इंद्रजित भालेरावColonial to Independence Literature Writer: मराठीतील सुप्रसिद्ध लेखक भास्कर चंदनशिव हे नुकतेच आपणाला सोडून गेले. गेल्या अनेक दिवसांपासून ते सार्वजनिक जीवनात नसल्यासारखेच होते. प्रकृतीच्या कारणास्तव कुठल्याही कार्यक्रमाला जात नव्हते. मी अधून मधून सतत त्यांना भेटत होतो आणि त्यांच्या वर्तमानाच्या नोंदी समाजमाध्यमांवर लिहीत होतो. भास्कर चंदनशिव हे पारतंत्र्य- स्वातंत्र्याच्या सीमेवर जन्माला आलेले लेखक होते. .पुढचं त्यांचं बालपण मोगलाईतल्या जुन्या आठवणी ऐकत ऐकत स्वातंत्र्यात गेलं. नंतर मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला. मराठवाड्यातल्या सामाजिक जीवनामध्ये नवीन चैतन्य भरल्या गेलं, त्यानंतर ७२ चा दुष्काळ पडला, आणीबाणी आली, वर्षानुवर्षाची काँग्रेसची सत्ता गेली या सगळ्या गोष्टी भास्कर चंदनशिव यांनी पाहिलेल्या होत्या. हे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय बदल मनावर नोंदवून घेतलेले होते. ज्याचे प्रतिबिंब पुढच्या त्यांच्या लेखनात पडणार होते..अंबाजोगाईसारख्या सांस्कृतिक आणि चळवळीचं केंद्र असलेल्या गावातल्या महाविद्यालयात ते शिकले. गोपीनाथ मुंडे तसे त्यांचे महाविद्यालयीन सहकारी. भास्कर चंदनशिव हे सांस्कृतिक अंगानं घडत होते त्याच काळात मुंडे हे राजकीय अंगानं घडत होते. अंबाजोगाई येथे झालेल्या महाविद्यालयीन शिक्षणानंतर चंदनशिव औरंगाबादला (आताचे छत्रपती संभाजीनगर) विद्यापीठात शिकायला गेले. १९७२ च्या दुष्काळाचा काळ होता तो. अवतीभोवती सतत सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळी सुरू होत्या. भास्कर चंदनशिव यांचं वाचनावर जेवढं लक्ष होतं तेवढंच चळवळीवरही लक्ष होतं. त्यामुळे दलित साहित्याच्या अस्मितादर्श चळवळीमधून त्यांनी लिहायला सुरुवात केली. प्रखरपणे समाज वास्तव मांडायला सुरुवात केली..Writer Success Story : एका शेतकऱ्यामधला लेखक कसा घडतो? .दलित की ग्रामीण साहित्यिक!चंदनशिव यांनी लिहायला सुरुवात केली तेव्हा दलित साहित्य उदयाला येऊन प्रसिद्धीच्या शिखरावर होतं. ग्रामीण साहित्यही प्रस्थापित झालेलं होतं. दलित साहित्यात बाबूराव बागुल आणि ग्रामीण साहित्यात यादव, बोराडे यशोशिखरावर होते. चंदनशिव यांनी त्यांच्याही पुढं पाऊल टाकलं आणि मराठी कथेला या पिढीच्या पुढची कथा दिली. दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य यांच्या सीमारेषा पुसणारी कथा चंदनशिव यांनी लिहिली. बाबूराव बागुलांच्या कथेतील सखोल जीवनदर्शन आणि स्फोटक विद्रोह त्यांनी अवगत केला. आनंद यादव आणि रा. रं. बोराडे यांच्या कथेतला शेतकरी पकडून तो वर्तमान चळवळीच्या अंगानं आणखी पुढे नेला. आपल्या साहित्यात मांडला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात भास्कर चंदनशिव दलित की ग्रामीण साहित्यिक हेच लोकांना कळत नव्हतं. मला वाटतं हेच त्यांच्या कथेचं मोठेपण होतं..एखादं वर्ष आष्टीच्या महाविद्यालयात प्राध्यापकी करून भास्कर चंदनशिव मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूरच्या विनायकराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले, ते प्रथितयश लेखक रा. रं. बोराडे यांच्या हाताखाली. बोराडे सर तेव्हा महाविद्यालयात प्राचार्य होते आणि मराठी विभाग प्रमुखही होते. लातूर आणि उस्मानाबाद (आताचे धाराशीव या एकमेकांच्या शेजारच्या जिल्ह्यात जन्माला आलेले मराठवाड्यातले हे दोन थोर लेखक एकत्र आले. त्यांच्या वयात फारसं अंतर नव्हतं..तरीही बोराडे आधीच्या पिढीचे समजले जात आणि चंदनशिव पुढच्या पिढीतले समजले जात. आनंद यादवांच्या भाषेत सांगायचं झालं तर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील ही स्वातंत्र्योत्तर ग्रामीण साहित्यातली पहिली पिढी, यादव बोराडे ही दुसरी पिढी आणि भास्कर चंदनशिव ही तिसरी पिढी. पुढं आमची चौथी पिढी घडावी म्हणून या दोघा थोर लेखकांनी वैजापूरच्या महाविद्यालयात अनेक शिबिरं घेतली आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले ग्रामीण भागातून लिहिणारे लेखक घडवले..Maruti Chitampalli: वनविद्येचे तत्त्वज्ञ, ललित गद्यकार .१९८० च्या दरम्यान भास्कर चंदनशिव यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. तो लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केला होता. साहित्य संस्कृती मंडळाने त्याला नवलेखक अनुदान योजनेतले अनुदान दिलेले होते. त्याआधीच्या दशकभरात भास्कर चंदनशिव यांनी या कथा लिहिलेल्या होत्या. या कथासंग्रहाचं नाव ‘’जांभळढव्ह’’ असं होतं. हा कथासंग्रह खूप गाजला, मान्यता पावला. भास्कर चंदनशिव हे नाव जाणकारांच्या मनावर कोरले गेले. पुढं त्यांचे मरणकळा, बीरडं, अंगारमाती असे एकापेक्षा एक सकस कथासंग्रह प्रकाशित होत गेले. भास्कर चंदनशिव हे नाव देखील हळूहळू मराठी वाङ्मयात प्रस्थापित झाले..लाल चिखलदलित चळवळीपासून सुरुवात झालेली चंदनशिव यांची कथा शेतकरी चळवळीपर्यंत येऊन थांबली. अंगारमातीमध्ये शेतकरी चळवळीने ठळक केलेले प्रश्न जीवन जाणिवांच्या कलात्मक अंगाने त्यांनी आपल्या कथेत मांडले. त्यांची अत्यंत गाजलेली आणि अभ्यासक्रमात दहावीच्या पुस्तकात असलेली ‘’लाल चिखल’’ ही कथा याच संग्रहातली आहे. रा. रं. बोराडे आणि भास्कर चंदनशिव यांच्या लेखनात फरक होता. बोराडे यांनी नंतरच्या काळात विनोदी लेखन केले असले तरी सुरुवातीच्या काळातले त्यांचे काही कथासंग्रह आणि पाचोळासारखी कादंबरी, हे बोराडे यांचं थोरपण सिद्ध करणारं लेखन आहे..बोराडे यांच्या कथेत ग्रामीण माणसाच्या मनाची आंदोलने येत होती. भास्कर चंदनशिव यांनी मनाच्या आंदोलनासोबतच सामाजिक आंदोलनेही आपल्या कथेत आणली. भास्कर चंदनशिव यांनी बोराडे यांच्या पुढचा काळ आणि त्यापुढची कलात्मक कथा मराठीला दिली. बोराडेंच्या काळात ग्रामीण लेखक हा फक्त शेतकरी जीवनाचाच भाष्यकार समजला जायचा. त्यामुळे ते शेतकरी जीवनावरच लेखन करत होते. पण भास्कर चंदनशिव यांनी ग्रामीण आणि दलित असा भेद न ठेवता समग्र ग्रामीण जीवन कवेत घेण्याचा प्रयत्न केला. इयत्ता दहावीच्या पुस्तकात असलेल्या लाल चिखल या कथेम.भास्कर चंदनशिव यांनी फार लेखन केलं नाही. मोजक्याच कथा लिहिल्या. त्यांच्या एकूण पाच कथासंग्रहामध्ये मिळून पन्नासेक कथा असतील. पण एवढ्याच कथांवर हा लेखक मराठीतला अजरामर कथाकार झालेला आहे. त्यांच्या कथा मराठी वाङ्मयाच्या इतिहासात कायमचं स्थान मिळवणाऱ्या आहेत. मराठी कथा लेखकांच्या पुढच्या अनेक पिढ्या त्यांच्या कथा वाचून स्वतःवर संस्कार करून घेतील. आज भास्कर चंदनशिव नसले तरी त्यांची सकस कथा कायमच आपल्यासोबत असणार आहे. माणसाला काळाची मर्यादा असते. पण अक्षरांना काळाची मर्यादा नसते. माणूस क्षर होतो म्हणजे संपतो. पण जे संपत नाही ते अक्षर. अशी अक्षरे भास्कर चंदनशिव यांनी मराठीत लिहून ठेवलेली आहेत. त्यामुळे भास्कर चंदनशिव हे अजरामरच आहेत.(लेखक कवी, साहित्यिक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.