डॉ. सुयोग खोसे, डॉ. मधुकर मोरे Water Conservation: मृद आणि जलसंधारण म्हणजे पावसाचे पाणी अडवणे म्हणजे भूजल वाढवणे, मातीचे संरक्षण करणे आणि दुष्काळाविरुद्ध तयारी करणे होय. मॉन्सूनपूर्व केलेली खोल नांगरट, बांधबंदिस्ती, चर, दगडी बांध आणि शेततळी यांसारखी कामे केवळ एका हंगामासाठी नाहीत तर पुढील अनेक वर्षांसाठी फायदेशीर ठरतात. पावसाचा प्रत्येक थेंब शेतात अडवला तरच कोरडवाहू शेती टिकेल, भूजल पातळी वाढेल आणि शेती अधिक शाश्वत बनेल. .गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. पूर्वी तीन-चार महिन्यांत पडणारा पाऊस आता काही दिवसांतच कोसळतो. कमी कालावधीत अतिवृष्टी आणि नंतर दीर्घ कोरडे कालखंड यामुळे शेतीसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. सध्या विहिरी, कूपनलिका आणि तलावांनी तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने जून महिन्यात महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्याचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. या कालावधीत योग्य मशागत आणि मृद् व जलसंधारणाची कामे केल्यास पावसाचे ३० ते ४० टक्के पाणी अडवून जमिनीत मुरवता येते. अन्यथा हेच पाणी सुपीक मातीचा थर घेऊन वाहून जाते. मातीचा वरचा सुपीक थर एकदा वाहून गेला, की तो पुन्हा तयार होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब अडवणे ही काळाची गरज बनली आहे..Pre Monsoon Farming Tillage: मॉन्सूनपूर्व मशागतीला वेग.ज्या प्रकारे आपण पैशांची बचत बँकेत करतो, त्याचप्रमाणे पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल स्वरूपात साठवणे म्हणजेच ‘पाण्याची बँक’ होय. हीच पाण्याची साठवण उन्हाळ्यात विहिरी, बोअरवेल आणि पिकांना आधार देते. त्यामुळे मॉन्सूनपूर्व काळात मृद व जलसंधारणाची कामे करणे अत्यंत आवश्यक आहे..खोल नांगरटगेल्या १० ते १५ वर्षांपासून रोटाव्हेटर आणि कल्टिव्हेटरच्या अतिवापरामुळे बहुतांश शेतांमध्ये केवळ ४ ते ५ इंच खोलीपर्यंत मशागत केली जाते. त्यामुळे ६ ते ८ इंच खोलीवर दगडासारखा घट्ट थर तयार होतो. यालाच ‘प्लाऊ पॅन’ किंवा ‘हार्डपॅन’ म्हणतात.पाऊस पडल्यावर पाणी या थरावर थांबते. केवळ २ ते ३ इंच पाणी मुरते आणि उर्वरित पाणी वाहून जाते. त्यामुळे मातीची धूप वाढते आणि पिकांना दीर्घकाळ ओलावा मिळत नाही.यासाठी २ किंवा ३ फणी एमबी नांगराने ८ ते १० इंच (२० ते २५ सेंमी) खोल नांगरट करणे आवश्यक आहे. नांगरट नेहमी उताराला आडवी करावी. उताराच्या दिशेने नांगरट केल्यास पाणी पाटासारखे वाहून जाते. ट्रॅक्टरचा वेग ४ किमी/तास असावा. वेग जास्त असल्यास योग्य खोल मशागत होत नाही..खोल नांगरटीमुळे माती भुसभुशीत होते, मातीतील हवेचे प्रमाण वाढते आणि सूक्ष्मजीवांची क्रिया सुधारते. पाणी जिरवण्याचा दर ६ मिमी/तास वरून १५ मिमी/तासपर्यंत वाढतो. मुळांची वाढ अधिक खोलवर होते. उदाहरणार्थ, कापसाची मुळे १ मीटरऐवजी १.५ मीटरपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे पिकांची दुष्काळ सहनशक्ती वाढते.यासाठी एकरी सुमारे १४०० ते १६०० रुपये खर्च येतो. पर्याय म्हणून सबसॉयलर वापरून १५ इंच खोलीवर ३ फूट अंतराने चिरा मारल्यासही जलसंधारणासाठी चांगला फायदा होतो..Pre Monsoon Preparation: शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांचे आतापासूनच नियोजन करा: जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार.सलग समतल चरडोंगर उतार आणि पडीक जमिनीत पावसाचे पाणी वेगाने वाहून जाते. त्यासोबत दरवर्षी प्रति हेक्टरी ४० टनांपर्यंत सुपीक माती वाहून जाते. एकदा माती वाहून गेल्यानंतर ती पुन्हा तयार होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात.ज्या ठिकाणी जमिनीचा उतार ६ टक्क्यांपेक्षा अधिक असेल, तेथे बांधाऐवजी सलग समतल चर उपयुक्त ठरतात. हे चर उताराला आडवे व समपातळीवर ६० सेंमी रुंद आणि ३० सेंमी खोल खोदावेत.चरांमुळे पाण्याचा वेग कमी होतो, पाणी जागीच मुरते आणि भूजल पुनर्भरण वाढते. तसेच डोंगराळ भागात गवत व झाडांची वाढ सुधारते. वृक्ष लागवडीतील रोपांची जगण्याची टक्केवारीही वाढते..अनगड दगडी बांधघळी, नाले आणि पाण्याचा वेग जास्त असलेल्या ठिकाणी अनगड दगडी बांध उपयुक्त ठरतात. नाल्याच्या रुंदीप्रमाणे सुमारे १ मीटर उंचीचे दगडी बांध बांधल्यास वाहत्या पाण्याचा वेग कमी होतो.यामुळे गाळ अडतो, मातीची धूप कमी होते आणि पाणी जमिनीत जिरते. काही ठिकाणी वायर जाळीतील ‘गॅबियन स्ट्रक्चर’ अधिक टिकाऊ पर्याय ठरू शकतात..कपार्टमेंट बंडिंगहे कोरडवाहू शेतीतील जीवनदायी तंत्र आहे. बांधामुळे पावसाचे पाणी शेतातच मुरते. मातीची धूप कमी होते. त्यामुळे पिकाला जास्त काळ ओलावा मिळतो. कोरडवाहू शेतीसाठी हे अत्यंत गरजेचे आहे. तसेच बांधामुळे आपल्या शेताची हद्द नक्की होते.बांधाचा उपयोग शेतात जाण्या-येण्यासाठी, अवजारे नेण्यासाठी होतो. बांधावर गवत, झुडपे, झाडे जगतात. मित्र कीटक, पक्षी यांना आसरा मिळतो. साधारणपणे २ ते ६ टक्के उतार असलेल्या जमिनीवर बांध घेतले जातात. उताराला आडवे, समपातळी रेषेवर बांध घालावेत. बांध ते बांध अंतर जमिनीच्या उतारावर अवलंबून असते..उन्हाळ्यात बांध घालावेत. माती वाळलेली असते, काम पक्के होते. बांध घालताना माती थराथराने दाबून टाकावेत. सुमारे ६० ते १०० मीटरवर एक मीटर रुंद दगडी पिचिंगचा सांडवा ठेवावा. त्यामुळे जास्तीचे पाणी सुरक्षितपणे बाहेर जाईल. बांधावर दशरथ गवत, गिरिपुष्प, शेवरी, बांबू, साग लावा. मुळांमुळे बांध घट्ट राहतो, अतिरिक्त उत्पन्न मिळते. पावसाळ्यापूर्वी बांधावरील बिळे, भगदाडे बुजवावीत. कृषी विभागाच्या ‘पोकरा’ आणि मनरेगा योजनेतून बांधबंदिस्तीसाठी अनुदान मिळते..शेततळेशेततळ्यामध्ये वाहून येणारे पाणी योग्य नियोजनाने साठवून संरक्षित सिंचनासाठी वापरता येते. मात्र योग्य देखभाल न केल्यास ३ ते ४ वर्षांत तळे गाळाने भरते आणि त्याची साठवण क्षमता कमी होते.एक मीटर गाळ साचल्यास शेततळ्याची क्षमता जवळपास ३० टक्क्यांनी कमी होऊ शकते.उन्हाळ्यात तळ्यातील गाळ पूर्ण कोरडा झाल्यावर तो काढून शेतात टाकावा. हा गाळ वरच्या शेतातून वाहून आलेली सुपीक माती असते. त्यामुळे खतांची बचत होते..शेततळ्याचे इनलेट आणि आउटलेट नियमित साफ करावेत. पाणी येणाऱ्या मार्गातील काटक्या, पालापाचोळा आणि गाळ काढावा. इनलेटला दगडी पिचिंग आणि जाळी बसवल्यास कचरा आत जाणार नाही.सांडव्यावरील दगडी पिचिंग निघाले असल्यास ते तातडीने दुरुस्त करावे. अतिरिक्त पाणी सुरक्षितपणे बाहेर गेले नाही तर बांध फुटण्याचा धोका निर्माण होतो.शेततळ्यातील पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. तसेच तळ्याभोवती वृक्षलागवड केल्यास बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.- डॉ. सुयोग खोसे ९४०३६१३४७१(विषयतज्ज्ञ, कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.