शिवाजी काकडेRole of Schools in Building a Strong Society: स्वाध्याय परिवाराचे प्रणेते दिवंगत प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी व्यक्तीचे भावजीवन कसे समृद्ध असावे याविषयी एक गोष्ट सांगितली आहे, ती अशी. युद्धकाळात एक जर्मन कवी राष्ट्रासाठी युद्धात उतरतो. या युद्धात जर्मनीचा विजय होतो. विजयी सैनिक पराजित लोकांच्या घरात घुसून लुटालूट करू लागले. कवीही एका घरात गेला. त्या घरात एक स्त्री होती. सैनिकांनी घरातल्या वस्तूंची लूट सुरू केली. कपाट, तिजोरी उघडून जे मिळेल ते न्यायला लागले. एका कपाटात एक लाकडी डबा होता. .तो एका सैनिकाला मिळाला. सैनिक डबा उघडू लागला, त्या वेळी ती स्त्री म्हणली, ‘‘इतर सर्व काही न्या मात्र हा डबा मात्र नेऊ नका.’’ सैनिकाला वाटले या डब्यात नक्कीच काहीतरी मौल्यवान वस्तू असणार. सैनिकाने तो डबा उघडला. डबा उघडताच त्याला त्या डब्यात सुकलेले फूल मिळाले. त्या स्त्रीने ते फूल अतिशय जपून ठेवले होते. त्या सैनिकाला आश्चर्य वाटले. त्याने त्या स्त्रीला विचारले, ‘‘ह्यात काय आहे?.हा डबा तू द्यायला का तयार नव्हतीस?’’ त्यावर ती स्त्री म्हणाली, ‘‘तुमच्याप्रमाणे माझेही पती लढायला गेले आहेत. ते ज्या वेळी लढाईला जायला निघाले त्या वेळी हे गुलाबाचे फूल त्यांनी मला दिले होते. तुम्ही वाटेल ते घेऊन जा, पण हे गुलाबाचे फूल नेऊ नका.’’ त्या स्त्रीला त्या सुकलेल्या फुलासमोर इतर सारे वैभव तुच्छ वाटत होते. सैनिकांच्या दृष्टीने त्या सुकलेल्या फुलाची काहीही किंमत नव्हती..Education Reform: शिक्षणात सुधारणा ही सामूहिक जबाबदारी .परंतु त्या स्त्रीच्या दृष्टीने मात्र ते फूल म्हणजे सर्वस्व होते. याला भावना म्हणतात. मात्र आजच्या शिक्षणाने मानवी जीवनात भावनेचा चुराडा केला आहे. चांगले जीवनमान जगण्यासाठी आवश्यक असणारी संसाधने असताना वाढत जाणारे घटस्फोट, कौटुंबिक कलह, शिक्षक - विद्यार्थी, विद्यार्थी - विद्यार्थी या नातेसंबंधातील उसविणारी वीण, सामाजिकदृष्ट्या असंवेदनशीलता, यामुळे अशांतता निर्माण होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दहा महत्त्वाचे जीवनकौशल्ये सांगितले आहेत. त्यातील महत्त्वाचे कौशल्य म्हणजे व्यक्ती - व्यक्तींमधील सहसंबंध!.कुटुंब, शाळा अन् भावजीवनकौटुंबिक जीवन ही मुलांना सामाजिक - भावनिक अध्ययन शिकविणारी पहिली शाळा असते. मात्र अलीकडील काळात कुटुंब व्यवस्थेत झपाट्याने बदल होत आहेत. विभक्त कुटुंबात तर आजी - आजोबादेखील नकोसे झाले आहेत. बऱ्याच कुटुंबात पती - पत्नी दोघेही नोकरीला आहेत. ज्या घरी पालक उपलब्ध आहे, त्यांच्याकडे देखील मुलांसोबत संवाद साधण्यासाठी वेळ नाही. मुले आणि पालकही यांचा वाढलेला स्क्रीनटाइम एक चिंतेची बाब आहे. व्हिडिओ बदलतो तशा भावना बदलतात..क्षणात क्रोध, प्रेम, दुःख, आनंद, हास्य, विनोद, हिंसा, करुणा या भावना स्क्रोलिंगप्रमाणे बदलत राहतात. कुटुंबात होणारे भावनांचे भरणपोषण होताना दिसत नाही. नातेसंबंधाचा, सामाजिक विकासाचा पाया कुटुंबात योग्य प्रकारे घातला जाताना दिसत नाही. दुर्दैवाने घर म्हणजे खाण्याची आणि झोपण्याची जागा एवढ्यापुरते मर्यादित होताना दिसत आहे. अशा वेळी मुलांचा सामाजिक, भावनिक, नैतिक विकास घडविण्याची जबाबदारी शाळेवर आहे.मात्र परीक्षाकेंद्री शिक्षण, स्पर्धा तर एवढी वाढली, नर्सरीत मुले शिकणाऱ्या पालकांचे ‘माय प्रिन्स / प्रिन्सेस फर्स्ट इन क्लास’ असे दिसणारे स्टेट्स आणि त्यासाठी त्या शाळेने दिलेले प्रोत्साहन आश्चर्य वाटावे असेच आहे. खरं तर या वयात पहिला - दुसरा नंबर घेणाऱ्या मुलांनी कोणते यश मिळविलेले असते आणि त्यांच्यापेक्षा कमी मार्क्स घेतलेल्या मुलांना कोणते अपयश आले आहे हे न समजण्यापलीकडचे आहे. लहानपणापासून नकळतपणे आपण मुलांना प्रतिस्पर्धा, द्वेष, मत्सर याचे शिक्षण देतो. शिक्षणाचा सर्वांगीण विकासाकडून असा एकांगी परीक्षेकडे होणारा प्रवास समाज आणि व्यवस्थेचे अपयश आहे..Agriculture In Education: ‘विषय’ मार्गी लावा.आज पालक, शिक्षक आणि समाजाची मुलांची शिस्त बिघडली अशी ओरड आहे. मात्र याचा दोष मुलांना देऊन चालणार नाही. आपणच मुलांना लहानपणापासून प्रतिस्पर्धा करायला शिकवतो, महत्त्वाकांक्षी बनवतो. मुलांनी अमुकच व्हावे असा दबाव मुलांवर असतो. मुलांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. मुलांच्या स्वतःच्या भावना, मत, आवडीनिवडी, इच्छा, अपेक्षा आणि क्षमता असतात..प्रत्येक मुलाला स्वतःच एक वेगळं व्यक्तिमत्त्व असतं. पालकांच्या, व्यवस्थेच्या बाहेरील अपेक्षा आणि मुलांच्या स्वतःच्या भावना यांच्यात विसंगती निर्माण झाली, की मुलांमध्ये वर्तनसमस्या वाढतात. मग बाहेरच्या शिस्तीचा उदय होतो. मात्र जे पालक, शिक्षक आपल्या मुलांच्या अंगभूत क्षमता ओळखतात. त्या क्षमतांना अभिव्यक्त होण्याची संधी देतात. मुलांशी मैत्री करून निःस्वार्थ प्रेम, प्रेरणा, सुरक्षितता आणि विश्वास देतात अशा मुलांमध्ये स्वयंशिस्त तर निर्माण होतेच, पण एक निकोप आणि सुदृढ नातेसंबंध निर्माण होतात. मुलांशी मैत्री करून संवाद साधल्यास मुले मनमोकळेपणाने बोलतात. त्यातूनच त्यांच्या भावनिक विकासाला सुरुवात होते..सामाजिक - भावनिक विकासबरेच विद्यार्थी शालेय जीवनात बुद्धिमान व यशस्वी म्हणून समोर आले, मात्र प्रत्यक्ष जीवनात अयशस्वी ठरलेले आढळले. बुद्धिमान नसलेले विद्यार्थी प्रत्यक्ष जीवनात यशस्वी ठरून त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. उच्च शैक्षणिक संपादणूक, मूर्त बुद्धिमत्ता यापेक्षा सामाजिक - भावनिक बुद्धिमत्ता मानवी जीवनात महत्त्वाची आहे. आजच्या काळात तर आत्मसंयम आणि करुणा यांचा विकास झाला तरच कुटुंब, शाळा, समाज अधिक मानवीय बनेल. यासाठी मुलांना ‘स्व’ची ओळख करून देणारे शिक्षण गरजेचे आहे..स्वतःच्या व इतरांच्या भावभावना जाणणे, स्वतःसाठी व इतरांसाठी प्रेरणादायी ठरणे, स्वतःच्या व परस्परसंबंधातील भावनांचे नियमन करणे, सामाजिक संबंध, नातेसंबंध जोपासणे, इतरांना समजून घेणे, इतरांचा विकास करणे, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणारे समानानुभूती कौशल्य विकसित करणारे शिक्षण मुलांना देणे गरजेचे आहे. केवळ गुण आणि रोजगार मिळवून देणारे आत्मकेंद्री शिक्षण नको, तर दुसऱ्यासाठी काम करण्याची, सहकार्याची भावना जोपासणारे, आत्मप्रेरणा देऊन आत्मविकास साधून प्रत्येक माणसाला दुसऱ्या माणसाकडे प्रेमाने व आत्मीयतेने पाहण्याचे शिक्षण देणे आवश्यक आहे..१९ जानेवारीच्या ‘ॲग्रोवन’ अंकात सोन्या बैलाची आणि इंद्रसेन मोटे यांची प्रसिद्ध झालेली बातमी तितकीच भावस्पर्शी आहे. अंध झालेल्या सोन्याला इंद्रसेनने कसायाला न विकता १६ वर्षे स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळले. मृत्यूनंतर त्याचे विधिवत अंत्यंसंस्कार केले. आज माणूस माणसापासून दुरावत असताना ही बातमी लाखमोलाची वाटते. शिक्षणातून माणसाचे मन, बुद्धी यांबरोबरच हृदय देखील विकसित होऊन सुजाण, सतर्क, विवेकी, सहृदयी आणि संवेदनशील नागरिक घडावेत यासाठी शिक्षणव्यवस्थेने विशेष प्रयत्न करावे.७८८७५४५५५७(लेखक शिक्षण व्यवस्थेचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.