Bogus Seeds Scandal : सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील व्हीगर बायोटेक प्रा. लि. या बियाणे कंपनीविरुद्ध दारव्हा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय संबंधित कंपनीचे बियाणे विक्री करणाऱ्या पाच कृषी केंद्रांवरील सुमारे ४ लाख ८० हजार रुपये किमतीच्या बियाण्यांची विक्री बंद करण्याची संयुक्त कारवाई कृषी विभागाने केली..पंचायत समितीचे कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) नीलेश भोयर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. दारव्हा तालुक्यातील ३८ शेतकऱ्यांनी व्हीगर बायोटेक प्रा. लि., (तराना तहसील, सानवेर, जिल्हा इंदूर, मध्य प्रदेश) या कंपनीच्या सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली होती..Seed Quality: हिंगोली जिल्ह्यात बियाण्याचे ३४ नमुने अप्रमाणित.तक्रारीनंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि पंचायत समितीच्या कृषी विभागाने शिवारात जाऊन पाहणी केली. कंपनीने बियाण्याच्या टॅगवर ७० टक्के उगवणक्षमतेचा दावा केला असला, तरी अनेक शेतांमध्ये समाधानकारक उगवण झाली नसल्याचे या वेळी तपासात आढळून आले. त्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक झाल्याचा ठपका ठेवत कंपनी आणि जबाबदार व्यक्ती विजयसिंग अनिरुद्धसिंग कुशवाहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला..या प्रकरणात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ मधील कलम ३ व ७, बियाणे नियम, १९६८ मधील नियम १० व २३ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस)-२०२३ च्या कलम ३१८ (४) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कृषी विभागाने संबंधित बियाण्यांची विक्री तत्काळ बंद करण्याचे आदेश देत पुढील चौकशी सुरू केली आहे.