अभिजित कव्हळे, डॉ. सुदर्शन लटके, डॉ. विवेक शिंदे हरभरा उत्पादनावर परिणाम करणाऱ्या रोगांपैकी मर रोग हा अतिशय घातक रोग आहे. हा रोग प्रामुख्याने फ्युजारिअम ऑक्सिस्पोरम (Fusarium oxysporum f. sp. ciceri) या मातीजन्य बुरशीमुळे होतो. विशेषतः कोरडवाहू भागात हा रोग अधिक तीव्र स्वरूपात दिसून येतो. रोपावस्थेत रोग आल्यास पूर्ण पीक नष्ट होण्याची शक्यता असते. सध्याच्या फुलोरा व घाटे भरण्याच्या अवस्थेत रोग उद्भविल्यास दाणे अपुरे भरतात व उत्पादनाची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे उत्पादनात १० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. .रोगाची लक्षणेरोगाची सुरुवात बहुधा रोपावस्थेत किंवा फुलोऱ्याच्या काळात होते.सुरुवातीला खालची पाने पिवळी पडतात, नंतर संपूर्ण झाड वाळते.झाडाची वाढ खुंटते. आंशिक मर (partial wilting) दिसून येते.मुळाजवळील खोड कापल्यास आतल्या वाहिन्या तपकिरी किंवा काळपट झालेल्या आढळतात.प्रगत अवस्थेत संपूर्ण झाड कोमेजून मरून जाते, परंतु पाने गळून पडत नाहीत..Chickpea Crop Protection: हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव.रोगाचा प्रसार व जीवनचक्ररोगग्रस्त पिकांचे अवशेष, माती व संक्रमित बियाणे यांद्वारे या रोगाचा प्रसार होतो.रोगाला कारणीभूत असलेली बुरशी मातीत दीर्घकाळ टिकून राहते. ही बुरशी जमिनीत प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्यासाठी क्लॅमायडोस्पोअर्स तयार करते. ते अनुकूल परिस्थिती मिळताच पुन्हा सक्रिय होऊ शकते.बुरशी मुळांद्वारे झाडात प्रवेश करून झायलम (पाणी व अन्नद्रव्य वाहून नेणाऱ्या नलिका) वाहिन्यांमध्ये वाढते, त्यामुळे पाणी व अन्नद्रव्यांचा पुरवठा बंद होतो..रोग उद्भविण्यास कारणीभूत घटकसलग हंगामी हरभरा लागवड, निचरा नसलेली जड जमीन, २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान, संक्रमित बियाण्याचा वापर, सेंद्रिय कर्बाचे कमी प्रमाण आणि पाणी व अन्नद्रव्यांचा ताण अशा घटकांमुळे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. प्रादुर्भावग्रस्त बियाण्यांमुळे मर रोग नव्या क्षेत्रात पसरण्यास वाव मिळते. अनेक वेळा बाह्यदृष्ट्या निरोगी दिसणाऱ्या बियाण्यात सुप्तावस्थेत असलेल्या बुरशीमुळे प्रसार होतो. अलीकडे हवामान बदलामुळे तापमानात वाढ, पावसाचे अनियमित वितरण आणि दुष्काळी परिस्थिती यामुळे हरभरा मर रोगाची तीव्रता वाढताना दिसून येत आहे. उष्ण व कोरड्या हवामानात झाडांवर ताण येतो, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि बुरशीला झाडावर हल्ला करण्यास पोषक परिस्थिती मिळते. त्यामुळे हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर रोग व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे ठरते..Grape Crop Protection: ढगाळ वातावरणात भुरी नियंत्रणावर हवा भर.रोग व जमिनीचा परस्पर संबंधहरभरा मर रोग हा मातीजन्य रोग असल्यामुळे जमिनीची भौतिक व रासायनिक अवस्था रोगाच्या तीव्रतेवर प्रभाव टाकते. ज्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असते, सूक्ष्मजीवांचे जैवविविधतेचे संतुलन बिघडलेले असते किंवा निचऱ्याची समस्या असते, अशा जमिनीत रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. क्षारीय व हलक्या काळ्या जमिनीत हा रोग जास्त प्रमाणात आढळतो..रासायनिक नियंत्रणाच्या मर्यादाहरभरा मर रोग हा झायलम वाहिन्यांमध्ये वाढत असल्यामुळे फवारणीद्वारे दिलेली बुरशीनाशके प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळे केवळ रासायनिक उपायांवर अवलंबून राहणे योग्य नाही. रासायनिक बियाणे प्रक्रिया ही सुरुवातीच्या अवस्थेत काही प्रमाणात संरक्षण देते, परंतु दीर्घकालीन नियंत्रणासाठी जैविक व अन्य उपायांची जोड आवश्यक आहे..Crop Protection: थंडीच्या काळात काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन.जैविक नियंत्रणाचे वाढते महत्त्वट्रायकोडर्मा, स्युडोमोनास फ्लुरोसेन्स यांसारखे उपयुक्त सूक्ष्मजीव जमिनीत रोगकारक बुरशीच्या वाढीस आळा घालतात. हे जैवघटक मुळांभोवती संरक्षक कवच तयार करून रोगकारक बुरशीशी अन्न व जागेसाठी स्पर्धा करतात. सातत्याने जैविक घटकांचा वापर केल्यास जमिनीतील सूक्ष्मजीव संतुलन सुधारते व मर रोगाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होतो..शाश्वत उत्पादनासाठी एकात्मिक रोग व्यवस्थापनहरभरा मर रोगाचे यशस्वी नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. एकदा झाल्यानंतर मर रोग पूर्णपणे बरा होत नाही. त्यामुळे वेळीच रोगग्रस्त झाडांचे निर्मूलन, योग्य पाणी व्यवस्थापन व जैविक-रासायनिक उपायांचा समन्वय केल्यास रोगाचा प्रसार रोखता येतो आणि उत्पादनात होणारे मोठे आर्थिक नुकसान निश्चितच टाळता येऊ शकते..Crop Protection: अन्न, पोषण सुरक्षितेसाठी पीक संरक्षण महत्त्वाचे .रोगग्रस्त व अर्धवट वाळलेली झाडे मुळासकट उपटून शेताबाहेर नष्ट करावीत.शेतात पाणी साचू देऊ नये. गरजेनुसार हलके पाणी द्यावे.ट्रायकोडर्मा व्हिरिडी किंवा ट्रायकोडर्मा हार्झियानम २.५ ते ५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणे शेणखतात मिसळून ओळींमध्ये द्यावे. (अॅग्रेस्को शिफारस)ओळींमध्ये नीमकेकचा २५० ते ५०० किलो प्रति हेक्टर प्रमाणात वापर करावा.शेणखत व सेंद्रिय खतांचा वापर वाढवून जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे संतुलन सुधारावे..चांगला निचरा असलेली जमीन निवडून नत्र खताचा अतिरेक टाळावा.हरभऱ्यानंतर पुढील हंगामापूर्वी ज्वारी, बाजरी, मका यांसारखी पिके घेऊन पीक फेरपालट करावी.पुढील हंगामासाठी प्रतिरोधक वाणांचा वापर करावा. उदा. फुले विक्रांत, विजय, विशाल, दिग्विजय, जे.जी.-११,पुढील हंगामासाठी प्रमाणित व रोगमुक्त बियाणे वापरावे. बियाणे पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा ४ ते ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी.- डॉ. सुदर्शन लटके ७५८८५१३५२९(वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.