Pune News: भारताने अमेरिकेच्या शेतीमालासाठी बाजारपेठ खुली केल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. भारत सरकारकडून मात्र याविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे कोणत्या शेतीमालाची आयात होणार, किती आणि कधीपर्यंत होणार याची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. तर विरोधी पक्षांनी सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे..अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (ता. २) भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहा वाजता भारतासोबतच्या व्यापार कराराची घोषणा समाजमाध्यमावर केली. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली आणि अमेरिकेतील वस्तू आयातीला सवलती दिल्यामुळे भारतावरील ५० टक्के आयात शुल्क १८ टक्क्यांपर्यंत कमी केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारताने अमेरिकेच्या वस्तूंची खरेदी वाढविण्याचे मान्य केले आहे..भारत अमेरिकेच्या ऊर्जा, कोळसा, तंत्रज्ञान, शेतीमाल आणि इतर उत्पादनांची ५० हजार कोटी डाॅलरपर्यंत खरेदी वाढविणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारताने अमेरिकी वस्तूंच्या आयातीवरील शुल्क शून्य केल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. भारताकडून मात्र याविषयी अधिकृत तपशील मंगळवारी (ता. ३) सायंकाळपर्यंत देण्यात आले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करून या कराराचे स्वागत केले आहे. करारातील तपशील उघड झालेले नसताना सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीने मंगळवारी पंतप्रधानांचा कराराराची ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला..India US Trade Deal: भारत–अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांना अभूतपूर्व संधी खुल्या होतील- पियुष गोयल .अमेरिकेने व्यापार करार झाल्याचे जाहीर केले, मात्र भारत सरकार त्याविषयी माहिती देत नसल्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीकेची झोड उठविली. पंतप्रधान दबावाखाली असून त्यांनी तडजोड केल्याचा आरोप त्यांनी केला. “पंतप्रधान मोदी यांनी दबावात करार केल्याने ते गोंधळले आहेत. आता त्यांच्या प्रतिमेला धक्का बसेल याची त्यांना भीती वाटत आहे,” अशी टीका गांधी यांनी केली..‘‘ट्रम्प यांनी मोदी यांच्या कानपट्टीवर बंदूक ठेवून भारतातील करोडो शेतकऱ्यांना मृत्यूच्या खाईत लोटले आहे. मोदी यांनी अमेरिकेबरोबर करार करून देशातील शेतकऱ्यांच्या पाठीत आणि पोटात सुरा खुपसला आहे. आता अमेरिकेतील शेतीमाल भारतात स्वस्तात विकला जाईल. कारण मोदींनी अमेरिकी शेतीमालाच्या आयातीवरील शुल्क शून्य केले आहे. त्यामुळे भारतातले शेतकरी बरबाद होतील,’’ अशी टीका आम आदमी पक्षाचे खा. संजय सिंह यांनी केली..समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश सिंह यांनी भारताची बाजारपेठ अमेरिकेच्या शेती उत्पादनांसाठी खुली करून केंद्र सरकारने रोजगारासाठी शेतीवर अवलंबून असलेल्या देशातील ७० टक्के लोकांना धोका दिला आहे, अशी टीका केली. ‘‘भाजपने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर वार केला आहे, भाजप व त्यांचे सहकारी स्वातंत्र्यापूर्वीही विदेशी शक्तींचे एजंट म्हणून काम करत होते व आजही करत आहेत. या करारामुळे केवळ शेतकरीच नव्हे तर मध्यमवर्ग व निम्न मध्यमवर्गही भरडला जाणार आहे,’’ असे ते म्हणाले..अमेरिकेचाच फायदाआयात शुल्क वाढविण्याच्या आधी अमेरिकेतून आयात झालेल्या वस्तूंवर सरासरी १७ टक्क्यांपर्यंत शुल्क भारताकडून आकारले जात होते. तर अमेरिका भारताच्या शेतीमालासह वस्तूंवर सरासरी ३.३ टक्के आयात शुल्क आकारत असे. म्हणजेच भारत अमेरिकेच्या वस्तूंवर १३.७ टक्के अधिक शुल्क आकारत होता. पण आता भारत अमेरिकेच्या आयातीवर शुल्क आकारणार नाही आणि अमेरिका भारताच्या आयातीवर १८ टक्के शुल्क आकारणार आहे. त्यामुळेच या व्यापार कराराच्या वाटाघाटीत भारताच्या पदरात काहीच पडले नाही उलट अमेरिकेचाच फायदा आहे, अशी टीका केली जात आहे..कोणत्या शेतीमालाची आयात होणार?भारताने अमेरिकेच्या काही शेतीमालासाठी आपली बाजारपेठ खुली केल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व कृषिमंत्र्यांनी सांगितले. पण भारताने अमेरिकेच्या नेमक्या कोणत्या शेतीमालासाठी बाजारपेठ खुली केली, भारत किती आयात करणार, मुक्त आयातीचा कालावधी काय असेल याचे तपशील त्यांनी दिलेले नाहीत. तसेच भारत सरकारकडूनही यावर चकार शब्द काढण्यात आला नाही. परंतु राॅयटर्स वृत्तसंस्थेने काही सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले, की भारताने दूरसंचार, औषधनिर्माण, संरक्षण, पेट्रोलियम, विमान आणि काही शेतीमालाच्या खरेदीला सहमती दर्शविली आहे. अमेरिकेतून २०२५ मध्ये भारतात १७० कोटी डाॅलर मूल्याच्या शेतीमालाची आयात झाली. त्यात कापूस, सोयाबीन तेल, बदाम आणि पिस्ता या शेतीमालाचा समावेश आहे. पण भारताने कोणत्या शेतीमालावरील आयात शुल्क काढले, हे सरकारने स्पष्टीकरण दिल्यानंतरच कळेल..किंमत कोण चुकविणार?गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात शुल्क लावल्यानंतर एक आठवड्याने एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यासाठी शेतकऱ्यांचे हित ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे प्रत्युत्तर दिले होते. ‘‘भारतातील शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही. मला माहीत आहे की याची मला खूप मोठी व्यक्तिगत किंमत मोजावी लागेल, पण मी त्यासाठी तयार आहे,' असे वक्तव्य त्यांनी त्या वेळी केले होते. परंतु आता मात्र प्रत्यक्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कराराची एकतर्फी घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मौन बाळगले आहे. त्यामुळे या कराराची खरी किंमत मोदींना नव्हे, तर शेतकऱ्यांना चुकवावी लागेल, हे स्पष्ट झाल्याची टीका जाणकारांकडून केली जात आहे..India-US Trade : भारत-अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल; विरोधकांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र.तांदूळ निर्यात सुलभ होणारअमेरिकेला तांदूळ निर्यात वाढीसाठीही पोषक स्थिती निर्माण झाल्याचे इंडियन राइस एक्स्पोर्टर्स फेडरेशनने म्हटले आहे. अमेरिकेच्या बाजारात भारताला थायलंड आणि पाकिस्तानसोबत स्पर्धा करावी लागते. या दोन्ही देशांवर १९ टक्के शुल्क आहे. तर भारताच्या तांदळावर १८ टक्के शुल्क असेल. अमेरिकेच्या बाजारात ५० टक्के शुल्क असतानाही भारतीय तांदळाला विशेष पसंती मिळाली आहे. आता शुल्क कमी झाल्याने देशातील अतिरिक्त तांदूळ निर्यातवाढीस मदत होईल. अमेरिकेच्या बाजारात बासमती तसेच बिगर-बासमती तांदळाची विक्री वाढेल. यामुळे भारताला अमेरिकेतील बाजारपेठेतील आपला वाटा टिकवून ठेवण्यास आणि वाढविण्यास मदत होईल, अशी आशा फेडरेशनने व्यक्त केली आहे..कापड निर्यात वाढणारअमेरिकेने भारताच्या कापड आयातीवरील शुल्क ५० टक्के केल्यानंतर भारतातून होणारी निर्यात कमी झाली होती. कारण चीनवर सरासरी ३० टक्के, बांगलादेशवर २० टक्के, व्हिएतनाम २० टक्के आणि इंडोनेशियावर १९ टक्के शुल्क आहे. त्यामुळे भारताचे कापड अमेरिकेच्या बाजारात सर्वात महाग होऊन निर्यात घटली होती. पण आता अमेरिकेने भारताच्या कापडावरील आयात शुल्क ५० टक्क्यांवरून १८ टक्के केले आहे. म्हणजेच कापड निर्यातदार इतर देशांच्या तुलनेत भारताच्या कापडावर लागणारे शुल्क कमी झाले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या बाजारात भारतीय कापड स्वस्त होईल. याचा फायदा निर्यातीला मिळणार आहे. त्यामुळे भारताची कापड निर्यात अमेरिकेला वाढणार आहे..कोळंबी निर्यातीस प्रोत्साहनसागरी उत्पादनात अमेरिका भारताचा चीन आणि युरोपनंतर तिसरा ग्राहक आहे. अमेरिकेला होणाऱ्या एकूण निर्यातीतील ८० टक्के समावेश फ्रोझन माशांचा असतो. मात्र भारतातून आयात होणाऱ्या मालावर अमेरिकेने ५० टक्के आयात शुल्क लागू केले होते. तर चीनवर ३० टक्के, व्हिएतनामवर २० टक्के, तर इंडोनेशियावर १९ टक्के आयात शुल्क लागू होते. त्यामुळे एप्रिल ते सप्टेंबर या काळातील निर्यात १५ टक्क्यांनी कमी होऊन २ लाख टनांवरच स्थिरावली होती. अमेरिकेने आता भारतावरील आयात शुल्क ५० टक्क्यांवरून १८ टक्के केले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या बाजारात भारताला इतर देशांच्या उत्पादनांशी स्पर्धा करता येईल आणि भारतातून होणारी निर्यात वाढेल, अशा विश्वास उद्योगाने व्यक्त केला आहे..अमेरिकेत अदानींवर खटला दाखल आहे, जो खरे तर मोदीजींवर आहे. तसेच एपस्टिन फाइलचे प्रकरण आणखी मोठे आहे. याचा दबाव पंतप्रधानांवर होता. त्यासाठी व्यापार करार करताना त्यांनी तडजोड केली. त्यांनी देशातील शेतकऱ्यांचे कष्ट, रक्त, घाम यांचा सौदा केला आहे. त्यांनी देशाला विकले आहे. राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा.भारताची मोठी बाजारपेठ आता अमेरिकेच्या शेतीमालासाठी खुली झाली आहे. त्यामुळे अमेरिकेत शेतीमालाच्या किमती वाढण्यास मदत होईल आणि ग्रामीण अमेरिकेत पैशाचा पुरवठा वाढेल. भारतासोबत अमेरिकेची शेतीमाल व्यापार तूट २०२४ मध्ये १३० कोटी डाॅलरची होती. भारताच्या वाढत्या लोकसंख्येमुळे अमेरिकेसाठी ही एक महत्त्वाची बाजारपेठ असून, या व्यापार करारामुळे ही तूट कमी होण्यास मदत होईल.ब्रुक राॅलिन्स, कृषिमंत्री, अमेरिका.अमेरिकेसोबतचा व्यापार करार शेतकरी, उद्योग आणि सूक्ष्म-लघू उद्योगांच्या फायद्याचा आहे. या करारात शेती आणि डेअरीसारख्या संवेदनशील क्षेत्राला संरक्षण देण्यात आले आहे. व्यापार कराराविषयीच्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतर दोन्ही देशांकडून या कराराची सविस्तर माहिती संयुक्तपणे देण्यात येईल.पीयूष गोयल, केंद्रीय वाणिज्यमंत्री.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.