर्यफूल इत्यादी पैकी कोणत्याही एका पिकाचा आंतरपीक म्हणून समावेश करण्याची शिफारस केली गेली आहे. ही आंतरपिके बागेतील तापमान नियंत्रणात ठेवतात. आर्द्रता ही पुरेशा प्रमाणात निर्माण करतात. ज्यामुळे पुरेशा प्रमाणात फळधारणा होण्यास मदत होते. बाजरी हे सर्वांत कमी पाण्यात येणारे पीक असल्याने उन्हाळ्यातील कमी पाण्याच्या समस्येवर मात करता येते. फळधारणा झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात आंतर पिकाची कापणी करून त्याचा चारा म्हणून उपयोग करता येतो किंवा बागेतच पसरून त्याचे सेंद्रिय आच्छादन करता येते. यामुळे जमिनीचे तापमान नियंत्रणात राहते, पाण्याची बचत होते तसेच तण नियंत्रणही होते..बहर धरताना घ्यावयाची काळजीबहर धरण्यापूर्वी बागेची स्वच्छता करावी. त्यासाठी बागेत पडलेली पाने, फळे, झाडावर लटकलेली काळी व रोगट फळे गोळा करून खड्ड्यामध्ये पुरून टाकावीत.छाटणीनंतर बागेची हलकी मशागत करून घ्यावी. आंतरपिकाची पेरणी फार दाट करू नये.पाणी व्यवस्थापन करताना ठिबक किंवा तुषार सिंचनाचा अवलंब करावा.पाण्याचा अतिरेक टाळावा. यामुळे झाडांची अतिप्रमाणात शाखीय वाढ होते, फळधारणा कमी प्रमाणात होते.आंतरपिके झाडांच्या घेराची जागा सोडून उर्वरित जागेत पेरावीत जेणेकरून वाढ झाल्यानंतर झाडांच्या फांद्यामध्ये अटकाव करणार नाहीत.बागेभोवती शेवरीसारखी वारा प्रतिरोधक चारा पिके लावल्यास तापमान व आर्द्रता राखण्यास मदत मिळते..Sitaphal Farming : पक्वतेनुसार सीताफळांची काढणी, प्रतवारीवर भर.पाणी व्यवस्थापनभारी जमिनीत पाच ते सहा व हलक्या जमिनीत तीन ते चार दिवसांनी जमिनीच्या मगदुरानुसार संरक्षित पाणी द्यावे.फळवाढीच्या काळात पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.ठिबक सिंचनाच्या नळ्या झाडाच्या घेरालगत अंथरून घ्याव्यात.शिफारशीप्रमाणे खतमात्रा देऊन पाणी सुरु करावे.पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनपद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची ५० ते ७० टक्के बचत होते. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो..झाडांची छाटणीफेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात छाटणीची कामे सुरू करावीत.छाटणी करताना मुख्य खोडावर वाढलेले पानसोट, जुनाट-वाळलेल्या व रोगट फांद्या, अनावश्यक तसेच दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात.मागील वर्षी छाटणी केलेल्या फांदीवर आलेल्या नवीन फुटीवरील प्रत्येक फांदीचा जोर पाहून २५ टक्के तर काही वेळेस ५० ते ७५ टक्के भाग काढून टाकावा.छाटणीनंतर नवीन फुट फुटण्यापूर्वी झाडांच्या फांद्या आणि खोडावर एक टक्का बोर्डो मिश्रणाची (एक किलो चुना अधिक एक किलो मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) ताबडतोब फवारणी करावी.झाडाची खोडे जमिनीपासून दोन ते अडीच फुटापर्यंत मोकळी करावीत. खोडावर १० टक्के तीव्रतेची बोर्डो पेस्ट लावावी.छाटणीमुळे झाडांची नियंत्रित वाढ होते आणि झाडावर फळांची संख्या मर्यादित राखता येते. फळे आकाराने मोठी होतात तसेच फळांची गुणवत्ता सुधारते..Sitaphal Market : सीताफळासाठी प्रसिद्ध सांगलीची बाजारपेठ.अन्नद्रव्य व्यवस्थापनपूर्ण वाढ झालेल्या बागेतील झाडांना (पाच वर्षे व त्यापुढील) प्रति झाड ३० ते ४० किलो शेणखत किंवा ६ किलो गांडूळ खत आणि २५० ग्रॅम नत्र, १२५ ग्रॅम स्फुरद व १२५ ग्रॅम पालाश अशी खतमात्रा द्यावी.नत्राची निम्मी मात्रा तसेच स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा पहिले पाणी देताना द्यावी. नत्राची उर्वरित मात्रा त्यानंतर ३० दिवसांच्या अंतराने द्यावी..आगाप बहर का व कशासाठी?नैसर्गिक बहारातील फळे एकाच वेळी बाजारात दाखल होत असल्याने आवक वाढते पर्यायाने बाजारभाव मिळत नाहीत.आगाप बहरातील फळे जुलै-ऑगस्टदरम्यान बाजारात दाखल होतात. या काळात आवक कमी असल्याने चांगला बाजारभाव मिळतो.आगाप बहरादरम्यान साधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात एखादा अवकाळी पाऊस पडल्यास पोषक वातावरण निर्माण होऊन झाडांना भरपूर फळधारणा होते..आगाप बहर कोणी घ्यावा?ज्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ्यात पाणी पुरवठ्याची शाश्वती आहे असे शेतकरी हा बहर घेऊ शकतात.ज्या भागात उन्हाळ्यातील तापमान मर्यादित असते अशा भागातील शेतकरी हा बहर घेऊ शकतात..आगाप बहरातील जोखीमहा बहर उन्हाळ्यात येत असल्याने अनैसर्गिकपणे बहाराचे नियोजन करावे लागते.फळधारणेदरम्यान तापमान व आद्रता नियंत्रणात आणता न आल्यास अपेक्षित फळधारणा मिळत नाही.अपेक्षित फळधारणा मिळूनही पुढे एप्रिल-मे महिन्यांत पाणी कमी पडल्यास फळांची चांगली वाढ होत नाही, पर्यायाने गुणवत्ता राखली जात नाही आणि एकूण उत्पादनही घटण्याची शक्यता असते.अपेक्षित फळधारणा न झाल्यास झाडांची शासकीय वाढ पूर्ण होते आणि पुढे नैसर्गिक बहरात फुलधारणा व फळधारणा होत नाही, त्यामुळे संपूर्ण बहर वाया जाण्याची शक्यता असते.या बहरातील फळांची गुणवत्ता नैसर्गिक बहरातील फळांच्या तुलनेने दुय्यम असते, पर्यायाने पक्व फळे सहजासहजी ओळखता येत नाहीत.- डॉ. प्रदीप दळवे ८९८३३१०१८५- डॉ. युवराज बालगुडे ९८९०३ ८०६५४(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके (अंजीर आणि सीताफळ) संशोधन प्रकल्प,जाधववाडी, ता. पुरंदर जि. पुणे)b.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.