Dharashiv News : अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांसोबतच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाकडून केवळ खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जात असून, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची मात्र नोंद होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, लाखोंचे नुकसान होऊनही मदतीपासून भाजीपाला उत्पादक शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. .मुरूड येथील नागनाथ चौधरी हे पंधरा वर्षांपासून भाजीपाल्याची शेती करतात. शेती व्यवसायात गुंतवणूक करून जोखीम पत्करून आधुनिक शेती करण्याकडे त्यांचा कल असतो. मुलगा रेवणनाथ यांच्या मदतीने त्यांनी यावर्षी पाच एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली. १२ लाख रुपये कर्ज घेऊन पॉली हाऊस उभा केले. .टोमॅटो लागवडीसाठी त्यांना सहा ते सात लाख रुपये खर्च आला. नजर लागावी असे टोमॅटोचे पीक मोठ्या कष्टाने आणले होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसाने टोमॅटोच्या पिकाच्या काड्याच शिल्लक ठेवल्या आहेत. एका रात्रीतून झालेल्या अतिवृष्टीमुळे टोमॅटोच्या पिकात गुडघाभर पाणी साचून राहिले होते. .Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ३ लाख ५२ हजार हेक्टरला तडाखा .पावसाच्या जोरदार माऱ्यामुळे झाडाची फुले गळून गेली आहेत. ओलाव्यामुळे मुळांना बुरशीजन्य रोग झाला असून, झाडाच्या फक्त काड्या शिल्लक आहेत. यावर्षी टोमॅटोच्या पिकातून २० ते २२ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, झालेल्या खर्च निघणेही मुश्कील झाले आहे.मुरूड येथीलच महेंद्र सवासे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून १२ लाख रुपये कर्ज घेऊन पॉली हाऊस बांधून त्यात टोमॅटोचे पीक घेतले. यासाठी तीन लाख रुपये खर्च आला. सुरवातीस झालेल्या पिकाला चांगला भाव मिळाला. .यातून दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. नंतर आलेल्या पावसाने मात्र होत्याचे नव्हते केले. अतिवृष्टीमुळे पाण्याचा लोंढा पिकात घुसून मातीसह पीक वाहून गेले. उर्वरित पिकात गुडघाभर पाणी साचून राहिले. संपूर्ण बाग निकामी झाली आहे. दहा ते पंधरा लाख रुपयांचे अपेक्षित उत्पन्न असताना एक दीड लाख रुपये घेऊन समाधान मानावे लागत आहे. .Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे ८ हजार ७३९ हेक्टर जमिनीचे नुकसान.आलेले पैसे जमीन दुसरे पीक घेण्यायोग्य करण्यासाठीदेखील पुरण्याची शक्यता नाही. शासनाकडून अतिवृष्टीने बाधित पिकांचे पंचनामे करण्यात आले. मात्र, भाजीपाल्याच्या नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करण्यात आलेले नाहीत.या पिकांचे खरीप पिकांप्रमाणे पंचनामे केल्यानंतर भरपाई होणारच नाही. पण, झालेल्या खर्चाच्या मानाने अल्पशी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. लाखोंचे नुकसान असताना केवळ हजारामध्ये नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे..पालेभाज्या शेतीस खरीप पिकाप्रमाणे नुकसानभरपाई दिल्यास झालेल्या खर्चाच्या दहा टक्के रक्कमही मिळणार नाही. बँकेचे कर्ज घेऊन मोठ्या धाडसाने पालेभाज्यांची शेती केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना पालेभाज्यांच्या शेतीच्या नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करण्यात आलेले नाहीत. शासनाने पालेभाज्या पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वतंत्र पंचनामे करून बागायती क्षेत्राप्रमाणे भरपाई द्यावी.- महेंद्र सवासे, शेतकरी, मुरूड.खरिपातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश होते. पालेभाज्या शेतीच्या नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करण्यात आलेले नाहीत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून, अशा प्रकारच्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याचे तोंडी आदेश तालुका कृषी अधिकारी प्रमोद राठोड यांनी दिले आहेत.- अमोल बनसोडे, कृषी सहायक, मुरूड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.