युवराज पाटीलSaint Dnyaneshwar and Tukaram Palkhi: एकेकाळी अत्यंत साध्या, कष्टमय आणि खडतर पायी यात्रेच्या स्वरूपात अस्तित्वात असलेला पालखी सोहळा काळानुसार आधुनिकतेचा स्वीकार करत आहे. आज लाखो वारकरी, शेकडो दिंड्या, डिजिटल नियंत्रण व्यवस्था, ड्रोन निरीक्षण, प्रशस्त चौपदरी रस्ते आणि अत्याधुनिक सुविधा यांनी नटलेल्या या सोहळ्याचा आत्मा आजही भक्तीचाच आहे. संतांच्या काळात वारकरी टाळ-मृदंग, वीणा, भगवी पताका आणि संतांच्या पादुका किंवा स्मृतिचिन्हांसह पायी पंढरपूरकडे प्रस्थान करत. .गावोगावी मुक्काम, रात्री भजन-कीर्तन, पहाटे हरिनामाचा गजर आणि पुन्हा प्रवास... ना रथ, ना चोपदार, ना नियोजित मुक्काम, ना प्रशासकीय व्यवस्था... विठ्ठलनाम हाच आधार आणि सामूहिक भक्ती हीच त्यांची ताकद होती.संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांनी वारीची सूत्रे हाती घेतली. त्यांनी वारकऱ्यांचे संघटन करून वारीला अधिक नियमित आणि शिस्तबद्ध स्वरूप दिले. वारकरी परंपरेतील काही उल्लेखांनुसार, प्रारंभी काही काळ दोन्ही संतपरंपरांमध्ये ‘ज्ञानोबा-तुकोबा’ या संयुक्त गजरासह एकात्म भावाने वारी होत असे..त्या काळात पालखी मार्ग हा मुख्यतः मातीचे रस्ते, जंगलातील पायवाटा, नदीकाठचे मार्ग आणि व्यापारी घोडेमार्ग यांवर आधारित होता. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांमधून वारकऱ्यांना मार्ग काढावा लागे. काही ठिकाणी होड्यांचा आधार घेतला जाई. एकत्रित भक्ती परंपरेच्या देहूची संत तुकाराम महाराज पालखी आणि आळंदीची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी अशा दोन स्वतंत्र परंपरा विकसित झाल्या. दोन्ही संतांचे धार्मिक केंद्र, अनुयायी, दिंड्या आणि मानकरी वेगळे होत गेले..Sant Tukaram Maharaj Palkhi: टाळ-मृदंगाच्या गजरात तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान.त्यामुळे स्वतंत्र पालख्या, स्वतंत्र मुक्काम आणि स्वतंत्र शिस्त निर्माण झाली. देहूहून निघणारी वारी साधारण देहू - पुणे - हडपसर - सासवड - जेजुरी - लोणंद - फलटण परिसर - माळशिरस - वाखरी - पंढरपूर या पट्ट्यातून जाई. आता ती देहू, पिंपरी-चिंचवड, पुणे, हडपसर, लोणीकाळभोर, यवत, वरवंड, पाटस, उंडवडी गवळ्याची, बारामती, सणसर, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, आकलूज, बोरगाव, पिराची कुरोली, वाखरी-पंढरपूर अशी जाते. आळंदीहून निघणारी माउलींची वारी आळंदी - पुणे - दिवे घाट - सासवड - जेजुरी - लोणंद - तरडगाव - नातेपुते - माळशिरस - वाखरी - पंढरपूर या मार्गाने पुढे सरकते..पालखी सोहळ्याचे संघटनपालखी सोहळ्याला संघटित, शिस्तबद्ध आणि सार्वजनिक स्वरूप देण्याचे मोठे श्रेय ग्वाल्हेरकर शिंद्यांच्या सैन्यात सरदार म्हणून काम केलेल्या हैबतबाबा आरफाळकर यांना जाते. त्यांनी तीच लष्करी शिस्त वारीतही उतरवली. पालखी सोहळ्याची रथ, दिंडी, चोपदार आणि मानव व्यवस्थेसह अधिक संघटित पुनर्रचना करण्यात आली. दिंड्यांना क्रमांक, मुक्काम आणि प्रस्थानाच्या वेळा निश्चित केल्या. चोपदार, नगारखाना, अश्व, ध्वज आणि शामियाने यांचा समावेश झाला. या शिस्तबद्ध लोकसोहळ्याला विविध सरदार, संस्थानिक आणि जहागीरदारांनी धान्य, घोडे, तंबू आणि आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. त्यातून पालखीतील अनेक मानपरंपरा अस्तित्वात आल्या..महाराष्ट्र शासनाचा वाढता सहभागदीर्घकाळ वारीचे व्यवस्थापन हे स्थानिक गावकरी, मानकरी, दिंडीप्रमुख आणि वारकरी परंपरेच्या सामूहिक शिस्तीवर आधारित होते. पूर्वीपासून काही प्रमाणात प्रशासकीय मदत असली तरी १९९० च्या दशकानंतर शासनाचा सहभाग अधिक औपचारिक आणि व्यापक झाला. ‘निर्मल वारी’सारख्या स्वच्छता मोहिमा, आरोग्य सुविधा आणि वाहतूक नियंत्रण यांमधून शासनाची भूमिका अधिक स्पष्ट झाली. त्यानंतर पालखी मार्गांचा विकास, मूलभूत सुविधा, मुक्काम व्यवस्थापन आणि समन्वित नियोजन यावर भर दिला गेला..Palkhi Route Incomplete: पालखी आठ दिवसांवर, तरीही तयारी अपुरीच.वारीच्या यशस्वी आयोजनासाठी शासनाकडून पालखी मार्गांची दुरुस्ती, तात्पुरते रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पालखी तळांवर निवाऱ्याची सोय केली जाऊ लागली. आरोग्य विभागामार्फत फिरते दवाखाने, रुग्णवाहिका, आरोग्यदूत आणि वैद्यकीय पथके तैनात होऊ लागली. वाहतूक, कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त उभा राहू लागला. अलीकडील काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखी नियोजनासंदर्भात विशेष बैठका घेत प्रशासनाला आवश्यक सुविधा आणि समन्वयाबाबत निर्देश दिले. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यावर भर दिला..लाखो वारकरी सुमारे तीन आठवडे पायी चालत असताना संपूर्ण प्रशासन त्यांच्या सेवेसाठी कार्यरत असते. जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायती, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, वीज वितरण कंपन्या आणि स्वयंसेवी संस्था यांचा मोठा समन्वय या काळात पाहायला मिळतो..हे विभाग वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाइल शौचालये, आरोग्य तपासणी शिबिरे, रुग्णवाहिका, हरवलेल्यांसाठी नियंत्रण कक्ष, स्वच्छता मोहीम, वाहतूक नियंत्रण आणि मुक्काम व्यवस्थेवर लक्ष ठेवतात. अलीकडे वारीत ड्रोन निरीक्षण, सीसीटीव्ही, डिजिटल कमांड सेंटर आणि जीपीएस आधारित नियंत्रण व्यवस्थेचाही वापर होतो..पालखी मार्गाचा कायापालटकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गाच्या विकासासाठी विशेष लक्ष दिले. पुणे ते पंढरपूर या मार्गावर वाढती वाहतूक, वारकऱ्यांची वाढती संख्या आणि सुरक्षिततेच्या गरजा लक्षात घेऊन पालखी मार्ग अधिक सुरक्षित, रुंद आणि सुसज्ज करण्याची कामे वेगाने सुरू झाली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या चौपदरीकरणामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर झाला आहे. अडचणीच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी मुख्य महामार्गापासून स्वतंत्र अथवा संरक्षित पदयात्रा मार्ग विकसित केला आहे. पालखी तळांवर संरक्षक भिंती, पालखी कट्टे, कायमस्वरूपी स्वच्छतागृहे, हँगर व्यवस्था आणि हायमास्ट प्रकाशयोजना उभारण्यात आल्या आहेत..मार्गाच्या दुतर्फा देशी वृक्षांच्या लागवडीतून“ग्रीन कॉरिडॉर” उभारण्याचा प्रयत्न आहे. यादरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ऐतिहासिक विहीर, बाजीराव विहीर यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन केले गेले.वारी ही फक्त पंढरपूरकडे जाणारी धार्मिक यात्रा नाही; ती महाराष्ट्राच्या लोक मनाची जैविक परंपरा आहे. यात समता आहे, सेवा आहे, श्रम संस्कृती आहे, लोकशाही आहे आणि सामूहिकतेची अद्भुत ताकद आहे. वारकऱ्यांच्या ओठांवरील ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा गजर आजही तितक्याच श्रद्धेने आसमंतात घुमत आहे.(लेखक पुणे जिल्हा माहिती अधिकारी आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.