Maharashtra Politics Analysis: शिवसेनेतील पहिल्या फुटीनंतर महाराष्ट्रातील बटबटीत राजकारणाचा नवा अध्याय सुरू झाला आणि तो दुसऱ्या फुटीपर्यंत येऊन ठेपला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. त्यानंतर निष्ठावान म्हणून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या मागे राहिलेले काही जण नंतर फुटीर गोटात सामील झाले. कालांतराने केंद्रीय निवडणूक आयोगाने फुटीर पक्षांना मूळ पक्ष आणि चिन्ह देऊन टाकले. हा संपूर्ण इतिहास महाराष्ट्राला ज्ञात आहे. मात्र महाराष्ट्राला फूट अंगवळणी पडली की काय, अशी शंका आता येऊ लागली आहे. .संपूर्ण सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय आणि इतर क्षेत्रांना इतके राजकीय वातावरणाने घेरले आहे, की त्याशिवाय काही दुसरे दिसत नाही. माणसाशी संबंधित सर्वच क्षेत्रांचे प्रचंड राजकीयीकरण झाल्याने त्यातील आर्थिक हितसंबंध प्रचंड बळकट झाले आहेत. त्यामुळे सर्वच क्षेत्रांची राजकीय पक्षांत विभागणी झाली आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत ती वेगाने झाल्याचे पाहायला मिळते..महाराष्ट्राची राजकीय संस्कृती काय होती याचा ऊहापोह करण्याची येथे गरज नाही. पण शिवसेनेतील दुसऱ्या फुटीनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. हा संताप व्यक्त करणारे कोण आहेत, तर ती आहेत सामान्य माणसे आणि संधीअभावी अस्वस्थ झालेले. या समूहाचा सरकारशी कारणाकारणी संबंध येतो. या समूहांपलीकडे असे अनेक वर्ग आहेत, की ज्यांचा सरकारशी, व्यवस्थेशी आणि राजकारण्यांशी निकटचा संबंध येतो..Maharashtra Politics: शिवसेनेत पुन्हा मोठी फूट? सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा.मात्र हा वर्ग कधी अस्वस्थ झालेला आणि रस्त्यावर उतरलेला दिसत नाही. त्यांच्यासाठी सरकार हे सरकार असते. पक्ष कुणी आला तरी त्यांची कार्यपद्धती ठरलेली असते. एखाद्या शहरात किंवा टोल नाक्याला विरोध केला जातो, तेव्हा सामान्य माणूस आंदोलनात उतरतो. याउलट ज्यांना टोल भरायचा आहे ते काच खाली न करता आपल्या कामाला निघून जातात. अशा व्यवस्थेत ही माणसे पक्ष फुटीवर चवताळतात का, असा प्रश्न पडू शकतो. त्यांच्या चवताळण्यामागे लोकशाही मूल्ये त्यांच्या अबोधावस्थेत अजून शाबूत आहेत..तर अशा लोकशाही मूल्यांना बोथट करण्याचे काम पक्ष फुटीतून निर्माण केले जात आहे. त्याला गोंडस असे ‘ऑपरेशन टायगर’ वगैरे नाव दिले जाऊ शकते. शिवसेनेतील फूट रोखली जात नाही. कारण उद्धव ठाकरे अजूनही भूतकाळात आहे. अख्खा पक्ष फुटून, त्यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर खेचले तरी त्यांनी कुणालाही रोखले नाही. एकेकाळी शिवसेनेचा दरारा असा होता, की फुटिराच्या मनात ‘फ’ हा शब्द सुद्धा कापरे भरवत होता. या दबंग शिवसेनेचे कालांतराने दरबारी शिवसेनेत रूपांतर झाले. त्यामुळेच पक्ष फुटीनंतर ज्यांचे राजकीय आयुष्य उद्धव ठाकरे यांनी घडविले आहे, ते सुद्धा त्यांना वाकुल्या दाखवत होते. बाळासाहेबांचा वारसा असलेल्या शिवसेनेचा पुरता अंदाज आल्याने आगामी काळात ही फुटीची मुळे उखडून फेकण्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागणार आहेत..सध्या जे खासदार शिवसेनेला टाटा करण्याच्या नादात आहेत, त्यांना भविष्याची चिंता सतावते आहे म्हणे. त्यांच्या मतदार संघात सत्ताधारी भरमसाट पैसा ओतून त्यांच्या पराभवाची आतापासून तयारी करत असल्याचे कारण देत आहेत. पण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी एकत्र काम केल्यामुळे त्यांचा विजय झाला होता, प्रवाहाविरुद्ध राहिल्याने त्यांना निवडून दिले होते. मात्र आता त्यांना विरोधात राहायचे नाही. शिवाय सत्तेची चटक इतकी लागली आहे, की त्यांची अवस्था बिनपाण्याच्या माशासारखी झाली आहे..Maharashtra Politics: लढाई अस्तित्वाची अन् सत्तेसाठीची.ठाकरेंचे चुकते कुठे?दिल्लीतील पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने ‘उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांना भेटत नाहीत’ असा प्रश्न केला. यावर खासदार अरविंद सावंत भडकले. मात्र हे दाखविण्यासाठी ठीक आहे. वस्तुस्थिती अशीच आहे. सत्ताधारी भाजप आपल्या कार्यकर्त्यांना रोज कार्यक्रम देते. ते सत्तेत असताना आंदोलन करतात. रोज नवीन कार्यक्रम आणि ठोस विचारसरणी असल्याने पक्ष सत्तेत असूनही सुस्तावलेला नाही. याउलट गेल्या काही वर्षांपासून शिवसेना ठाकरे गट सुस्तावला आहे. कोणताही कार्यक्रम नाही..सरकार विरोधात काय भूमिका घ्यायची हे स्पष्ट नाही, त्यामुळे पक्षात संभ्रमाचे वातावरण आहे. ज्या मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात आरोप केले. महाविकास आघाडी सरकार सत्तेतून जाण्यात ज्यांचा मोठा सहभाग होता, त्यांच्या घरगुती कार्यक्रमाला आदित्य ठाकरे गेले. राजकीय विरोधकाच्या घरी गेले पाहिजे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र त्याला तिलांजली दिली गेली असताना कार्यकर्त्यांच्या भावनांच्या ठिकऱ्या आदित्य यांनी उडविल्या. तेव्हापासून तेही गायब आहेत..आपला पक्ष फुटला आहे, त्याला ऊर्जितावस्था आणण्यासाठी पायाला भिंगरी लावली पाहिजे हे त्यांना कळत नसेल असे नाही. तरीही ते का फिरत नाहीत, याची मतांतरे कार्यकर्त्यांच्या मनात गोंधळ निर्माण करत आहेत. तमिळनाडूत थलपती विजय यांनी जर सत्तेविरोधात शड्डू ठोकला असेल, केरळमध्ये व्ही. डी. सतीशन विरोधी पक्षनेते असताना सत्तेत आलो नाही, तर राजकीय संन्यास घेईन असा पण केला होता. महाराष्ट्राला लढ्याची पार्श्वभूमी आहे, तरीही असा कोणी नेता का शड्डू ठोकत नाही? असा प्रश्न गडद होत आहे..राज्य सरकारने मध्यंतरी कृषी कर्जमाफी केली. या कर्जमाफीवरून शिवसेनेतील बहुतांश नेते आंदोलन करण्याच्या मानसिकतेत होते. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात ‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली होती. या योजनेची वेगाने अंमलबजावणी झाली. त्यामुळे ठाकरे यांचे नाव आदराने घेतले जाते. मात्र सध्या जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत ठाकरे यांनी ‘ब्र’ काढला नाही. त्यामुळे कार्यकर्तेही सुस्त झाले. रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर पक्षाला जाग आली..मध्यंतरी पक्षाच्या व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत कर्जमाफीवर आंदोलन करण्याचे आदेश दिले गेले. मात्र त्या बैठकीत काही आमदारांनी आता वेळ निघून गेल्याचे सांगितले. यात अपवाद केवळ अंबादास दानवे यांचा होता. लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना रोज नवीन प्रश्नांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी विरोधातील आमदारांना त्यांच्या नेत्याची खंबीर साथ लागते. शिवसेनेचे २०, म्हणजे विधानसभेत विरोधी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांपेक्षा सर्वाधिक आमदार आहेत, पण त्यांना ना तेथे नेता आहे, ना विधानभवनाबाहेर’. त्यामुळे कार्यपद्धती बदलली नाही, तर या आमदारांना आता थोपवण्याचे आव्हान असेल.९२८४१६९६३४(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे मुंबई प्रतिनिधी आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.