Pune News : शिरूर-श्रीगोंदा तालुक्यांची जीवनवाहिनी ठरलेली घोड नदी अक्षरशः कोरडी पडली आहे. गेल्या आठ दिवसांपासून नदीपात्रात पाण्याचा पूर्ण खडखडाट झाला असून शिरसगाव काटा ते इनामगाव, तांदळीपर्यंतच्या पट्ट्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी आणि शेती या दोन्ही गरजांसाठी नदीवर अवलंबून असलेल्या दोन्ही तालुक्यांतील दहा गावांवर पाणीटंचाईचे तीव्र सावट दाटले आहे..शिरूर तालुक्यातील चिंचणी, शिरसगाव काटा, पिंपळसुटी, इनामगाव, तांदळी तसेच श्रीगोंदा तालुक्यातील बोरी, हंगेवाडी, वांगदारी, काष्टी, सांगवी या गावांची तहान भागवणारी नदी आज वाळूच्या ढिगाऱ्यांत हरवली आहे..Water Storage: सातपुड्यातील सिंचन प्रकल्पांत जलसाठा स्थिर.नदीपात्रात जागोजागी तडे गेलेले दिसत असून अनेक ठिकाणी कृषिपंप उघड्यावर पडले आहेत. शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली पाणीउचल यंत्रणा निष्क्रिय ठरली आहे..Water Storage: सातपुड्यातील सिंचन प्रकल्पांत जलसाठा स्थिर.इनामगाव परिसरात काही ठिकाणी पाण्याची छोटी डबकी शिल्लक असली तरी शिरसगाव काटा ते पिंपळसुटी दरम्यानचा पट्टा पूर्ण कोरडा आहे. गेल्या दोन दिवसांत परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. विविध गावांच्या पाणीपुरवठा योजनांवरही ताण वाढला आहे..शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विजय मोकाशी, इनामगावच्या माजी सरपंच पल्लवी घाटगे यांनी प्रशासनाने विलंब न लावता नदीपात्रात पाणी सोडावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय जाहीर झालेला नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जीवनवाहिनीच आटल्याने ग्रामीण भागातील वास्तव गंभीर बनले असून तातडीच्या उपाययोजना न झाल्यास टंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.