श्रीकांत देशमुखपुस्तकाचे नाव : मान्सून जन गण मनलेखक : सुनील तांबे प्रकाशक : मनोविकास प्रकाशनपृष्ठे :१९२ मूल्य : २७० रुपये.अतिशय मनःपूर्वक आनंद देणारी फार थोडी पुस्तके असतात. पुन्हा पुन्हा आपण त्यात गुंतत जातो, हरवत जातो, आपण आपल्याला शोधत जातो. दुसऱ्या लेखकाच्या लेखनाच्या साक्षीने चाललेली ही वेगळ्या अर्थाने स्व-शोधाची प्रक्रिया असते. ‘मान्सून, जन गण मन’ वाचताना असाच काहीसा प्रत्यय मला पानोपानी येत गेला..निसर्गातल्या एखाद्या घटिताचा किती अंगाने शोध घेता येऊ शकतो, किती असंख्य शक्यता त्यात दडलेल्या असतात, की ज्या समजून घेताना एक प्रकारची धन्यता वाटते, याचा प्रत्यय या पुस्तकातून येतो. ही एका ‘संपूर्ण भारतीय’ माणसाने कथन केलेली पावसाची गोष्ट आहे. मान्सून हा या कथनाचा सर्वश्रेष्ठ नायक आहे. यात तो अभिजन नसून ‘बहुजन नायक’ आहे. त्याचे हे बहुजनत्व अगदी आदिम स्वरूपाचे आहे. त्यात इतिहास, भूगोल, संस्कृती, राजकारण, समाजेतिहास, वर्तमान सारेच काही जैविक एकजीवित्व घेऊन आले आहे..Book Review: दोन एकर : ग्रामीण भागातील वास्तव .मुळात दक्षिण जग हे कृषिजन संस्कृतीचे जग आहे. त्या मातीच्या कणांची आणि त्या कणांना जोडलेल्या माणसाची ही अतिशय तरल अशी कहाणी आहे. ही कहाणी फक्त मॉन्सूनची नाही, तर जगणाऱ्या विश्वगोलाची आहे. ती जेवढी अद्भुतरम्य आहे, तेवढीच वास्तविक आहे. ती वाचताना वाचकांची कुठल्याही प्रकारची दमछाक होत नाही. ही कहाणी वाचताना माणूस पावसात चिंब चिंब होतो..‘भारतीय उपखंडाची ओळख मॉन्सून, अर्थात मोसमी वाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या ऋतुचक्राशी निगडित आहे’ असे लेखक म्हणतो तेव्हाच त्याला पुढे काय सांगायचे आहे याचा अदमास येतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सुरुवातीच्या काळात सामील झालेले लोक शेती संस्कृतीशी फारसे संबंधित नव्हते, असे आकलन लेखक मांडतो तेव्हा हा मोसमी पाऊस वेगळा आहे हे कळून जाते. मध्यमवर्गीय विचारवंतांनी राष्ट्रवादाची सांगड वंश, धर्म, भाषा यांच्याशी घातल्यामुळे फुटीर राष्ट्रवादाची समस्या निर्माण झाली, हे लेखकाचे आकलन वाचून तर धक्का बसतो..हे माहितीचे संकलन नाही, केवळ शास्त्रीय अभ्यास नाही किंवा एखाद्या हवामान तज्ज्ञाने सांगितलेली ही रुक्ष माहिती नाही. गद्य शैलीत लिहिलेले हे मोसमी वाऱ्याचे महाकाव्य आहे. भारतीय सणांचा उदगम कसा झाला, भारतीय मनातली अनेक मिथके, महाकाव्ये, हिमालय, पर्वतराजी, नद्या या सगळ्यांचा मॉन्सूनला जोडून येणारा हा एक इतिहास आहे. सिंधू संस्कृतीच्या इतिहासापासून त्याची सुरुवात होते आणि मग माणसाच्या जगण्याची गोष्ट लेखक एकापाठोपाठ सांगत जातो. आर्यांचे आगमन, त्यापूर्वीचा शेतीचा शोध ते उत्तर-पूर्व-दक्षिण भारत सारे काही एखाद्या ललित लेखासारखे येत जाते..Book Review: समजून घेऊयात ‘शाश्वत नैसर्गिक शेती’.मोसमी वाऱ्याचा हा रोमहर्षक इतिहास वाचून रोजच्यापेक्षा काहीतरी संपूर्ण वेगळे आपण वाचत जातो. इथे पुराणकथाही भेटतात, राम-कृष्ण भेटतात, यमुना, कावेरी, गंगा, हिमालय भेटतो. मान्सूनच्या निमित्ताने लेखक माणूस आणि निसर्ग यांच्या संघर्षाची देखील उकल करत जातो. भारतीय उपखंडातल्या सिंधू, वैदिक, बौद्ध, जैन, इस्लाम, पारशी जगण्याचा हा पावसाशी जोडलेला ऐवज आहे. ‘सात आसरा’सारखे एखादे प्रकरण तर आपलेच वाटून जाते. ही कहाणी हरेक गावाशी आणि नदीशी जोडलेली आहे. .पुस्तकात फणीश्वरनाथ रेणू, सत्तावीस नक्षत्रे, पंडित नेहरू यांनी मेघनाथ साहा यांची पंचांग कमिटी असे संदर्भ ओघाने येत जातात. चातक पक्षाची कहाणी देखील अशीच अद्भुत. तो एक प्रकारचा ‘चातकशोध’ आहे. पुनर्जन्माच्या गोष्टींना नकार देणारा चार्वाक देखील इथे भेटतो. मान्सून सोबत येणाऱ्या पुनर्जन्माच्या गोष्टीही भेटतात. खरिपाच्या पिकाची सुगी साजरा करणारा ‘ओनम’ असो, की विठ्ठलाच्या दिंडीत जाणारे वारकरी, सारे या मोसमी वाऱ्याच्या दिंडीत सामावून गेले आहेत..भारतीय उपखंडाला प्रदक्षिणा घालून, इतिहास-भूगोल-खगोल-वेद-पुराणे या साऱ्यांच्या केंद्रस्थानी असणारा हा ‘सकलमान्सून’ आहे. स्त्री म्हणजे भूमी, आभाळ म्हणजे पुरुष आणि पाऊस म्हणजे वीर्य; पाऊस पडल्यावर पृथ्वीला गर्भ राहतो, असे म्हणत असताना लेखकातला कालिदास जागृत होतो. प्रादेशिक अस्मिता आणि पाऊस, पर्यावरण याबद्दल लेखक वेगळेच सिद्धांत मांडत जातो. .पदमनाभ मंदिराच्या खजिन्याचा त्यांनी घेतलेला शोध देखील असाच काहीसा वेगळा वाटावा असा. मध्य आशियातील व्यापारी तांडे, सोमनाथ, सिंदबाद, वास्को द गामा, गावगाड्याची गोष्ट, फासेपारधी ते सर्वभक्षी संस्कृती या सगळ्यांना समजून घेत भारतीय राष्ट्र राज्य असा हा लेखकाच्या विचारांचा प्रवास थक्क करणारा आहे. हे आपल्या संस्कृती नामक गोष्टीचे केवळ एकेरी विवेचन नाही. एका कवीने, समाजतज्ज्ञाने, निखळ भारतीय माणसाने केलेली ही शोधयात्रा आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.