शिवाजी काकडेEmotional Development: वाढलेल्या स्क्रीनटाइममुळे तर आई आणि मुले यांच्यातील संवाद कमी होत आहे. शिक्षक - विद्यार्थी नातेसंबंध फक्त परीक्षेपुरते उरले आहे. मुलांचा बौद्धिक विकास तर होतोय मात्र भावनिक बुद्धिमत्तेचा विकास खुंटत आहे. .रामायण या महाकाव्याचे निर्माते महर्षी वाल्मीकी यांचा वाल्या ते महर्षी वाल्मीकी हा प्रवास सर्वश्रुत आहे. नारद भेटीनंतर वाल्मीकाचे जीवन पूर्णपणे बदलते. आपल्या पापाचा भागीदार कुणीही होणार नाही हे पटल्यानंतर वाल्मीक अंगावर वारूळ तयार होईपर्यंत तपश्चर्या करतो. आपली साधना संपवून तो नदी किनारी स्नानाला जातो. याच वेळी एक शिकारी क्रौंच पक्षाला बाण मारतो. तडफडणाऱ्या क्रौंच पक्षाला बघून वाल्मीकाचे अंतःकरण वेदनेने गहिवरून येते. हा प्रसंग पाहून वाल्मीकाच्या तोंडून एक श्लोक बाहेर पडतो..Marathi Language: मराठी भाषा : ओढा कमी, ताण अधिक.तोच श्लोक तो परत परत म्हणतो. मात्र आपल्या तोंडी असे शब्द का येत आहे हे त्याला कळत नाही. मग तो नारदाकडे जातो. घडलेला प्रसंग सांगतो. तो प्रसंग पाहून माझ्या तोंडून हे शब्द बाहेर पडले, ते शब्द मला उच्चारायला देखील चांगले वाटत आहे आणि ऐकायला देखील गोड वाटत आहे. हे नेमके काय आहे? असे नारदला विचारतो. नारद म्हणतो, ‘‘वाल्मीका तुझी साधना सफल झाली, तुझ्यावर भगवंत कृपा झाली..तू आता खऱ्या अर्थाने संवेदनशील माणूस झाला.’’ हजारो लोकांना जीवे मारणारा वाल्या साधनेनंतर क्रौंच पक्षाला लागलेला बाण पाहून हळहळतो. क्रौंच पक्ष्याच्या वेदना या माझ्या वेदना आहे ही समानानुभूती त्याच्या अंगी येते. साधना केली म्हणजेच वाल्मीकाने अभ्यास केला. अभ्यास शब्दाचा अर्थच वृत्तीत बदल करणे असा आहे. आज अभ्यासाने विद्यार्थ्यांच्या वृत्तीत सकारात्मक बदल होतात का? आजचा आमचा विद्यार्थी शिक्षणाने, अभ्यासाने संवेदनशील होतो का? शिक्षणाने विद्यार्थ्यांत दया, प्रेम, करुणा, समानानुभूती ही मूल्ये रुजायला हवी. जागतिक आरोग्य संघटनेने देखील समानानुभूती हे एक महत्त्वाचे जीवनकौशल्य सांगितले आहे. शिक्षणाने अध्ययनार्थी चारित्र्यवान, निरोगी, नैतिक, सहृदयी, संवेदनशील आणि सर्जनशील झाला पाहिजे..अशांत - असंवेदनशील समाजआज सगळीकडेच मुलांच्या बाबतीत एक सामान्य तक्रार आहे. मुले ऐकत नाहीत. चिडचिड करतात. दुसऱ्याच्या मताचा, भावनेचा आदर करत नाहीत. माझेच खरं आहे म्हणून आपले विचार रेटून नेतात. पालकांना वाटते मुले ऐकत नाहीत, मुलांना वाटते पालक आपल्या भावनांचा विचार करत नाहीत. पालक - मुले, शिक्षक - विद्यार्थी, पती - पत्नी अशा कौटुंबिक नात्यात, व्यक्ती आणि समाजातील नातेसंबंध यांच्यात अंतर वाढत चालले आहे. .वाढलेल्या स्क्रीनटाइममुळे तर आई आणि मुले यांच्यातील देखील संवाद कमी होत आहे. शिक्षक - विद्यार्थी नातेसंबंध फक्त परीक्षेपुरते उरले आहे. मुलांचा बौद्धिक विकास तर होतोय मात्र भावनिक बुद्धिमत्तेचा विकास खुंटत आहे. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा याची जागा राग, चिडचिड आणि हिंसा घेत आहे. पुढच्या पिढीची मुले अधिक हुशार आहेत मात्र त्यांना इतरांशी जुळवून घेता येत नाही. एकविसावे शतक समृद्धीबरोबर अशांती व ताणतणावही बरोबर घेऊन आले आहे. कुटुंब, मित्रपरिवार आणि समाजात शांततामय मार्गाने जीवन जगण्यासाठी शिक्षणातून समानानुभूती कौशल्य विकसित व्हायला हवे..‘स्व’ भाषा शिक्षणशिक्षण हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे प्रमुख साधन आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाने प्राथमिक स्तरावर पाच महत्त्वाची विकासक्षेत्रे सांगितली आहेत. यात शारीरिक विकास, सामाजिक - भावनिक, नैतिक विकास, बोधात्मक विकास, भाषा व साक्षरता विकास आणि सौंदर्यदृष्टी आणि सांस्कृतिक विकास ही महत्त्वाचे क्षेत्रे आहेत. मात्र सध्या शिक्षक, पालक आणि शिक्षणव्यवस्था फक्त मुलांच्या बौद्धिक विकासाच्या मागे लागलेली आहे. .International Mother Language Day: मातृभाषेतील शिक्षणच सर्वसमावेशक.या विकासक्षेत्रांचे मूल्यांकन जाणीवजागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता या तीन रुब्रीक्सद्वारे करावे असे समग्र प्रगतीपत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू होऊनही मुलांचे मूल्यांकन आजही मार्कांच्या आधारेच होत आहे. इंग्रजी माध्यमातील शिक्षण, परीक्षाकेंद्री धोरण यामुळे जाणीवजागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता या क्षमतांचा विकास होणे शक्य नाही. या तीन क्षमतांचा विकास करण्यासाठी मातृभाषा शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे..बालपणी मुलांना स्व ओळख होण्यासाठी, भावनिक विकासासाठी, संवेदनशीलता, सहानुभूती, समानानुभूती कौशल्यांचा विकास होण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. मातृभाषा हे विचार, भावना आणि अभिव्यक्तीचे सहज माध्यम असते. आज मुले ऐकत नाहीत अशी तक्रार करतो मात्र मुलांच्या हृदयाची, आत्म्याची असलेली भाषा आपण त्यांना ऐकवतो का? मातृभाषेचा संकोच करून आपण मुलांना बालपणीच इंग्रजी माध्यमात घालतो त्या वेळी अनोळखी भाषेत होणारे श्रवण हे समजून घेणे, अवधानासह नसते. श्रवणच संपले तर सद्गुण, सदाचार आणि तेजस्वी विचार मुलांच्या मनात रुजणार तरी कसे. .केवळ घोकंपट्टी, पाठांतर आणि परीक्षा यातून मुलांमध्ये भावजागृती कशी होणार? केवळ पाठांतरातून आपल्या हाती काहीच लागणार नाही. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ‘घोडे काय थोडे वागविते ओझे?। भावेंविण तैसे पाठांतर॥ मराठी शाळेतही मराठी भाषा गुणांसाठी शिकवली जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे. मुले आपल्या मनातील भावना, विचार, कल्पना सांगतात. त्यामुळे संवेदनशीलता अधिक समृद्ध होते. मात्र अशी संधीच मुलांना शाळेत मिळत नाही. भाषा शिक्षणातून प्रभावी संभाषण कौशल्ये, साहित्यिक आणि सर्जनशील क्षमता, सांस्कृतिक स्वीकृती आणि सहभाग, संवेदनशीलता, समानानुभूती यांचा विकास व्हायला हवा..असं म्हणतात की, ‘ज्ञानापेक्षा समजून घेणं अधिक सखोल आहे. आणि एखाद्याला समजून घ्यायचं असेल तर त्याची वाट केवळ कानांमार्फत जाते. उत्तर देण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी कसं ऐकायचं हे त्यासाठी शिकायला हवं. यासाठी भाषा शिक्षणातून मुलांमध्ये श्रवण कौशल्ये विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवे. श्रवण करणे, समजून घेणे ही समानुभूतीची पहिली पायरी असते. इतरांच्या भावना, संवेदना समजून घेण्यासाठी संवाद आवश्यक असतो. संवाद म्हणजे उपदेश करणे नव्हे तर दुसऱ्याला समजून घेणे. .संवादातून प्रेम, करुणा, सहकार्य, सहृदयता आणि संवेदनशीलतेचा विकास होतो. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असेल तर ना श्रवण ना संवाद. मुलांना समजून घेण्यासाठी तयार न करता केवळ उत्तर देण्यासाठी तयार करण्याचे काम सुरू आहे. अपरिचित भाषा, केवळ परीक्षेसाठी तयार करणे, अभ्यासाचे ओझे यातून संवेदनशील, सर्जनशील विद्यार्थी कसे तयार होणार?.मातृभाषा आणि भावनिक बुद्धिमत्ता जागरूकतेसह श्रवण, आकलनासह वाचन, गोष्टी सांगणे, चर्चा, संवाद, कथा, कविता, सर्जनशील लेखन, नाट्यीकरण, भूमिकाभिनय यातून मुलांचा भावनिक बुद्धिमत्तेचा विकास होतो. यासाठी मुलांची मातृभाषा, परिसरभाषा हे शिक्षणाचे माध्यम असावे. शिक्षणातून हिंसा करणारे नव्हे तर वाल्मीकासारखे संवेदनशील, सहृदयी आणि मानवतेचे महाकाव्य सांगणारे जबाबदार नागरिक घडावेत.७८८७५४५५५७(लेखक शिक्षण व्यवस्थेचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.