सचिन कुळकर्णीनदीजोड प्रकल्पाच्या संकल्पनेचा मुख्य आधार हा असतो, की नदीचे समुद्राला मिळणारे पाणी ‘वाया’ जाते. नदीला ‘अतिरिक्त’ पाणी असते हीच मुळात अशास्त्रीय अन् भ्रामक संकल्पना आहे. आधुनिक अभियांत्रिकी दृष्टिकोन नदीला केवळ एक ‘कालव’ किंवा ‘वाहतुकीचे साधन’ समजतो. नदी म्हणजे केवळ ‘पाण्याचा पाइप’ नाही. निसर्गाच्या दृष्टीने नदी ही एक ‘जिवंत परिसंस्था’ आहे. नदी जिवंत राहिली तरच मानव जिवंत राहील. पाणी हे केवळ मानवाच्या उपभोगासाठी नसून ते संपूर्ण पृथ्वीच्या जैवविविधतेसाठी आहे. त्यावर सर्व जिवांचा समान हक्क आहे..‘तेन त्यक्तेन भुंजीथा’ हा चरण ईशावास्य उपनिषदातील पहिल्याच श्लोकात येतो. तो संपूर्ण भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया मानला जातो. त्याचा अर्थ होतो, की निसर्गातील सर्व गोष्टींचा उपभोग हा त्यागाने करावा, हव्यासापोटी नव्हे. वास्तविक बदलत्या हवामानाच्या झळा भोगत असताना निसर्गाप्रति संवेदनशीलता अधिक जागृत हवी. विकासाच्या नावाखाली हव्यास नको. पण सरकारचा दृष्टिकोन तसा नाही. उदाहरणादाखल वैनगंगा ते नळगंगा हा प्रस्तावित प्रकल्प पाहता येईल. .River Linking Project: नद्या जोडताना निसर्ग तुटतोय का? .या नदीजोड प्रकल्पासाठी सुमारे ९५ हजार कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची एकूण लांबी ४८८.२८ कि.मी. इतकी असेल. प्रामुख्याने पावसाळ्याच्या दिवसात (१२० दिवस जेव्हा वैनगंगा नदीला पूर येतो किंवा पाणी ‘जादा’ असते) ६२.५७ टीएमसी पाणी ‘अतिरिक्त’ म्हणून निश्चित करण्यात आले. हे पाणी वळवले जाईल.या प्रकल्पामध्ये सहा ते आठ ठिकाणी ‘उपसा योजना’ राबवण्यात येणार आहेत. म्हणजेच, वीज वापरून पाणी मोठ्या पंपांद्वारे वर उचलले जाईल आणि मग पुढे कालव्याने सोडले जाईल..यात असा आशावाद व्यक्त केला जातोय, की एकूण ६,११,९५० हेक्टर क्षेत्राची सिंचन क्षमता निर्माण होईल आणि प्रत्यक्षात ४,०४,२८१ हेक्टर लाभक्षेत्र ओलिताखाली येईल. तसेच औद्योगिक वापरासाठी १९१ दशलक्ष घनमीटर पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. विदर्भातील आठ जिल्हे आणि १५ तालुक्यांना या योजनेचा थेट फायदा होईल, असे सांगितले जात आहे. गोसी खुर्द धरण ते लोअर वर्धा प्रकल्प, लोअर वर्धा प्रकल्प ते काटेपूर्णा प्रकल्प आणि काटेपूर्णा प्रकल्प ते नळगंगा प्रकल्प अशा तीन टप्प्यांत हे काम अपेक्षित आहे. यातील प्रत्येक मुद्दा वादांकित ठरू शकतो..River Linking Project: नदीजोड प्रकल्पामुळे शाश्वत पाण्याचा स्त्रोत.जगाच्या इतिहासात भारतीय जलसंस्कृती ही अजरामर आहे, म्हणून भारत टिकला आहे. अन्यथा, प्राचीन मेसोपोटेमिया संस्कृती, इजिप्शियन संस्कृती, माया संस्कृती, ख्मेर साम्राज्य - अंगकोर वाट संस्कृती ते अगदी सिंधू संस्कृतीचा उदयास्त आम्हाला इतिहासातून मोठी शिकवण देतोय..निसर्गचक्राला धक्कामानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचे चक्र बिघडल्याची तीन प्रमुख उदाहरणे आहेत ःसोव्हिएत युनियन (अरलं समुद्र) ः ‘अमू’ आणि ‘सिर’ नद्यांचे पाणी कापूस शेतीसाठी वळवल्याने जगातील चौथा मोठा अरलं समुद्र ९० टक्के सुकला. त्यामुळे मासेमारी नष्ट होऊन तो ‘जहाजांचे स्मशान’ बनला आणि विषारी धुळीमुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले.चीन (दक्षिण-उत्तर जल हस्तांतरण) ः यांगत्से नदीचे पाणी उत्तरेकडे नेल्याने साडेतीन लाख लोकांचे विस्थापन झाले. यामुळे दक्षिणेकडील जलचरांना धोका निर्माण झाला असून, पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न उद्भवला आहे.अमेरिका (कॅलिफोर्निया डेल्टा) ः उत्तरेकडील पाणी दक्षिणेकडे वळवल्याने नद्यांचा प्रवाह उलटला. परिणामी, ‘डेल्टा स्मेल्ट’ आणि ‘सॅल्मन’सारख्या प्रजाती नष्ट होत असून सागरी क्षारता वाढली आहे..River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस.काय धडा घेणार?एखाद्या नदीत जास्त पाणी आहे आणि दुसऱ्या नदीत नाही, म्हणून जास्त पाणी असलेल्या नदीतले पाणी नसलेल्या नदीकडे वळविणे ही संकल्पना मुळात पूर्णपणे अशास्त्रीय आणि चुकीची आहे. जेव्हा नदीचे पाणी समुद्राला जाऊन मिळते, तेव्हा आपण त्याला ‘वाया गेलेले’ किंवा ‘जादा’ पाणी म्हणतो. पण निसर्गाच्या दृष्टीने हे पाणी कधीच वाया जात नाही. समुद्राला मिळणारे गोड्या पाण्याचे प्रवाह हे सागरी जीवसृष्टी, खारफुटीची जंगले आणि डेल्टा (त्रिभुज प्रदेश) टिकविण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात..स्टॉकहोम वॉटर प्राइज पुरस्कार प्राप्त जागतिक पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सांड्रा पोस्टेल यांच्या मते, ‘आम्ही विसरलो आहोत की पाणी हे केवळ आपल्यासाठी नसून ते संपूर्ण सृष्टीला जिवंत ठेवण्यासाठी आहे. जेव्हा आपण निसर्गाला देतो, तेव्हाच निसर्ग आपल्याला परत देऊ शकतो.’ पाणी किंवा एकूणच निसर्ग असो; त्याचे उपभोगकर्ते केवळ मानव जीव नसून सर्व जीवसृष्टी आहे. भारतीय तत्त्वज्ञानात ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘सर्वभूतहिते रता’ अशी संकल्पना म्हणूनच मांडली आहे..River Linking Project: दुष्काळी भागातील सिंचनासाठी नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य.डॉ. सांड्रा पोस्टेल यांच्या Pillar of Sand : Can The Irrigation Miracle Last?’ या पुस्तकातील ‘Water for Nature’ (निसर्गासाठी पाणी) हे प्रकरण नदी जोड प्रकल्प आणि मोठ्या धरणांच्या विरोधात सर्वांत भक्कम वैज्ञानिक आणि नैतिक तर्क मांडते. त्यांचे सर्वांत महत्त्वाचे मत असे आहे, की आधुनिक अभियांत्रिकी दृष्टिकोन नदीला केवळ एक ‘कालवा’ किंवा ‘वाहतुकीचे साधन’ समजतो. परंतु निसर्गाच्या दृष्टीने नदी ही एक ‘जिवंत परिसंस्था’ आहे. जर आपण नदीचे सर्व पाणी मानवी वापरासाठी (शेती किंवा उद्योग) वळवले, तर त्या नदीवर अवलंबून असलेले मासे, वनस्पती, पक्षी आणि सूक्ष्मजीव नष्ट होतात. नदीला तिचा स्वतःचा ‘आरोग्य राखण्याचा हक्क’ आहे..पर्यावरणीय प्रवाहाची संकल्पना मांडताना त्यांनी तांत्रिक संकल्पनेवर भर दिला आहे. त्यांच्या मते, नदीतून किती पाणी काढले जावे यापेक्षा नदीत किती पाणी शिल्लक ठेवणे गरजेचे आहे, हा विचार प्राथमिक असायला हवा. जर नदीचा प्रवाह एका विशिष्ट पातळीच्या खाली गेला, तर नदी स्वतःला स्वच्छ करण्याची क्षमता गमावते. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढते आणि ती मृत होते..River Linking Project: सिंचन प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध.नदीजोड प्रकल्पाचा मुख्य आधार हा असतो ,की नदीचे समुद्राला मिळणारे पाणी ‘वाया’ जाते. त्यांनी या मताचा कडाडून विरोध केला आहे. नदीचे गोड पाणी जेव्हा समुद्राला मिळते, तेव्हा तिथे पोषक तत्त्वांचा साठा तयार होतो. हा भाग माशांच्या प्रजननासाठी (Breeding ground) अत्यंत महत्त्वाचा असतो. जर आपण पाणी वळवले, तर समुद्राची क्षारता वाढते, ज्यामुळे किनारपट्टीवरील मँग्रोव्हज (खारफुटीची वने) आणि मत्स्यव्यवसाय नष्ट होतो. नदीचा प्रवाह कमी झाल्यामुळे जलचर प्राण्यांच्या स्थलांतराचे मार्ग बंद होतात. अनेक मासे प्रजननासाठी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जातात. धरणे किंवा पाणी वळविल्यामुळे ही साखळी तुटते. जेव्हा एक जलचर प्रजाती नष्ट होते, तेव्हा त्यावर अवलंबून असणारी संपूर्ण अन्नसाखळी विस्कळीत होते..नदीजोड प्रकल्पाचे समर्थक म्हणतात, की नद्या जोडल्यामुळे दुष्काळी भागाला पाणी मिळेल. पण पोस्टेल यांचा प्रश्न असा आहे, की एका भागाचा विकास करण्यासाठी दुसऱ्या भागाची नैसर्गिक संपत्ती कायमची नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला आहे का? त्यांच्या मते, हा ‘तात्पुरता विकास’ असून तो भविष्यात मोठ्या संकटांना आमंत्रण देणारा आहे..River Linking Project: नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगावचा समावेश करावा.मानवाचा निसर्गावर विजय मिळविण्याचा हा प्रयत्न आहे. मानवाला वाटते, की आपण तंत्रज्ञानाने नद्यांच्या दिशा बदलू शकतो. पण पोस्टेल यांच्या मते, निसर्गाची स्वतःची एक कार्यपद्धती आहे. जेव्हा आपण नद्या जोडतो, तेव्हा आपण दोन वेगवेगळ्या हवामान क्षेत्रांतील पाणी एकत्र करतो, ज्यामुळे अनपेक्षित पर्यावरणीय बदल घडू शकतात. भारतातील केन-बेतवा प्रकल्पाचे उदाहरण घेतल्यास, पोस्टेल यांनी मांडलेले मुद्दे तिथे तंतोतंत लागू होतात. या प्रकल्पामुळे ‘पन्ना व्याघ्र प्रकल्पा’तील हजारो हेक्टर जंगल नष्ट होणार आहे. वाघ आणि इतर वन्यजीवांसाठी ही घातक बाब आहे. नदी जिवंत राहिली तरच मानव जिवंत राहील. पाणी हे केवळ मानवाच्या उपभोगासाठी नसून ते संपूर्ण पृथ्वीच्या जैवविविधतेसाठी आहे. त्यावर सर्व जिवांचा समान हक्क आहे. आईला सर्व मुले समान असतात त्याप्रमाणे नदी सर्व जिवांना समान लेखते. विश्वात केवळ भारतीय संस्कृती नदीला मातेची उपमा देतो, हे विसरता कामा नये..मॉन्सूनवर परिणामभारत आपल्या पाणी आणि अन्नाच्या गरजांसाठी ८० टक्क्यांपेक्षा जास्त मॉन्सूनवर अवलंबून आहे. आयआयटी, मुंबई येथील प्रा. सुबिमल घोष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘नदीजोड प्रकल्पाचा भारतीय मॉन्सूनवर पडणारा प्रभाव’ यावर संशोधन केले आहे. त्यांच्या अभ्यासाचा निष्कर्ष असा आहे, की कालवा आणि जलाशयांच्या माध्यमातून नदी खोरे जोडल्याने जलसुरक्षा सुधारू शकते, परंतु यामुळे जमीन आणि वातावरण यांच्यातील नैसर्गिक परस्पर क्रियेत बिघाड होऊ शकतो. जमिनीची पृष्ठभाग आणि त्यावरील वातावरण यांच्यातील ऊर्जा आणि पदार्थांची देवाणघेवाण वातावरणीय प्रक्रियांना नियंत्रित करते. सिंचनामुळे बाष्पोत्सर्जन (Evapotranspiration) वाढते, त्यामुळे हवेत आर्द्रता वाढते आणि पावसाच्या रूपात ती पुन्हा जमिनीवर येते, ज्याला ‘पुनर्चक्रित वर्षा’ म्हणतात. भारतीय मॉन्सूनच्या एकूण पावसात याचा वाटा २५ टक्क्यांपर्यंत असतो..बाष्प वाढल्यामुळे काही कोरड्या भागांत अचानक अतिवृष्टी होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पुराची समस्या गंभीर होऊ शकते. नद्यांचे गोड पाणी समुद्रात जाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान आणि क्षारता बदलेल, ज्याचा थेट परिणाम मॉन्सून तयार होण्याच्या प्रक्रियेवर होईल. नदी-जोडणीमुळे सिंचन वाढल्याने या नैसर्गिक चक्रात बदल होईल. मोठ्या प्रमाणावरील जल प्रकल्पांचे व्यवस्थापन करताना केवळ अभियांत्रिकी विचार न करता, जमीन आणि वातावरणाच्या जटिल संबंधांचा शास्त्रीय अभ्यास करणे देशाच्या शाश्वत विकासासाठी गरजेचे आहे. बदलत्या वातावरणात मॉन्सूनचे चिंतन हा स्वतंत्र विषय आहे. त्यात नद्या जोडणाऱ्यासारख्या कृतींनी आणखी भर पडली तर त्यास कोण जबाबदार राहील? थोडक्यात, असे प्रकल्प करताना त्यांचा चौफेर अभ्यास करून पर्यावरणपूरक सर्वांगीण शाश्वत विकास साधण्याची दृष्टी अंगी बाणवायला हवी.skulkarni624@gmail.com(लेखक वाशीम येथील जलहक्क चळवळ या संस्थेचे अध्यक्ष आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.