Latur News: राज्य सरकारने अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांची चांगलीच थट्टा मांडली आहे. अतिवृष्टीच्या अनुदानाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी सुरु असतानाच दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी जाहीर रब्बीसाठीच्या हेक्टरी दहा हजाराच्या अनुदानाचा घोळ झाला आहे. अनुदानाबाबतचा निर्णय प्रशासनातील अधिकाऱ्यांना नीट समजून न आल्यामुळे काही भागात शेतकऱ्यांना बाधित क्षेत्राच्या शंभर टक्के तर काही भागात साठच टक्के अनुदान खात्यावर जमा झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला असून उर्वरित चाळीस टक्के अनुदान आता मिळणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे..लातूर व धाराशिव जिल्ह्यात या वर्षी मे महिन्यापासून पावसाने मोठे नुकसान केले. मेमध्ये अवकाळी पावसाने पीक व फळबागांचे नुकसान केले. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे खरिपातील पिके, फळबागा, भाजीपाला पिके व जमिनीचेही नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाकडून भरपाईसाठी अनुदानाची मागणी करण्यात आली..Rabi Subsidy: रब्बीसाठी ७८४५ कोटी मंजूर.त्यानुसार अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. यातूनच सरकारने भरपाईसाठी पॅकेज जाहीर केले. त्यानुसार दिवाळीपूर्वी भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार होती. मात्र अनेक शेतकरी अजूनही भरपाईपासून वंचित आहेत. सुरुवातीला ई-केवायसीचे बंधन घालण्यात आले. त्यानंतर ते हटवून फार्मर आयडी सक्तीचा करण्यात आला. तरीही काही शेतकऱ्यांना भरपाईच्या अनुदानाचा लाभ अद्याप मिळालेला नाही. काही शेतकऱ्यांना ऑगस्टमधील तर काही शेतकऱ्यांना सप्टेंबरमधील अतिवृष्टीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही..काही शेतकऱ्यांना दोन्ही महिन्यांतील अतिवृष्टीचे अनुदान मिळालेले नाही. अनेकांच्या फार्मर आयडीला मागील महिन्यात मंजुरी दिल्याचे दिसत आहे. अतिवृष्टीच्या अनुदानाचा घोळ सुरू असताना मंगळवारी (ता. ४) सरकारने रब्बीतील बियाणे व अन्य खर्चासाठी शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान जाहीर केले. हे अनुदानही मागील दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरवात झाली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांच्या खात्यात बाधित क्षेत्राच्या शंभर टक्के तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात बाधित क्षेत्राच्या ६० टक्केच अनुदान जमा होत आहे. यामुळे शेतकरी संभ्रमात असून सरकारकडून उर्वरित चाळीस टक्के रब्बीचे अनुदान जमा होणार नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे..Farmer Subsidy: अडीच हजार शेतकरी अनुदानापासून वंचित.बाधित क्षेत्राचा घोळच घोळकाही तालुक्यांनी अतिवृष्टीच्या अनुदानाची मागणी करताना ऑगस्टमध्ये बाधित क्षेत्राच्या साठ टक्के तर सप्टेंबरमध्ये उर्वरित चाळीस टक्के मागणी केली. यामुळे काही शेतकऱ्यांना बाधित क्षेत्राच्या साठ टक्के अनुदान मिळाले असून चाळीस टक्के अनुदान अजून मिळालेले नाही. याच प्रमाणात आता रब्बीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. तीन हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी दीड हेक्टरच्या क्षेत्राचे रब्बीचे अनुदान मिळत आहे..काही तालुक्यांनी सरसकट बाधित क्षेत्राच्या शंभर टक्के अनुदानाची मागणी केल्यामुळे या शेतकऱ्यांना बाधित क्षेत्राच्या शंभर टक्के व तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान मिळत आहे. अतिवृष्टीनंतर आता रब्बीच्या अनुदानाचा घोळ झाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या बाधित क्षेत्राच्या प्रमाणात अनुदान मिळेल की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून लवकरच सर्व अनुदान जमा होईल, असे शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यात येत आहे..लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. यामुळे तहसील कार्यालयाने बाधित क्षेत्राच्या शंभर टक्के भरपाईसाठी अनुदानाची मागणी केली. त्यानुसार तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना बाधित क्षेत्राच्या शंभर टक्के अनुदान मिळत आहे. त्यानुसार रब्बीचेही अनुदान बाधित क्षेत्राच्या शंभर टक्के जमा होत आहे. तालुक्यातील ८६ हजार शेतकऱ्यांसाठी ७० कोटी रब्बी अनुदान मंजूर असून आतापर्यंत ६५ हजार १६५ शेतकऱ्यांना ५२ कोटीचे अनुदान वितरित झाले आहे. अन्य तालुक्यांबाबत मला माहिती नाही.सौदागर तांदळे, तहसीलदार, लातूर..ऑगस्ट व सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, खरडून गेलेल्या जमिनीची भरपाई, रब्बीचे अनुदान आदी संबंधांना तेराहून अधिक शासन निर्णय निघाले आहेत. त्यानुसार सरकारकडे वेळोवेळी निधीची मागणी केली आहे. तहसीलदारांनी मागणी केल्यानुसार मंजूर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहेत. बाधित क्षेत्राच्या साठ किंवा शंभर टक्के रब्बी अनुदान जमा होत असल्याबाबत मला माहिती नाही. कीर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी, धाराशिव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.