उत्तरार्धMelghat Education Quality Issue: शिक्षणाचं वाढलेलं प्रमाण हा समाधानाचा पैलू असला तरी गुणवत्तेत मात्र फार बदल जाणवत नाही. शाळांत मुलांची वाचन-लेखनातली प्रगती अजूनही समाधानकारक नाही. मेळघाटमधील एका शाळेत आम्ही गेलो तेव्हा मुलं डिजिटल क्लासमध्ये चित्रपट बघत बसली होती. मुलांची शिक्षिका गावातच कुठे तरी गेल्या होत्या. आम्ही गेल्यावर त्या आल्या. मुलांना फळ्यावरील ‘दिनविशेष’ हा शब्द वाचायला सांगितला. मुलं तो वाचू शकली नाहीत. चौथीच्या मुलाला दोन आकडी संख्या वाचायला प्रयास पडत होते. शाळा मात्र डिजिटल होती! .परभणी जिल्ह्यात जिंतुर तालुक्यातल्या एका छोट्या गावातल्या शाळेत दोनच शिक्षक नेमलेले होते; पण ते शाळेत आलटून पालटून उपस्थित राहत असावेत असे उत्तरांवरून वाटत होते. रस्त्याने येताना जाणवले की सकाळच्या शाळा एक तास अगोदर सोडून दिलेल्या होत्या. शाळा सुटण्याची प्रत्यक्षातली वेळ गावकऱ्यांनाही सांगता येत नव्हती. हे सर्व तपशील नकारात्मक आहेत पण हे वास्तव एकूणच शाळांची विश्वासार्हता ठरवते हे लक्षात घ्यावे. .उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जळकोटमधील भटक्यांच्या वस्तीत दीडशे घरं आहेत. वस्तीत सर्व मिळून फक्त २२ मुलं शाळेत जातात. वस्तीतली सर्वांत जास्त शिकलेली मुलगी आता पाचवीत आहे. संपूर्ण वस्तीत फक्त तीन मुली शिकतात. मेळघाटमधीलच खडीमल येथील शाळेत २७ पैकी १९ मुलं हजर होती. शाळेतल्या नऊ विद्यार्थ्यांचे पालक स्थलांतर करणार असल्याने ती मुलं शाळा सोडून जाणार आहेत. जिथे जातील तिथे परत शाळेत भरती होतील की नाही, हे खात्रीशीररीत्या सांगता येत नाही. विद्यार्थ्यांकडे कोणतंच साहित्य नव्हतं. अनेकांकडे पाटीही नव्हती; पुस्तकांची तर बातच सोडा. शिक्षक म्हणाले, ‘‘मुलांना साहित्य दिलं आहे, पण मुलं ते आणत नाहीत.’’ मुलं काहीच बोलत नव्हती. मला दप्तराच्या ओझ्यावरील निरर्थक चर्चा आठवली. शाळेतल्या केवळ एका मुलाला वाचता येत होतं. तो मुलगादेखील मूळचा त्या शाळेतला नव्हताच, दुसऱ्या गावातला होता. .Maharashtra School Reality: शिक्षणाची यत्ता कंची? .नागपूर जिल्ह्यातील मौंदा येथील धीवर वस्तीत ३०० कुटुंबं आहेत. या वस्तीत अगदी थोडी मुलं बारावी पास झाली आहेत. संगीता मारबती या मुलीकडे जातीचा दाखला नव्हता. त्यामुळे महाविद्यालयाने तिच्याकडे पाच हजार रुपये मागितले होते. त्यामुळे तिचा पुढल्या शिक्षणाचा मार्ग खुंटला होता. आदल्या वर्षी तिची बहीण माधुरी हिने जातीचा दाखला निघत नाही व त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण परवडत नाही म्हणून शिक्षण सोडलेलं. ती आता आईसोबत मजुरीला जाते. वडील मासे पकडतात. .घर अतिशय साधं आहे. दोघी बहिणी सुट्टीच्या काळात केटरर्सकडे भांडी घासतात. मुलींचे वडील त्यांच्या दाखल्यासाठी स्वतःच्या जन्मगावी भंडारा इथे गेले; पण तिथे आता त्यांना ओळखणारं कोणीही नाही. वडिलांचा जन्म १९४०च्या दशकातला. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना ‘त्या काळातील नोंदी वाचता येत नाहीत’ असं लेखी उत्तर दिलं. एकेक कागदपत्रे मिळवताना येणाऱ्या अडचणींमुळे वंचितांच्या उच्च शिक्षणाला खीळ बसते..Government Schools Crisis: सरकारी शाळांचा बीमोड होण्याची भीती.पैशांची चणचण आणि त्यामुळे गुणी मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा, हे चित्रदेखील असंच विदीर्ण करणारं आहे. आईच्या शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी एक मुलगा शाळा सोडून सालगडी झालेला मी बघितला. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवतीत बंजारा जमातीच्या एका मजूर महिलेला दारू विकण्याच्या केवळ संशयावरून पोलिसांनी बेदम मारलं, त्यामुळे तिला पोटाचा विकार सुरू झाला. ती आता मजुरीला जाऊ शकत नाही. ती आपल्या दोन्ही मुलांचा एकटीने सांभाळ करते. पैशाअभावी तिने नाइलाजाने मुलांना शाळेतून काढलं. ती मुलं आता शेळ्या चारायला जातात. शेळ्या वळण्याचे मोठ्या मुलाला १५० रुपये व लहान मुलाला १०० रुपये मिळतात. ती आता मोठ्या मुलाला सालगडी करणार आहे. त्यातून तिच्या शस्त्रक्रियेचा खर्च निघेल असं तिला वाटतं. एकीकडे सक्तीच्या शिक्षणाच्या बाता होत असताना राज्यातल्या अनेक विभागांमध्ये असं चित्र नजरेस पडतं. .शिक्षण घेतानाच्या इतरही काही अडचणी आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रेल्वे स्टेशनजवळ एक उघड्यावरची वस्ती आहे. तिथल्या अनेक मुलांनी शाळा सोडली आहे. त्याचं कारण त्यांना विचारल्यावर एकजण पटकन म्हणाला, की शाळेत त्यांना इतर मुलं मारायची. शिक्षकांना सांगितलं तर शिक्षकही आम्हालाच मारायचे. खरे खोटे काहीही असो, पण ती मुले आज शाळेबाहेर आहेत. त्या भागातल्या काही आश्रमशाळांना जेव्हा विद्यार्थ्यांची गरज होती तेव्हा त्यांनी या वस्तीतील मुलांना आपणहून शाळेत नेलं. त्यांच्यासाठी गणवेश शिवून घेतले. मुलांना आणण्यासाठी रोज रिक्षा यायची; पण त्यांची गरज संपली. आता रिक्षा पाठवत नाहीत आणि मुलंही शाळेत जात नाहीत..आशेची किरणेशिक्षणाबाबत हताश करणारं चित्र असलं तरी त्याच्या जोडीला राज्याच काही यशोगाथाही लिहिल्या जात आहेत. हेमलकशाच्या लोकबिरादरी प्रकल्पातर्फे नेलगुंडा इथे सुरू झालेलं साधना विद्यालय बघता आलं. भामरागडपासून आत जंगलात २९ किलोमीटरवरील या शाळेत लांबलांबून मुले आनंदाने येतात. येथे दुसरीच्या वर्गातील मुलं सहजपणे इंग्रजीचं पुस्तक वाचत होती. शाळेत मुलांना मातीकाम व इतर कलांसाठी खूप वेळ ठेवलेला आहे. शाळेच्या दिशेला जाणारा धड रस्ता नाही. आसपास दाट जंगल आहे. असं असूनही मुलं शाळेत येण्यास नेहमीच उत्सुक असतात. .समीक्षा आमटे आणि शाळेचे इतर शिक्षक शाळेवर, मुलांसाठीच्या विविध उपक्रमांवर खूप मेहनत घेत आहेत. असंच एक उदाहरण हिंगोली जिल्ह्यातील एका शाळेचं. जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात तरोदा येथील शाळेत देविदास गुंजकर या शिक्षकाने मुलांच्या क्षमता विकसित करण्यावर खूप मेहनत घेतली आहे. शाळेतल्या दुसरीच्या मुलांनी दहावीच्या पाठ्यपुस्तकातील अनेक कठीण शब्द लिहून दाखवले. हे सर्व गाव आदिवासी लोकवस्तीचं आहे. तालुक्यातील इतर शाळेतल्या शिक्षकांसाठी गुंजकर गुरुजींच्या इथे कार्यशाळा घेतल्या जातात. मुलांचे वर्ग सुरू असताना कार्यशाळेचे शिक्षकही वर्गात बसलेले असतात. आतापर्यंत अशा ८० कार्यशाळा झाल्यात. गुंजकर गुरुजी म्हणतात, ‘‘जो शिक्षक घाईघाईने शिकवतो त्याचे विद्यार्थी शिकण्यात मागे पडतात आणि जो शिक्षक सावकाश, दमादमाने शिकवतो त्याची मुलं झपाट्याने प्रगती करतात.’’ .शिक्षणामागचं मर्म जाणलं तरच महत्त्वाचं आहे. असं झालं तरच वाड्या-वस्त्यांवरचं शिक्षण खऱ्या अर्थाने वरच्या वर्गात जाईल. सरकारी शाळांकडे संसाधने कमी आहेत. त्यासाठी संघर्ष करावाच लागेल पण तरीही या शाळा गुणवत्तेनेच स्पर्धा करू शकतात हे अनेक शाळांनी आणि शिक्षकांनी सिद्ध केले आहे. अशा मराठी शाळांनी इंग्रजी शाळेकडून विद्यार्थी खेचले आहेत.: ८२०८५८९१९५(लेखक शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.