विजय सांबरेIndian Ecosystem Conservation: दख्खनच्या पठारावर गवताळ माळरानांच्या परिसंस्थेचा वरचष्मा आहे. पठाराच्या अगदी मधोमध पाचही राज्यांमध्ये गवताळ रान आढळते. शेकडो प्रकारची तृण प्रभावळ व तिच्या संगतीत राहणारे असंख्य वन्यजीव, पाळीव प्राणी व मानवी वसाहती. माळढोक, तणमोर यांरखे देखणे पक्षी, वाघ, बिबळे, लांडगा, कोल्हा, खोकड अशी नानाविध वन्यप्राणी... ही या प्रदेशाची संपत्ती आहे..निसर्ग व मानव यांतील जैव-बंध जाणून घेण्याच्या निमित्ताने मागील तीन दशके भटकंती सुरू आहे. त्यासाठी तापी ते कावेरी यांच्या दरम्यान पसरलेल्या पश्चिम घाट तथा सह्याद्री भूमंडळातील (Landscape) नाना ठिकाणे पायाखाली घातली..दख्खनचे पठार हे उत्तरेला तापी नदीच्या तीरापर्यंत पसरलेले आहे, हे ज्ञात होते. पण दक्षिणेला या पठाराची सुरुवात कुठे होते याची उत्सुकता मनी दाटलेली होती. साधारण पंधरा वर्षांपूर्वी तमिळनाडू मधील निलगिरीच्या पर्वतराजीत कोटागिरी गावी ‘सह्याद्री बचाव मोहीम’ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. शेवटच्या दिवशी कोडनाड या ठिकाणी भेट दिली. पूर्व घाटाच्या रांगा व निलगिरी म्हणजे पश्चिम घाटाच्या रांगा येथे एकमेकींना भिडतात. जणू काही दोन महान पर्वतांचे हे ‘मेरू-मिलन’ कोडनाड गावी होते. येथून उत्तरेला नजर टाकली, की खाली खोल दरीतून मोयार नावाची नदी वाहते व थोडी नजर वर केली, की एक विस्तीर्ण सपाट भूभाग नजरेस पडतो. तो आहे दख्खनच्या पठाराचा आरंभ बिंदू!.दख्खन पठारदख्खनचे पठार हा दक्षिण आणि मध्य भारतातील एक विस्तीर्ण, त्रिकोणी विवक्षित असा उंच प्रदेश आहे. तो पश्चिम आणि पूर्व घाटांच्या दरम्यानचे अदमासे चार लक्ष चौरस किलोमीटरपेक्षा अधिक क्षेत्र व्यापतो. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश व उत्तर तमिळनाडूचा काही भाग अशी पाच राज्ये या दख्खनच्या पठाराने कवेत घेतले आहेत. ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली आहे. ज्वालामुखीच्या क्रियेतून (दख्खन ट्रॅप्स) निर्माण झालेल्या या प्रदेशात सुपीक काळी माती आहे. पुणे, हैदराबाद आणि बंगळुरू यांसारखी प्रमुख शहरे येथे वसलेली आहेत..हा प्रदेश भारतातील प्रमुख पाणलोट क्षेत्रांपैकी एक आहे. गोदावरी, कृष्णा आणि कावेरी सारख्या अनेक बारमाही नद्या या प्रदेशातून वाहतात. पठाराचा उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे हळूवारपणे होतो, ज्यामुळे बहुतेक प्रमुख नद्या पूर्वेकडे बंगालच्या उपसागराकडे वाहतात. पश्चिम घाट पावसाचे वारे अडवतो म्हणून, पठाराचा प्रदेश किनारी प्रदेशापेक्षा कोरडा असतो आणि हवामान अर्ध-शुष्क असते. या प्रदेशाची लहान पठारांमध्ये विभागणी होते. त्यामध्ये महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार आणि तेलंगणा पठार यांचा समावेश होतो..Biodiversity Conservation: देवराया : जैवविविधता जोपासणारी व्यवस्था.आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्वज्वारी, भात, कापूस, बाजरी, तेलबिया, ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष इत्यादी पिके दख्खनच्या पठारावर घेतली जातात. कोळसा, लोह खनिज, अभ्रक आणि बॉक्साइट यांसारख्या खनिजांनी हा भूभाग समृद्ध आहे. दख्खनच्या पठारावर सर्वात मोठा गट द्रविड भाषिकांचा आहे. त्यामध्ये साधारण ७३ भाषांचा समावेश होतो. मराठी, तुळू, तेलुगू, कन्नड, तमीळ व मल्याळम भाषा बोलणारे लोक या पठारावर राहतात. मुस्लिम धर्मीय लोक दख्खनी उर्दू नावाची एक प्रादेशिक बोली भाषा बोलतात..माळरानांची सृष्टी व्यवस्थादख्खनच्या पठारावर केवढी पर्यावरणीय-भौगोलिक विविधता आहे! महाराष्ट्राचा विचार केला तर, पश्चिमेचा सिंधू सागर, सह्याद्रीच्या पर्वतरांगा ते अगदी विदर्भातील गोंडवाना व पूर्वघाटाच्या पहाडांनी नानाविध परिसंस्था निर्माण केल्या आहेत. सागरी जलाची एक परिसंस्था, नद्यांची परिसंस्था, विविध प्रकारची जंगले व गवताळ परिसंस्था अशा किती तरी सुक्ष्म व समग्र नैसर्गिक व्यवस्था आजही पाहायला मिळतात. .त्यावर आधारित जीवन शैली अंगीकारलेले आदिवासी, मच्छीमार, भटके व स्थिर पशुपालक, शेतकरी आदी समाज आजही संघर्ष करत टिकून आहेत. त्या विविध परिसंस्था व मानवाचे अनोखे अद्वैत येथे पाहायला मिळते. या निसर्गस्नेही, निसर्गपूजक गाव-समाजाचे व्यावहारिक शहाणपण, कौशल्य, दृष्टिकोन, मूल्य व तत्त्वज्ञान नव्याने समजून घ्यायला हवे..दख्खनच्या पठारावर गवताळ माळरानांच्या परिसंस्थेचा वरचष्मा आहे. पठाराच्या अगदी मधोमध पाचही राज्यांमध्ये गवताळ रान आढळते. शेकडो प्रकारची तृण प्रभावळ व तिच्या संगतीत राहणारे असंख्य वन्यजीव, पाळीव प्राणी व मानवी वसाहती. माळढोक, तणमोर यांरखे देखणे पक्षी, वाघ, बिबळे, लांडगा, कोल्हा, खोकड अशी नानाविध वन्यप्राणी... ही या प्रदेशाची संपत्ती आहे..पशुपालन व शेतीकालौघात निसर्ग निर्मित परिसंस्थांचे रूपांतर शेती व पशुपालन यात झाल्यामुळे गृहसंवर्धित प्रकारची जीविधता गावरान पिके व पाळीव प्राण्याच्या रुपात निर्माण झाली. या सर्व घटकांशी मिळून मिसळून पशुपालक, शेतकरी, मच्छिमार, आदिवासी इत्यादी मानवी घटकांनी आपले जगणे सुसह्य केल्याचे दिसते..महाराष्ट्रात खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागात, डोंगर उतारांवर, पडीक जागांमध्ये, सपाट माळांवर गवताळ कुरणे आहेत. विदर्भ हे नावच ‘विपुल दर्भाचा प्रदेश’ यावरून आले आहे. या प्रदेशातील वनांच्या जोडीने गवताळ राने आढळतात. सह्याद्री अन् कोकणच्या सड्यांवर किंवा पठारांवर पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणात गवते वाढतात. सह्याद्रीचे घाटमाथे आणि कोकणचा अपवाद वगळता सर्वत्र अगदी विपूल प्रमाणात आहेत..द्वीपकल्पीय भारतातील गवताळ कुरणांसारख्या जगभरातील कुरणांना ‘ट्रॉपिकल ग्रासी बायोम’ अशी संज्ञा आहे. मध्यंतरी असे मानले गेले, की भारतीय गवताळ राने नैसर्गिक नाहीत. जे गवताळ प्रदेश आहेत ते मानवी हस्तक्षेपामुळे तयार झालेले आहेत, या मांडणीच्या विरोधातील सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे मानवी हस्तक्षेपाच्या कितीतरी आधीपासून इथे गवताळ राने आहेत, हे जमिनीत सापडणाऱ्या परागकणांच्या अभ्यासातून सिद्ध होते. मानवी शेती सुरू झाली सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी झाली. मात्र वैज्ञानिकांनी द्वीपकल्पीय भारतातील ठिकठिकाणचे खोल जमिनीमधील मातीचे नमुने घेतले आणि त्यातील परागकणांचा अभ्यास केला. या परागकणांच्या थरात असलेल्या मातीचाही कार्बन-डेटिंग तंत्रज्ञानानाने काळ ठरवला आणि असे सिद्ध केले, की तब्बल नऊ हजार वर्षांपूर्वी या प्रदेशात जंगलांच्या जोडीने गवताळ रानेही विस्तृत प्रदेशात होती. थोडक्यात, माळराने ही निरुपयोगी वा पडीक क्षेत्र (Westland) नाहीत, हे सर्वांनी समजून घ्यायला हवे..Biodiversity Conservation: जैवविविधताच मानवाला वाचवेल.गवताळ माळारानांची जैवविविधताकोणतीही परिसंस्था अनेक प्रकारच्या जैविक आणि अजैविक घटकांच्या परस्पर अवलंबनामुळेच आकाराला येते. परिसंस्था स्थिर राहण्यामागे या घटकांचा समतोल आवश्यक असतो. गवताळ रानं या परिसंस्थेसाठी तेथील गवते आणि इतर वनस्पती, या वनस्पतींवर अवलंबून असणारे प्राथमिक भक्षक व अन्नजाळ्यातील चढत्या क्रमाने येणारे द्वितीय आणि त्रितीय भक्षक हे आवश्यक जैविक घटक आहेत. पाणी, हवा व जमीन हे अजैविक घटक आहेत. यातला जमीन किंवा माती हा घटक काही प्रमाणात जैविकच मानला पहिजे. कारण या मातीत अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव मेलेले प्राणी, वनस्पतींचे विघटन करून त्यांनी जमिनीतूनच घेतलेली मूलद्रव्ये परत जमिनीत मिसळण्याचे काम करतात..दख्खनच्या पठारावर कमी पाऊस पडतो. त्यामुळे या अधिवासामध्ये कमी पावसामधे जगू शकतील अशा वनस्पतींची संख्या जास्त आहे. त्यात गवते विपुल प्रमाणात आहेत. एखाद्या प्रदेशात पडणारा पाऊस, त्यामुळे वर्षभरात पाणी उपलब्ध असणारा काळ, तेथील माती, त्या भागातील तापमान आणि त्या गवताळ रानामध्ये होणारा मानवी हस्तक्षेप या साऱ्याचा परिणाम तेथील वेगवेगळ्या अधिवासांच्या वैविध्यावर, पर्यायाने उपलब्ध वनस्पतींच्या जातींवर होतो..गवताळ माळराने एकसारखी गवतांनी भरलेली दिसत असली तरी त्यांमधेही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अधिवास असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला हिरवे हिरवे गार गालिचे वाटणारी गवताळ राने पावसाळा सरता सरता कुसळे असलेल्या गवताच्या जातींनी भरून जातात. ही कुसळे गवतांचे, चरणाऱ्या प्राण्यांपासून रक्षण करतातच. पण त्या जोडीने गवताच्या बिया जमिनीत रुजवायचे कामही करतात. या रानांतील उंचसखल भागांनुसार तेथील वनस्पतींच्या जातींचे वितरण आणि प्रमाणही बदलले..माळरानांमधे एखादा वर्षायू झरा किंवा ओढा वाहत असेल तर त्याच्या कडेला वाढणारी गवते ही त्याच माळरानावर इतरत्र वाढणाऱ्या गवतांच्या मानाने वेगळी असतात. ही ओढ्याकडेची गवते पाण्याच्या उपलब्धतेमुळे जास्त फोफावलेली व काहीशी उशिरा फुलणारी असतात. आपल्याकडे महाराष्ट्रात सर्वत्र अशा ओहोळांकडेला वाढणारे कशेड नावाचे वैशिष्ट्यपूर्ण गवत आहे. या गवतामध्ये त्याची मादी फुले आणि नर फुले वेगवेगळी असतात. कशेडच्या बिया, ज्याला इंग्रजीत कॅरिऑपसिस म्हणतात, कवडीसारख्या दिसणाऱ्या मात्र त्याहून छोट्या आणि शुभ्र पांढऱ्या असतात. इतर वनस्पतींसारख्या गवतांच्या बिया या खऱ्या बिया नव्हेत, तर फळांचा काही भाग बियांशी एकजीव होऊन हे दाणे तयार झालेले असतात..ओहोळाकडेला वाढणाऱ्या गवतांच्या अगदी उलट गवते माळरानांवर असणाऱ्या खडकाळ भागांच्या जवळची असतात. या अधिवासात पाण्याचे कायमच दुर्भिक्ष असते. त्यामुळे इथली गवते फारशी उंच न होणारी, पाण्याची उपलब्धता आहे तोवरच आपला जीवनक्रम संपवणारी आहेत. गवताळ रानांमध्ये काही प्रमाणात असणाऱ्या पानगळी वृक्षांच्या सावलीत वाढणारी गवते आणखी वेगळी आहेत. गोंडाळ नावाचे गवत अशा सावली मध्येच वाढते. वृक्षांच्या सावलीत असणारी ओल जास्त दिवस टिकत असल्याने, तसेच सावली मिळत असल्याने ही गवते खडकाळ भागातील गवतांपेक्षा जास्त तग धरतात आणि त्यांचा बीजप्रसार थोडा सावकाशीने होऊ शकतो. .थोडा उशिरा बीजप्रसार झाल्याने उन्हाळ्याच्या काळात बिया जास्त संख्येने तग धरू शकतात. पुरेशी माती असलेल्या भागांमध्ये मारवेल आणि पवन्या यांच्या जोडीनेच डोंगरी नावाचे गवत वाढते. या गवताचा जमिनीच्या पृष्ठभागावर एक मोठा गठ्ठा वाढतो त्यातूनच दरवर्षीचे नवे फुटवे येतात. असे हे माळरानावरील ‘तृण-विश्व’ अगाध आहे. त्याच्या आधारे मानव व इतर सजीव पिढ्यानपिढ्या दख्खनच्या पठारावर तगले आहेत. ही माळराने टिकली तरच येथील वन्यजीव, पाळीव प्राणी व माणूस टिकेल, हे नक्की.(तांत्रिक-संदर्भासाठी डॉ. मंदार दातार यांच्या ‘महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश’ लेखाचा विशेष उपयोग झाला.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.