Latur News : घरणी मध्यम प्रकल्पाच्या पाण्यावर आधारलेली शेती, समृद्ध जमिनी व हिरवीगार पिके यामुळे नळेगाव येथील शेतकऱ्यांचे जीवन सुखकर मानले जायचे. परंतु, यावर्षी घरणी नदी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी शाप ठरली. उत्तरेकडून वाहणाऱ्या घरणी नदीने अतिवृष्टीच्या पाण्याने ओसंडून वाहत पात्र सोडले. .नवा प्रवाह शेतकऱ्यांच्या शेतजमिनींवरून जात असल्याने शेकडो एकर जमीन पाण्याखाली जाऊन पिकांचे नुकसान झाले. पिकांसोबत मातीही वाहून गेली, महापुरामुळे हिरव्या स्वप्नांचा चिखल झाला असून, साहेब, आता पिकेच नाही तर कर्ज फेडायचे कसे असा टाहो फोडत शेतकऱ्यांनी आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली..Maharashtra Flood Relief : महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करणार.सप्टेंबर महिन्यातील पावसाने नदीकाठी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी पिकांसह वाहून गेल्या. उर्वरित क्षेत्रातील सोयाबीनच्या पिकात अजूनही पाणी आहे. काही ठिकाणी सोयाबीनलाच कोंब फुटले आहेत. पाण्यातील सोयाबीन काढण्यासाठी मजुरांनी आताच एकरी हजार ते दीड हजार रुपयांची भाववाढ केली आहे. उन्हाचा प्रभाव वाढल्याने शेंगा फुटून सोयाबीनचे नुकसान होत आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे सोयाबीन व ऊस काढण्यासाठी यांत्रिकीकरणाचा पर्याय सर्व शेतांत योग्य ठरण्याची शक्यता नाही. .चिखलामुळे ऊस व सोयाबीन काढण्याचे मशीन शेतात चालण्यासाठी अडचण येणार आहे. यामुळे दोन्ही पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांना मजुरावर अवलंबून राहावे लागणार असून, उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. शेकडो हेक्टर शेतजमिनी पाण्याखाली दडपून गेल्या आहेत. खरीप हंगामातील सोयाबीन, ऊस, ज्वारी, मका यासारखी सर्व पिके वाहून गेली. .Maharashtra Flood : पंचनाम्यांचा सोपस्कार कशासाठी?.शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामाचे रूपांतर झालेले पीक क्षणात पाण्याच्या लाटेत विलीन झाले. केवळ पिकेच नव्हे तर गोठे, जनावरे, बांध, पिकवलेल्या बागा, शेतीची कुंपणेही पुराच्या तडाख्यात सापडली. माणसाला कसंबसं खायला मिळेल, पण जनावरांना चारा कुठून आणायचा, अशी आर्त हाक शेतकऱ्यांमधून उमटत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पशुधन उपाशी राहिले आहेत..या भागातील शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थचक्र हे पूर्णपणे शेतीच्या उत्पादनावर आहे. सोयाबीन, उडीद, मूग आणि तूर हे शेतकरी वर्गासाठी पैसे मिळवून देणारी पिके आहेत. तीच पिके यावर्षी अतिवृष्टी होत असल्याने हातची गेली आहेत. त्यामुळे अर्थचक्र पूर्णपणे बिघडले आहे. वर्षभर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, दवाखाना या मूलभूत गरजा कशा भागवाव्या हा प्रश्न आहे.— दयानंद मानखेडे, शेतकरी.शिक्षणासाठी बाहेर असलेल्या मुलांना पैसे पाठवावेच लागतात. खरिपाच्या उत्पन्नावर खर्चाची तरतूद करावी, असा विचार असणाऱ्या शेतकऱ्यांना आता मुलांच्या शिक्षणासाठी कर्जबाजारी व्हावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. वडिलांना कोणत्या तोंडाने पैसे मागायचे, असा प्रश्न आता मुलांना पडला आहे.— गोविंद नरवाडे, शेतकरी .जूनपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक युवा शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात फळबागांची लागवड केली होती. मात्र, सातत्याने होणाऱ्या अतिवृष्टीमुळे फळबागांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना लवकर भरीव मदत दिवाळीपूर्वी दिली पाहिजे. — गंगाधर बोळेगावे, शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.