Farm Labour Wages and Agricultural Crisis: माझा जन्म नागपूर या शहरात १९४७ मध्ये झाला. वडीलांचे फार लवकर निधन झाले. त्यामुळे नागपुरच्या आजोबांनीच आमचे पालन पोषण केले. आमचा शेतीशी काहीच संबंध नव्हता. आम्ही फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडील आजोबांकडे जात होतो. परिस्थिती समजण्याचे वय झाले तेव्हा हे लक्षात आहे की, गावाकडे आजोबा मोठे जमीनदार, पण ते नेहमीच आर्थिक ‘तंगीत’ असायचे. नागपुरचे आजोबा कापड व्यापारी त्यांनी शुन्यातून समृद्धीकडे वाटचाल केली होती. याचे कारण लक्षात येत नव्हते, पण १९७० मध्ये आमच्या काकांच्या वाटण्या झाल्या व माझ्या मोठ्या भावाला ४०-४० एकर कोरडवाहू जमीन वाट्यास आली. .माझ्या मनात विचार आला की, ८० एकर जमीन आहे. आपण शेती करावी. म्हणून मी नागपूर येथे जाऊन येवून शेती करण्याचा निर्णय घेतला. चार बैल जोड्या विकत घेतल्या. भाड्याच्या ट्रॅक्टरने (सरकारी) जमीन नांगरून घेतली. त्या काळात शेतात काम करणाऱ्या महिलांची मजुरी बारा आणे ते एक रुपया होती. माणसांची मजुरी २ ते २.५० रुपये होती. इतकी कमी मजुरी देवून १९७१ च्या शेतीमाल विक्रीतून काहीच शिल्लक राहीले नाही..७५ ते १०० रुपये प्रतिक्विंटल ज्वारी, १०० रुपये प्रतिक्विंटल तूर, १५० ते २०० रुपये क्विंटल कापूस असे बाजार भाव होते. १९७२-७३ नंतर संकरीत कापसाचा प्रचार-प्रसार होवू लागला. विदर्भात डॉ. मा. गो. बोकरे यांच्या विचाराने कापसाच्या भावासाठी कापूस उत्पादक संघाची स्थापना झाली. डॉ. बोकरे आणि डॉ.चोखारे कापूस ते कापड हे गणित फार सोप्या शब्दात समजवून सांगायचे. यातूनच १९७२ मध्ये महाराष्ट्रात कापूस एकाधिकार खरेदी योजना सुरू झाली. ‘कापूस ते कापड’ असे ब्रीदवाक्य या योजनेच्या प्रचाराच होते..१९७० ते १९७२ या काळात बाहेरून काही (निविष्ठा) जास्त विकत घेऊन शेती करीत नव्हते. मात्र, १९७३ नंतर एच-४ कापसाचा प्रचार व प्रसार वाढला व रासायनिक खते व कीडनाशकांचा वापर वाढला. म्हणजेच भांडवळी खर्चाची वाढ झाली. या तंत्राने उत्पादन वाढले पण बाजारात भाव पडायचे. १०० रुपये प्रतिक्विंटल ज्वारी, १०० रुपये प्रतिक्विंटल तूर व १८० ते २०० रुपये प्रतिक्विंटल कापूस विकून शिल्लक काहीच नाही..Farmer Crisis: घटते क्षेत्र, वाढती चिंता.मला पहिला प्रश्न पडला की, इतकी कमी मजुरी देवून जर काहीच शिल्लक नाही तर कुटुंब कसे पोसायचे? मजुरी वाढवावी नाहीतर इंदिरा गांधी म्हणतात, ‘गरीबी हटाव' ती कशी हटणार? यातून माझ्या मनातील प्रश्नांची उत्तरे मी शोधू लागलो. यात मला डॉ. बोकरे आणि डॉ. चोखारे यांची मदत झाली. वाचन केल्यावर माझ्या लक्षात असे आले की, लोकांच्या गरीबीचे कारण गावात नाही ते या व्यवस्थेत आहे..शेतमालक हा शेतमजुरांच्या गरीबीचे कारण नाही तर ही व्यवस्थाच शेतकऱ्यांना सांगते की, तुम्ही कमीत कमी मजुरी द्या व जास्तीत जास्त काम करून घ्या. स्वस्तात स्वस्त शेतीमाल आम्हाला म्हणजे शहरांना पुरवा. यात जे शिल्लक राहील ती तुमची दलाली, तुम्ही पण मरू नका व मजुरांना पण मरू देवू नका! या सर्व पार्श्वभुमीवर मनात विचार पक्का झाला की, या व्यवस्थेची दलाली आपल्याला करायची नाही. ही व्यवस्था शेतकरी तसेच शेतमजुरांवर गरीबी लादत आहे. या व्यवस्थेलाच प्रश्न विचारला पाहिजे म्हणून मी तेव्हापासून पुढाऱ्यांना प्रश्न विचारायाला प्रारंभ केला..Agriculture Labour Crisis: मजूर समस्या : शेतीत वानवा, शहरात शोषण.पुढाऱ्यांना प्रश्ननागपूरला मी राजकीय नेत्यांच्या सभेत जाऊन बसायचो व त्यांचे भाषण झाल्यावर त्यांना प्रश्न विचारायचो, एक रुपया किलो ज्वारी विकून ज्चारीच्या शेतात काम करणाऱ्यांची मजुरी किती व त्यात गरीबी कशी दूर होणार? याच सुमारास कापूस उत्पादक संघांच्या बैठकी होत होत्या. कापूस एकाधिकार खरेदी योजना महाराष्ट्रात सुरू झाली होती. व्यापारी खरेदी बंंद झाली होती. कापूस एकाधिकार सरकारी खरेदी फक्त महाराष्ट्रात होती. मी कापूस उत्पादक संघांच्या बैठकीत जाऊन प्रश्न विचारायचो ‘एकाधिकार खरेदी फक्त महाराष्ट्रात आहे..देशात तर व्यापारी खरेदी झाहे. गुजरात-पंजाब-हरियाणा-राजस्थान- आंध्र प्रदेश या राज्यातून कापसाच्या (रूई) गाठी मुंबईला येतील त्या स्वस्त असल्या तर राज्यातील कापूस एकाधिकारातील रुई च्या गाठींना भाव कसा मिळणार? कापूस उत्पादकांना भाव कसा मिळणार? विदर्भातील सहकारी क्षेत्रातील नेत्यांना याचा राग यायचा, पण डॉ. बोकरे आणि डॉ. चोखारे हे नागपुरला नेहमी मला समजवायचे. त्यांचे हे म्हणणे होते की, महाराष्ट्रात एकाधिकार कापूस खरेदीमुळे सरकारच एकमेव खरेदीदार व तेच भाव देणार नाही तर त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांना संघटित करणे सोपे होईल. याच तर्काचा पुढे शेतकरी संघटनेच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी फायदा झाला..यातून एक स्पष्ट झाले की, कापसाच्या भावाचा, शेतीमालाच्या भावाचा प्रश्न एका राज्याचा किंवा एका पिकाचा नाही तर हा देशाच्या राजकारण व अर्थकारणाचा प्रश्न आहे. या चर्चेतूनच मला ‘मोनोपोली’ काय? भांडवलच संचय काय? या गोष्टी समजू लागल्यात. आज जशी इराण-अमेरिका युद्धामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत. त्यामुळे कापसाचे भाव वाढले, अशी परिस्थिती १९७३ मध्ये निर्माण झाली होती. जगातील तो पहिला उर्जा संकटाचा अनुभव..त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिर गांधी यांनी एकदम १०० टक्क्यांनी युरीया-रासायनिक खतांचे भाव वाढविले. ५० रुपये प्रति ६० किलोचे भाव एकदम १०० रुपये झाले. १६ रुपये प्रतिलिटर कीडनाशके ८० रुपये प्रतिलिटर झाले. त्यावर्षी कापसाचे भाव २५० रुपये प्रतिक्विंटलवरून ५५० ते ६०० रुपये झाले होते. संकरीत कापसाची शेती आकर्षक वाटू लागली होती पण दुसऱ्याच वर्षी १९७४-७५ ला कापसाच्या भावात मंदी आली व भाव ३०० ते ३५० रुपये प्रतिक्विंटलवर आले. खर्च वाढला पण भाव पडले. राजकीय वातावरण तापत होते. विद्यार्थी आंदोलन सुरु झाले. स्व. जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला.- ९४२१७२७९९८(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.