Rural Issues: घरगणनेच्या कामासाठी शिवारातल्या वस्त्यांवर फिरताना घरं मोजली, माणसं मोजली, खोल्या मोजल्या; परंतु दारिद्र्यात होरपळणाऱ्या त्या घरांमधला अभाव, त्या चेहऱ्यांवरली चिंता आणि त्या आयुष्यांमधली असुरक्षितता याची मोजदाद करता आली नाही. कर्तव्याचा भाग म्हणून माहिती गोळा करताना आकडे मिळाले खरे; मात्र त्या आकड्यांमागे लपलेल्या वेदनांची गणना कोणत्या पद्धतीने करायची, हा प्रश्न सतत मनात घोळत राहिला. त्या दाहक वास्तवाची ही नोंद..जनगणनेच्या कामानिमित्त समृद्धीने वेढलेल्या परिसरात अभाव, वंचना, उपेक्षा यांच्या वेदनेने गदगदलेल्या नदीकाठच्या वस्त्याही फिरलो. कागदावरच्या आकड्यांमध्ये माणसं आणि घरं मोजण्याचं काम होतं. पण प्रत्यक्षात वंचित समाजाच्या आयुष्यावर उमटलेल्या जखमा वाचण्याचा क्लेशकारक अनुभव मिळाला..India Population Census: जनगणनेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५३१७ प्रगणक नियुक्त.शिवारात विखुरलेली काही झोपडीवजा घरं होती. घराला दरवाजा नव्हता. कुठे पत्रा उभा, कुठे आडवा लावलेला. आत डोकावलं की चार-सहा भांडीकुंडी, एखादी जुनी चटई, अंगावरची फाटकी-विरलेली वस्त्रं आणि तरीही जगण्यासाठी सुरू असलेली केविलवाणी धडपड दिसायची. छोट्याशा जागेत थाटलेला संसार आणि त्याहून संसारासाठी सुरू असलेला मोठा संघर्ष....जनगणनेच्या ॲपमध्ये वेगवेगळे प्रश्न होते. घरात रेडिओ आहे का? टीव्ही आहे का? मोटरसायकल, कार, लॅपटॉप, इंटरनेट, गॅस, स्वच्छतागृह, मोबाइल आहे का? घर कोणत्या साहित्याचं बांधलं आहे? किती खोल्या आहेत? पण वस्त्यांवर फिरताना दारिद्र्याच्या गर्तेत कोसळून पडलेलं वास्तव पाहिल्यावर हे प्रश्न विचारण्याची हिंमत झाली नाही. किंबहुना गरजच वाटली नाही..ज्यांच्या घराला नीट दार नाही, ज्यांच्या पोटात दोन वेळचं पोटभर अन्न नाही, ज्यांच्या चेहऱ्यावर कुपोषणाच्या खाणाखुणा विखुरल्या आहेत, ज्यांच्या डोळ्यांत उद्याच्या दिवसाची अस्वस्थ अनिश्चितता आहे, अशा लोकांना ‘तुमच्याकडे लॅपटॉप आहे का?’ हा प्रश्न विचारणं म्हणजे काळानं दिलेल्या भळभळत्या जखमेवर पुन्हा डागण्या देण्यासारखं वाटत होतं..कृश शरीरयष्टी, खपाटीला गेलेली पोटं, हाडांना चिकटलेली चामडी, उन्हावाऱ्याने रापलेले चेहरे, मळकटलेले, कळकटलेले, विरलेले कपडे... दारिद्र्याची व्याख्या संशोधन निबंधात लिहिलेली नसते तर अशा दुर्गम भागातल्या अभावग्रस्त वस्त्यांमधून चालताना ती प्रत्येक पावलावर दिसते..घरगणनेचं काम सुरू असताना आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. प्रगणक प्रश्न विचारायला गेला की समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर एक अनामिक अस्वस्थतेची लहर पसरलेली दिसायची. सरकारकडून काय मिळणार यापेक्षा जे मिळतंय ते हिरावलं तर जाणार नाही ना, अशी भीती लोकांच्या मनात जास्त होती..अनेक महिलांचा पहिलाच प्रश्न असायचा, ‘सर, तुम्ही ही माहिती घेऊन गेल्यावर सरकार आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद करणार नाही ना?’ तोट्याची हमी असलेला शेती धंदा करणारे शेतकरी विचारायचे, ‘घर, गाडी, टीव्ही, गॅस, मोबाईल याची माहिती दिल्यानंतर आमच्या आहेत त्या कांद्याच्या चाळीसारख्या योजना बंद होणार नाहीत ना?’ मी माझ्या परीने त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. ही जनगणना आहे. या माहितीच्या आधारे कोणाच्याही योजना बंद होणार नाहीत. पण त्यांच्या चेहऱ्यावरली, डोळ्यातली शंका पूर्णपणे विरघळत नव्हती..एका वस्तीवरून दुसऱ्या वस्तीवर जाताना मनात एकच विचार डोकावत असे, की तो म्हणजे ज्यांच्या आयुष्यात अजूनही मूलभूत गरजांचीच कमतरता आहे, ते लोक नवीन लाभ बाजूला ठेवून आधीपासून मिळणारा तुटपुंजा आधारही हातातून निसटेल की काय, या भीतीत जगत आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या विकासाच्या दाव्यातील हवा काढून घेणारा हा कदाचित सर्वांत काळा विनोद आहे..एका बाजूला देश जागतिक दर्जाच्या अर्थव्यवस्थेची स्वप्नं पाहतोय. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश करतोय. डिजिटल क्रांतीचे गजर करतोय. आणि दुसऱ्या बाजूला अभावात दिवस कंठत असलेले काही नागरिक अजूनही शासन दरबारी आपली नोंद झाली, तर मिळणारा आधार बंद होईल की काय, या भीतीत जगत आहेत..त्या वस्त्यांतून फिरताना अनेक प्रश्न मनाला छळत राहिले. हे लोक नेमकं काय खात असतील? पिण्याच्या पाण्यासाठी नळाचं कनेक्शन नसताना कोठून पाणी वाहून आणत असतील? गॅस कनेक्शन असलं तरी सिलिंडर भरण्यासाठी पैसे नसतील तर त्याचा उपयोग काय? वादळवाऱ्यात, पावसाच्या दिवसांत कच्चीबच्ची घेऊन पत्र्याच्या घरात झोपताना त्यांना सुरक्षित वाटत असेल का? उघड्यावर संडासला जाताना मनात हिंस्र श्र्वापदांची भीती वाटत नसेल का? हैराण करणाऱ्या तापलेल्या उन्हात पत्र्याच्या लहानशा शेडमध्ये यांचा दिवस कसा जात असेल? तापलेल्या पत्र्याखाली रात्र काढताना अंगाची लाही लाही होत नसेल का?.अभाव आणि दारिद्र्याने गांजलेल्या या लोकांना सध्या या व्यवस्थेत आवाज राहिलेला नाहीये. ते आंदोलन करत नाहीत, मोर्चे काढत नाहीत. एक्सवर ‘ट्रेंड’ चालवणे त्यांना माहीत नाही. त्यांना फेसबुकवर पोस्ट लिहून ‘हॅशटॅग’ चालवता येत नाही. ते यू-ट्यूबवर व्हिडिओ टाकत नाहीत. या सगळ्या गोष्टींपासून ते कोसो दूर अंतरावर आहेत. ते फक्त जगत राहतात. कधी अर्धपोटी तर कधी उपाशीपोटी. उद्याची आशा बाळगत कसेबसे दिवस कंठत राहतात..पूर्वी वर्तमानपत्रांच्या पानांमध्ये या लोकांच्या कहाण्या ठळक स्वरूपात प्रसिद्ध होत असत. वृत्तवाहिन्यांवर अभाव, दारिद्र्य, वंचना आणि शोषणाच्या वेदनांना प्राइम टाइममध्ये स्थान मिळायचं. गेल्या काही वर्षांपासून परिस्थिती झपाट्यानं बदलत गेलीय. दारिद्र्याने पिचलेल्या माणसांच्या करुण कहाण्या, त्यांचं जगणं, भोगणं माध्यमांतून जवळजवळ हद्दपार झाल्यात जमा आहे. माध्यमांचा इंडिया आणि गरिबांचा भारत वेगळा आहे..India Population Census: ‘जनगणना- २०२७’ साठी प्रत्येकाने सहभाग नोंदवावा.ज्या घराला दरवाजाच नाही, त्या घरावर घर क्रमांक कुठे लिहायचा? याचा मनातल्या मनात विचार करत होतो. नकळत मनात विचार आला घरगणना करणं (म्हणजे घर मोजणं) किती सोपं आहे. सूचनांनुसार हे काम आपण केलं. मात्र घरांची गणना करताना, वेदनांची गणना करायचं राहून गेलं. घरगणनेचं आहे तसंच वेदना मोजण्यासाठीचं एखादं ॲप बाजारात येईल?.जनगणनेच्या फॉर्ममध्ये घराची माहिती भरली गेली. भौतिक सुविधा नोंदविल्या गेल्यात. परंतु अभाव कुठे कसा नोंदवायचा? कोणता की बोर्ड वापरून असुरक्षितता कुठे कशी नोंदवायची? हतबलता कोणत्या लिपीत लिहायची? कोणत्या रकान्यात अगतिकता भरायची? वर्षानुवर्षे न बोलता सहन केलेल्या वेदनांची नोंद कोणत्या चौकटीत कशी करायची? हे सगळे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. कालही होते आणि आजही आहेत..घरगणना करताना आणखी एक गोष्ट लक्षात आली. शासकीय लाभापासून आपण वंचित राहू की काय, ही भीती अनेकांच्या मनात इतकी खोलवर रुजली आहे, की अनेकदा लोक खरी माहिती सांगायलाही कचरतात. खरं तर गरिबाकडे गमावण्यासारखं फारसं काही नसतं. तरीही त्याला भीती वाटते. कारण त्याच्या जगण्याला आधार देणारी एखादी योजना बंद झाली तर? ही भीती अचानक निर्माण झालेली नाही. व्यवस्थेनेच ती वर्षानुवर्षे त्याच्या मनात रुजवली आहे. ही भीतीच आपल्या समाजव्यवस्थेवरची सर्वात तीव्र, सर्वात वेदनादायी टिप्पणी आहे..जनगणनेदरम्यान घर, मोबाइल, इंटरनेट, गॅस, शौचालय आणि पिण्याच्या पाण्यासारख्या सुविधा आहेत का, याची माहिती घेतली जाते; मात्र कुटुंबावर किती कर्जाचा बोजा आहे, हा महत्त्वाचा प्रश्न मात्र विचारला जात नाही..घरोघरच्या मुलांशी संवाद साधला. दारिद्र्याचे चटके रोजच्या जगण्यात सोसणाऱ्या काही कुटुंबांतील मुलांच्या डोळ्यांत वयाला न शोभणारी उदासीनता दिसली. अपवाद वगळता नियमित शाळेत जाऊन शिकण्याची जिद्द, उमेद आणि स्वप्नं अनेक मुलांमध्ये हरवलेली जाणवली. मात्र मुली तुलनेने अधिक आत्मविश्वासाने ‘आम्हाला शिकायचं आहे’ असं सांगताना दिसल्या. गरिबीशी दोन हात करण्यात पालकांची सारी ऊर्जा खर्च होत असल्याने मुलांचे शिक्षण हा पालकांच्या आयुष्यातील केंद्रबिंदू न राहता अनेकदा तो दुय्यम विषय बनून जातो!.मध्यमवर्गीय आयुष्याने मला उन्हापासून बचाव करण्याची साधनं दिली होती; पण त्या वस्त्यांतील लोकांना आयुष्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी कुठलंच छप्पर लाभलं नव्हतं. ग्रीष्माच्या रखरखत्या उन्हाने माझं शरीर होरपळत होतं, तर समोर उभ्या असलेल्या दारिद्र्याच्या विदारक वास्तवाने मनाला असा दाह दिला की त्या उन्हाचाही विसर पडावा.(लेखक शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.