Narayangaon News: कुकडी प्रकल्पांतर्गत कुकडी डावा कालव्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत ८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, कालवा दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. अस्तरीकरणासाठी ८ एमएम जाडीच्या लोखंडापासून तयार केलेल्या जाळीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम चांगल्या दर्जाचे होणार आहे. त्यातून कालव्याची गळती थांबणार आहे, असा दावा कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १चे कार्यकारी अभियंता जे. बी. नान्नोर व उपअभियंता रवींद्र हांडे यांनी केला आहे..कुकडी प्रकल्पांतर्गत येडगाव, डिंभे, माणिकडोह, पिंपळगाव जोगे, वडज या धरणांना शेती सिंचनासाठी सुमारे सहाशे किलोमीटर लांबीचे कालवे जोडले आहेत. कुकडी प्रकल्पाचा लाभ पुणे, अहिल्यानगर व सोलापूर या तीन जिल्ह्यांतील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या सात तालुक्यांना होतो. यापैकी येडगाव धरणाला जोडलेल्या कुकडी डावा कालव्याची लांबी सुमारे २५० किलोमीटर आहे. त्याद्वारे जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्यांना सिंचन व बिगर सिंचनासाठी येडगाव धरणातून खरीप रब्बी व उन्हाळी हंगामात पाणी सोडले जाते. या कालव्याची सिंचन क्षमता ९६ हजार ३९६ हेक्टर आहे..Kukadi Canal : कुकडी डाव्या कालव्याच्या पोटचारीचे खोलीकरणाला वेग.येडगाव धरण व कुकडी डावा कालव्याचे काम सन १९७७ मध्ये पूर्ण झाले. ३८ वर्षांपूर्वी झालेला हा कालवा आता नादुरुस्त झाला आहे. अस्तरीकरण खचल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. त्यामुळे वहनक्षमता कमी झाल्याने कालवा सिंचन क्षमतेवर परिणाम झाला आहे. पाण्याचा अपव्यय होऊन कालव्यालगतच्या शेतीचे व पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून कालव्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची होती..त्या अनुषंगाने महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत या कालव्याच्या दुरुस्तीसाठी ८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने कालवा दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागला आहे. या निधीतून २५० किलोमीटर लांबीच्या कालव्याची सलग दुरुस्ती करण्यात येणार नसून येडगाव धरणापासून पुढे ज्या ठिकाणी कालव्याचे अस्तर निघाले आहे, बांधकाम व भराव खचला आहे अथवा कालवा फुटण्याची शक्यता आहे, आदी ठिकाणांना प्राधान्य देण्यात येईल. हे काम टक्केवारीत न अडकता चांगल्या दर्जाचे व्हावे. शासनाच्या निधीचा योग्य वापर व्हावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे..Kukadi Canal : कुकडी डावा कालवा दुरुस्तीची गरज.सहा किलोमीटर काम पूर्णकुकडी प्रकल्पांतर्गत महत्त्वाच्या असलेल्या डिंभे डावा कालव्याची गळती थांबवून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी वारूळवाडी- नारायणगाव हद्दीतील १५ किलोमीटर टप्प्यातील सुमारे सहा किलोमीटर लांबीच्या कालव्याच्या दुरूस्तीचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. दुरुस्तीनंतर प्रथमच या रब्बी हंगामात कालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे..कालवा दुरुस्तीची कामे पुढील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील. कालव्याचे काम योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी स्वतंत्र अभियंत्याची नेमणूक केली आहे. आवर्तन कालावधीत दुरुस्तीचे काम तात्पुरते बंद ठेवण्यात येईल.- जे. बी. नान्नोर, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १, नारायणगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.