Sangali Pomegranate Market: राज्यात अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मृग बहरातील डाळिंब बागांना फटका बसल्याने उत्पादन घटले. मात्र हंगामाच्या सुरुवातीपासूनच बाजारपेठेत आवक मर्यादित राहिल्याने डाळिंबाचा तुटवडा निर्माण झाला. चांगले दर मिळाल्याने यंदाचा डाळिंबाचा हंगाम उत्पादकांना दिलासादायक ठरला आहे. .गत वर्षी ऐन बहरावेळी झालेला पाऊस आणि त्यानंतर आलेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका डाळिंब पिकाला बसला होता. त्यातच बदलत्या हवामानामुळे फुलगळ, कुज आणि बागांचे सेटिंग होण्यात अडथळे निर्माण झाले. या साऱ्या संकटांमुळे यंदा डाळिंबाचे उत्पादन तब्बल ४० टक्क्यांपर्यंत घटले. प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी बागांचे काटेकोर व्यवस्थापन करून उत्पादन टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र निसर्गाच्या आपत्तीमुळे डाळिंबाचा हंगाम काहीसा लांबणीवर पडला, तसेच फळांचे वजन व दर्जाही कमी-अधिक प्रमाणात राहिला..Pomegranate Market: डाळिंब उत्पादकांना शेवटच्या टप्प्यात दराने तारले.अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन घटल्याने बाजारात डाळिंबाची आवक मंदावली. हंगामाच्या प्रारंभापासूनच बाजारपेठेत डाळिंबाची आवक कमी राहिली. त्यामुळे मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाली. परिणामी सुरुवातीपासूनच डाळिंबाला चांगले दर मिळू लागले. हंगामाच्या प्रारंभी प्रति किलो १०० ते १७५ रुपये असा दर होता. नोव्हेंबरपासून मृग बहरातील डाळिंबाची विक्री सुरू झाली असून, त्यानंतर दर टिकून राहिले..बाजारात मागणी कायम राहिल्याने आणि तुटवडा असल्याने डाळिंबाच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ झाली. जवळपास एका महिन्यात सरासरी प्रति किलो ५० रुपयांनी दर वाढले. डिसेंबरमध्ये दर्जेदार डाळिंबाचे दर १७५ ते २२५ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले. या कालावधीत दर स्थिर राहिले. गेल्या पंधरा दिवसांत पुन्हा एकदा डाळिंबाच्या दरात सरासरी २५ रुपयांनी वाढ झाली आहे. उत्पादन कमी असले तरी चांगले दर मिळाल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत तीन वेळा दर वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले..Pomegranate Farming: उथळ, खडकाळ, नापीक जमिनीत डाळिंब उत्पादन.यंदाच्या मृग बहरातील डाळिंबाचा हंगाम आता आटोपला आहे. याच कालावधीत सामान्यतः गुजरात आणि राजस्थान या राज्यांतील डाळिंब देशभरातील बाजारपेठेत येतात. मात्र गुजरातमध्ये झालेल्या नुकसानामुळे आणि राजस्थानमध्येही उत्पादन कमी असल्याने या राज्यांतून अपेक्षित आवक झाली नाही. त्यामुळे बाजारात दरात मंदी आली नाही आणि याचा थेट फायदा महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना झाला..अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे डाळिंबाचे उत्पादन घटले. बाजारात आवक कमी असल्याने दर चांगले मिळाले. काही काळ दर स्थिर होते, तर नंतर वाढही झाली. डाळिंबाच्या वाढत्या दराने आम्हाला तारले आहे.- विजय मरगळे, डाळिंब उत्पादक शेतकरी, तडवळे, ता. आटपाडी, जि. सांगली.डाळिंब दर प्रति किलो (दृष्टिक्षेप)एक नंबर २०० ते २२५दोन नंबर १७५ ते २००तीन नंबर १५० ते १७५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.