Hingoli News : एक एकर जमिनीतून फारसं काही उरत नाही. कष्ट करायच त्यात घालायचं असं नेहमीच होतंय. औंदा शेताचं तळ झालं व्हत. सोयाबीनबी अन् हळदबी निम्मीबी व्हत नाही. कापणी केलेल्या सोयाबीनच शेवटच गाठोड बांधत असतांना वडगाव (ता. कळमनुरी) येथील राधाबाई व गंगाधर लोकडे या अल्पभूधारक दांपत्यानं मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली..हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्यांतील अनेक मंडलामध्ये कित्येक वेळा झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नाले, नद्या काठच्या जमिनीवरील पिके पूर्णपणे हातची गेली. पूर्णा, कयाधू, आसना या नद्यांना कैकवेळा पूर आले. शेकडो हेक्टर जमिनीवरील सुपीक मातीसह उभी पिके वाहून गेली. खरडून गेलेल्या जमीनी अनेक वर्षे नापिक राहणार आहेत. .Rain Crop Damage : नद्या, नाले, ओढ्याकाठच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान.पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकरी उरल सुरल सोयाबीन काढणीच्या कामाला लागले आहेत. शेत शिवारातून सोयाबीन कापणी, मळणी तसेच वाळवणीच्या कामांची लगबग दिसत होती. परंतु रविवारी (ता. ५) मध्यरात्रीनंतर सुरु झालेल्या पावसानं चिंता वाढविली आहे..मोठ्याचं कसबी धकते, गरीब शेतकऱ्यांच नेहमीच मरणंवडगाव (ता. कळमनुरी) येथील गंगाधर व राधाबाई लोकडे हे दांपत्य एक एकर जमिनीवर राबराब राबते. राधाबाई लोकडे म्हणाल्या, की फक्त शेतीवर संसाराचा गाडा चालत नाही. मोलमजुरी करावी लागते. व्याजानं दीडीन कर्ज काढावं लागतं. तीन मुली, एक मुलगा आहे. एका मुलीच लग्न झाल. त्यासाठी गावातील बचत गटाकडून ५० हजाराचं कर्ज काढावं लागलं. गरिबीमुळे मुलगा संघर्ष याला १० वीनंतरच शिक्षण थांबवावं लागलं. .शेताजवळुन जाणाऱ्या पासदगाव ते आखाडाबाळापूर या प्रमुख जिल्हा रस्त्यांची उंची वाढविल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जात नाही. यंदा अर्धा एकर सोयाबीन अन अर्धा एकर हळद लागवड आहे. आधी पीक चांगली दिसू लागली पण नंतर पाण्यात बुडाली होती. बियाणे, खतांची उधारी देणे बाकी आहे. पाणी साचलेल व्हत म्हणून अजून हळदीला खत द्यायचा राहिला आहे. मोठ्या शेतकऱ्यांचा जमिनीचा एक कोपरा गेला तरी त्यांच काही अडत नाही. आमचतर समंदच वायागेलं. कसं धकणार. अडीअडचणीला कुणीही मदत करत नाही. मजुरी करून आपूण आपलं धकवाव लागते. डिग्रस बुद्रूक (ता. कळमनुरी)येथील प्रकाश लोमटे म्हणाले, की चार एकर सोयाबीनमध्ये मांड्याएवढे पाणी असल्यामुळे सडून गेले आहे.कापायच कामच नाही. त्यामुळे शेताकडे जाऊ वाटेना झाले आहे. .म्हातारगाव (ता. वसमत) शिवारातील दगडू खटाळे यांच्या हळद पिकांमधील गवत साहेब वाघमारे व विनोद गायकवाड हे दोघे सालगडी उपटून टाकत होते. सततच्या पावसामुळे हळदी वाढ खुंटली. कंद सड झाली असल्याचे त्यांनी हळद उपटून दाखविले. माळवटा (ता. वसमत) येथील संतोष लकडे म्हणाले, की अडीच एकर सोयाबीन ओढ्यांच पाण्यात बुडाल्यांमुळे डागील झालयं. आरळ (ता. वसमत) येथील बापूराव सुरवसे म्हणाले, की औंदा पावसचा हिशोबच नव्हता..Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे संंकटांचा डोंगर.नगदी पिकांना फटका..कळमनुरी तालुक्यात सोयाबीन ५० हजार ५१३ हेक्टर, कपाशी ९ हजार १०५ हेक्टर, हळद ५ हजार ३२४ हेक्टरवर लागवड आहे. नवीन ऊस लागवड १० हजार ९०४ हेक्टर तर केळीची १ हजार ६५७ हेक्टर लागवड आहे. वसमत तालुक्यामध्ये सोयाबीन ४१ हजार ४१० हेक्टर, कपाशी ९ हजार ९४९ हेक्टर, तूर १ हजार ७९७ हेक्टर, हळद ११ हजार १३१ हेक्टर, केळी ६८० हेक्टर, ऊस ११ हजार ४२५ हेक्टर लागवड आहे..पुरामुळे सोयाबीन, कपाशी पिकांवर गाळ जमा झाला. शेंगांना मोड फुटले. भिजून भिजून बोंडातून फुटेलल्या कापूस काळवंडला. हळदीचे कंद सडले आहेत. ऊस आडवा झाला आहे. शेतरस्त्यावर चिखलामुळे केळी वाहतूक करता येत नाही. घड झाडावरच पिकत आहेत.दरही गडगडले आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.