हेरंब कुलकर्णीपूर्वार्धGround report on Maharashtra School Infrastructure: ग्रामीण महाराष्ट्रात ज्युनियर कॉलेजेस मोठ्या संख्येने सुरू झाली. परीक्षा सोप्या झाल्या. त्यामुळे मुलं-मुली किमान बारावीपर्यंत शिकू लागली. मुली शिकू लागल्याने बालविवाहांची संख्याही कमी झाली. तरुण पिढीच्या शिक्षकांतही काही सकारात्मक बदल झालेले दिसतात. तंत्रज्ञानावर त्यांची पकड आहे. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचं प्रमाणही वाढलेलं दिसलं. आपल्याला अंदाजही येणार नाही अशा अनेक वस्त्यांमधली मुलं आज शाळेत जात आहेत. भटक्या समाजात हे प्रमाण अजूनही कमी दिसलं, तरी एकुणात प्राथमिक स्तरावरील शाळाबाह्य मुलांची संख्या खूप कमी झाली आहे. .आदिवासी भागात आश्रमशाळेच्या चकचकीत इमारती डौलदार रीतीने उभ्या आहेत. खासगी इंग्रजी शाळा मात्र खूप वाढल्या आहेत. अगदी छोट्या गावांतही वाड्या-पाड्यांवर इंग्रजी शाळांच्या गाड्या फिरताना दिसतात. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं ही जाणीव निरक्षर, कष्टकरी वर्गात दिसते आहे; मात्र त्यांची मुलं आर्थिक ताकदीअभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत, हे चित्र आजही दिसतं..जिथे शेती खूप तोट्यात असते, दुष्काळ असतो, तिथे शिक्षण हेच उत्तर व एकमेव आधार असल्याने मुलं शिक्षणावर लक्ष केद्रित करीत आहेत. सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात वळई गावात ४५० कुटुंबं आहेत. या छोट्या गावातले तीसजण आज वेगवेगळ्या सरकारी नोकरीत आहेत. शेजारच्या पळशी गावात ११ प्रथमवर्ग अधिकारी आहेत. एकंदर, दुष्काळी माण तालुक्यात सरकारी अधिकारी मोठ्या संख्येने आहेत..शिक्षणाचं वाढलेलं प्रमाण हा समाधानाचा पैलू असला तरी गुणवत्तेत मात्र फार बदल जाणवत नाही. शाळांत मुलांची वाचन-लेखनातली प्रगती अजूनही समाधानकारक नाही. बुलडाणा जिल्ह्यात निहालवस्ती इथे गेलो होतो. आम्ही पोहोचलो तेव्हा सकाळचे ११ वाजत आले होते आणि वस्तीतली शाळकरी मुलं शाळेत न जाता ठिकठिकाणी खेळत होती. आम्ही अनेक मुलांना हटकलं. कारण विचारलं, तर शिक्षक आलेले नसल्याचं कळलं. शाळा वस्तीला लागूनच आहे. शिक्षक ठरलेल्या वेळेपेक्षा पंधरा मिनिटं उशिराने आले आणि मगच ती मुलं शाळेत गेली, तीसुद्धा आम्ही त्यांना दामटलं म्हणून..Government School Crisis: शासकीय शाळा व्यवस्थेचा ऱ्हास.आम्ही शाळेत गेलो, तर त्या दिवशी १२ विद्यार्थी गैरहजर असल्याचं दिसलं. जी मुलं हजर होती तीदेखील आम्ही त्यांना हटकल्यामुळे पटकन शाळेत आलेली होती, असं शिक्षक म्हणाले. त्यावरून इतर दिवशी गैरहजेरीचं प्रमाण किती असेल हे लक्षात यावं. शाळेचा रस्ता वस्तीतूनच आहे. तरीही शिक्षक गैरहजर विद्यार्थ्यांच्या घरीही जात नसावेत. उपस्थित मुलांची चाचणी घेतली तेव्हा ती मुलं साधे-सोपे शब्दही लिहू शकत नाहीत, असे आमच्या लक्षात आले..अकोला जिल्ह्यात बल्लाळी गावात गावकरी व शिक्षक यांच्यात खूप तणाव आहे. आम्ही गेलो त्या दिवशी सकाळची शाळा असूनही शिक्षक एक तास उशिरा येऊन अर्धा तास लवकर निघून गेलेले होते. पालक मुलांना लिहिता-वाचता येत नसल्याची तक्रार करत होते. आम्ही मुलांना गणितं सोडवायला दिली तेव्हा मुलांना ती अजिबात सोडवता आली नाहीत..गावात गरीब, भटक्या जमातीची वस्ती अधिक आहे. पालक आपापली मुलं घेऊन येत होते आणि मुलांना कसं काहीच येत नाही, हे आम्हाला सांगत होते. शिक्षक शाळेच्या वेळेत येतात, मात्र शाळेच्या बाहेर उभे राहून गावकऱ्यांशी गप्पा मारत राहतात, अशीही त्यांची तक्रार होती. त्यावरून शिक्षकांना जाब विचारणाऱ्यांना ‘आम्ही काय तुमच्या बापाचा पगार खातो का?’’ असं उत्तर मिळत असल्याचं कळलं..अकोला जिल्ह्यात सकणी या गावात संपूर्ण बौद्धवस्ती आहे. गावातल्या शाळेविषयी लोकांच्या तक्रारी होत्या. शाळेत चांगलं शिक्षण मिळत नाही, पालक मुलांना शिकायला बाहेर पाठवतात. त्यामुळे गावातल्या शाळेत आता केवळ पाच मुलं उरली आहेत. पालक शाळेत गेले की त्यांना सरकारी कामात अडथळा आणण्याची केस करण्याची धमकी दिली जाते. यवतमाळ जिल्ह्यात करंजी या मोठ्या गावालगतच्या सुंदरनगर पोड इथे ११० कुटुंबांत एकही पदवीधर नाही. गावातली सात मुलं आता कुठे बारावी झाली आहेत. त्यांच्यापैकी फक्त तीन जणांना नोकरी लागली..Government Schools Crisis: सरकारी शाळांचा बीमोड होण्याची भीती.नंदुरबार जिल्ह्यात धडगाव तालुक्यात कुमरी गावात शाळेला इमारत नाही. शाळा शिक्षकाच्या घरातच भरते. अशा अनेक शाळा आहेत असं समजलं. घरातील शाळेत पटावर २६ विद्यार्थी होते, पण प्रत्यक्षात केवळ तीन विद्यार्थी उपस्थित होते. तिघं अनुक्रमे तिसरी, चौथी आणि पाचवीच्या वर्गातले होते. या मुलांना साधी अक्षरंही वाचता येत नव्हती. शाळेतला एक शिक्षक गैरहजर होता..याच तालुक्यात खडकी गावातील शाळेत १२६ पैकी ३० विद्यार्थी उपस्थित होते. इथेही आम्ही मुलांची चाचणी घेतली तेव्हा मुलांना शब्दांतली अक्षरं फक्त वाचता आली. तिसरीतल्या मुलाला १०१ हा आकडा वाचता आला नाही. ‘नंदुरबार’ हा शब्द चौथीपर्यंतच्या एकाही मुलाला लिहिता आला नाही. मात्र, या शाळेने एकूण ७६ शालाबाह्य मुलं शाळेत दाखल केली आहेत, ही बाब कौतुकास्पद वाटली. शिक्षकांनी यासाठी घेतलेले कष्ट जाणवत होते. त्यांचा पालकसंपर्क खूप चांगला होता..शिक्षणाचा दर्जा आणि बेकारी याबाबत दलित वस्तीतील मधुकर वानखेडे यांच्याशी बोलत होतो. ते म्हणाले, की ‘पोलिस भरतीत जायचं म्हणून आमची मुलं बारावी होतात, पण लेखी परीक्षेत टिकत नाहीत. ही मुलं लहानपणापासून शाळा बुडवून आई-बापाबरोबर मजुरीला जातात. त्यामुळे त्यांचा अभ्यास कच्चा राहतो..वस्तीतल्या १२ वी नापास मुलांची संख्याही निम्म्याला निम्मी आहे. इथल्या १० पोरांनी आयटीआय केलं आहे, पण त्यांना रोजगार मिळत नाही.’’ पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यातल्या तुळशीराम मुकणे यांचा मुलगा दहावीत शिकतो. त्या मुलाला आम्ही त्याचं नाव इंग्रजीत लिहायला सांगितलं तर ते तो लिहू शकला नाही. एक हजार पन्नास हा आकडा त्याने १०००५० असा लिहिला. ५११ हा आकडा ५००११ असा लिहिला. हा विद्यार्थी नववीपर्यंत पास होत गेलेला आहे हे विशेष!.भटक्यांमध्ये शिक्षणाचं प्रमाण अजूनही कमीच आहे. त्यातही मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण आणखी कमी आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये खरी समस्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची असताना, शाळेच्या इमारतीसह इतर सुविधांच्या अभावाचीच चर्चा अधिक होते. अजूनही शाळांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना वाचन लेखन येत नाही हे वास्तव आहे. इमारतीबद्दल बोलताना या अंतर्गत पडझडीबद्दलही बोलायला हवे.: ८२०८५८९१९५(लेखक शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.