Property Rights: भारतामध्ये शेती हा केवळ व्यवसाय नसून तो सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक जीवनाचा केंद्रबिंदू राहिला आहे. शेतीतील अतिरिक्त मनुष्यबळ शहरांकडे स्थलांतर करत आहे, सेवा क्षेत्र आणि उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी वाढत आहेत, आणि ग्रामीण-शहरी अंतर कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दशकांत उत्तराधिकार, हस्तांतर आणि वारसाहक्क यामध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. विशेष म्हणजे वारसा हक्क कायद्यामध्ये कोणताही बदल झाला नाही तरी माणसे त्यांच्या अनुभवाच्या आधारे खटल्यावरील खर्च टाळून, समजुतीने व शहाणपणाने अनेक प्रॅक्टिकल निर्णय घेतील. .भारतात शेती जमीन ही बहुतेक वेळा पितृसत्ताक पद्धतीने वारशाने हस्तांतरित होत आली आहे. मुलांना, जमिनीचा हक्क मिळत असे. संयुक्त कुटुंब पद्धतीत जमीन ही सामायिक मालमत्ता मानली जात असे. मात्र दरम्यानच्या काळात जमिनींचे विभाजन होत गेले आणि जमीन लहान-लहान तुकड्यांमध्ये विभागली गेली. यामुळे शेतीची उत्पादकता कमी झाली आणि आर्थिक व्यवहार्यता घटली..Land Measurement: पुढच्या काळात केवळ १५ दिवसांत जमीन मोजणी, मग खरेदीखत अन् नंतर फेरफार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती.आज मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी शहरांकडे वळत आहेत. त्यामुळे शेतीत काम करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी होत आहे. पुढील १० वर्षांत महाराष्ट्रातील किमान १० टक्क्यांपेक्षा जास्त लोक आपली शेती विकून शहरांकडे स्थलांतरित होतील. पारंपरिकरीत्या माझी जमीन म्हणजे काळी आई आहे हा भावनिक मुद्दा बोथट होत जाईल..घरातील कुटुंबीय लोक सुद्धा शेतजमिनीकडे आर्थिक दृष्टीने पाहतील. भावाला जमिनीचे पैसे कसे मागायचे हा प्रश्न नव्या पिढीला पडणार नाही. रोखठोक पैशामध्ये रूपांतर करुन हिशोब मांडले जातील. यामुळे अनेक बदल दिसून येतील. अनेक वारसदार फार कमी जमीन असेल तर शेतीत रस दाखवणार नाहीत. शिवाय नोकरीच्या ठिकाणापासून जाऊन येऊन शेती करणे शक्य नसल्यास जमीन विकून पैसे शेअर मार्केटमध्ये टाकणे पसंत करतील. फार मोठ्या संख्येने जमिनी पुन्हा गैरहजर असलेल्या मालकांकडे किंवा कंपन्यांकडे जातील..NA Land Permission: बिगरशेती परवानगी आता ऑनलाइन मिळणार.मालकी शेतकऱ्यांची हक्क कंपन्यांचेथोडक्यात १०० वर्षांनंतर जुने वतनदार, जहागिरदार, जमीन मालक जाऊन कंपन्यांची जमीनदारी सुरू होईल. कुळ कायदा व सीलिंग कायदा यांची कुठलीही तरतूद लागू न होता कुठल्याही जमीन मालकाला आपली जमीन ठरावीक काळासाठी भाडेपट्ट्याने देता येईल असा महाराष्ट्र लँड लिजिंग कायदा करण्यात आला आहे. त्यामुळे पारंपरिक ‘वारसा = शेती’ ही संकल्पना बदलून ‘वारसा = मालमत्ता’ अशी होईल..कायद्यांमध्ये बदल झाल्यामुळे महिलांना (मुलींना) शेती जमिनीवर समान हक्क मिळत आहेत. यामुळे पुढील दशकांत महिलांचा मालकी हक्क वाढेल. संयुक्त मालकी वाढेल. जमीन विक्री/हस्तांतरात महिलांचा सहभाग वाढेल. हे बदल सामाजिक समतेसाठी महत्त्वाचे असले तरी व्यवहारात मालकीचे तुकडे वाढण्याची शक्यता आहे. पूर्वी जमीन विक्री हा शेवटचा पर्याय मानला जात असे..परंतु आता शहरीकरणामुळे जमीन विक्री वाढेल. औद्योगिक व पायाभूत प्रकल्पांसाठी जमीन हस्तांतरण होईल. रिअल इस्टेट गुंतवणूक वाढेल. यामुळे शेती जमीन हळूहळू बिगर शेती वापरासाठी वळवली जाईल. भविष्यात कॉर्पोरेट शेती आणि करार शेती यांना चालना मिळेल. त्यामुळे जमीन मालकी शेतकऱ्याकडे राहील पण वापराचा हक्क कंपन्यांकडे जाईल, दीर्घकालीन भाडेपट्टा वाढेल व शेती व्यवस्थापन व्यावसायिक होईल. या प्रक्रियेत वारसाहक्काचे स्वरूप ‘मालकी’पेक्षा ‘आर्थिक लाभ’ यावर आधारित होईल..भारतामध्ये डिजिटल जमीन नोंदणी वेगाने विकसित होत आहे. भविष्यात जमीन हक्क अधिक स्पष्ट होतील, वाद कमी होतील व ऑनलाइन हस्तांतर सोपे होईल. आताच ‘स्वामित्व’ नावाच्या कार्यक्रमामुळे राज्यातील सर्व गावठाणांमधील घरांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहेत. याचा परिणाम म्हणून गावठाणातील घरे सुद्धा येथून पुढे विक्री होतील. पहिल्यांदाच अशा पारंपरिक घरांचासुद्धा अधिकार अभिलेख तयार झाल्यामुळे या प्लॉटची विक्री करता येणे लोकांना शक्य होणार आहे. याचा परिणाम असा होईल की वारसाहक्काने मिळालेली जमीन प्रत्यक्ष शेतीसाठी नव्हे तर ‘शेती समूहात भागीदारी’ म्हणून वापरली जाईल..यामुळे वारसाहक्काचे महत्त्व ‘भावनिक’पासून ‘आर्थिक’ दिशेने वळेल. येत्या काही दशकांत भारतातील शेती जमीन ही मुख्यतः गुंतवणुकीचे साधन, उत्पन्नाचे साधन आणि सामाजिक ओळखीचे प्रतीक या तिन्ही स्वरूपात दिसेल. तथापि, या बदलांमध्ये सामाजिक समतोल राखणे, लहान शेतकऱ्यांचे संरक्षण करणे आणि शेतीची टिकाऊपणा सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य धोरणे, शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने भारत या संक्रमणाचा लाभ घेऊ शकतो.shekharsatbara@gmail.com.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.