समीर गायकवाडSimple Life Inspiration: आता नुकताच दिवस मावळला आहे. सगळीकडे दिवेलागण झालीय, बाहेर रस्त्यावर बऱ्यापैकी अंधार आहे, घरोघरी लाइट्स लागले आहेत. शकुंतलाबाईंच्या घराच्या उंबरठ्यावर आजही दिवा नक्की तेवत असेल आणि घरात त्या तेवत असतील शांतपणे फुलवातीसारख्या!.ओळखीच्या कुटुंबातील प्रौढ मतिमंद मुलाचे नुकतेच निधन झाले, किस्ना त्याचं नाव. तो गेला तेव्हा त्याचे वय चाळिशीच्या पार गेलेले होते. त्याला दोन भावंडे होती जी जगाच्या भाषेत नॉर्मल होती, खरे तर जी मुले गतिमंद असतात त्यांच्या मनात षड्रिपू असत नाहीत, त्यांच्या मनात विकारांना स्थान नसते, लहान मुलांच्या मनात ज्या भावना असतात त्याच भावना त्यांच्या ठायी असतात. परिणामी, त्यांना देवाघरची फुले अशी सार्थ उपमा दिली जाते, स्पेशल चाइल्ड असं शहरी इंग्रजाळलेल्या भाषेत म्हणता येईल. असो..ज्याचे निधन झाले तो किस्ना हा तिघा भावंडांपैकी धाकटा होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. हा गतिमंद मुलगा आपल्या थकल्या भागल्या पत्नीच्या हवाली करून ते देवाघरी निघून गेले. आयुष्यभर त्यांनी या मुलासाठी खस्ता खाल्ल्या, त्याच्यासाठी जिवाचे रान केले, सारी स्वप्ने चुरगळून सर्व आशा-आकांक्षा बासनात गुंडाळून ते अविरत त्याच्यासाठी झिजत राहिले, असे असले तरी या गोष्टीचे त्यांना शल्य नव्हते की दुःख नव्हते. .समोर आलेल्या संकटाला तोंड दिले पाहिजे हा एकच नियम त्यांना ठाऊक होता, सबब किस्नाच्या जन्मानंतर त्यांचे वैयक्तिक आयुष्य उरले नव्हते आणि त्यांच्या पत्नीची, शकुंतलाचीही तशीच गत होती. उलट तिची अवस्था अधिक बिकट होती. पुरुष कामानिमित्त दिवसभर बाहेर तरी जाऊ शकतात मात्र स्त्रियांना वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस घरीच थांबावे लागते. शकुंतलेचे भावविश्व तिच्या गतिमंद मुलापुरते सीमित झाले होते. ती सतत त्याच्या भवितव्याचा विचार करत असे. आपल्या पाठीमागे या मुलाचे कोण करणार, याची अवस्था कशी असेल हा प्रश्न खोडकिड्याने डोके पोखरावे तसे तिचे काळीज पोखरत होता. आपले दुःख लपवत ती माउली हसतमुखाने जगासमोर वावरायची आणि एकांतात असताना परमेश्वराला धारेवर धरताना मनोमन अश्रू ढाळायची! आताशा हेच तिचे आयुष्य झाले होते..Village Story: लिंगाण्याच्या कुशीतील दगडू आणि अनिता.किस्नाची अन्य दोन्ही भावंडे मोठी झाल्यावर जगरीतीनुसार लग्न होऊन संसाराला लागली होती. त्यांच्या बायकांना दाढीमिशा आलेला, कथित बेढब दिसणारा वयस्कर प्रौढ दीर सांभाळणे जिकिरीचे आणि काही प्रमाणात अवघडणारे, लाजेचे वाटत असावे. अथवा आणखीही काही पारिवारिक वा व्यावहारिक कारण असावे. त्या दोघींनी त्याला कधी जीव लावलाच नाही, सासरे जिवंत असताना त्या कधी उघडपणे हिडीस फिडिस करू शकत नव्हत्या, मात्र तरीही आपल्या परीने त्या दोघी आपल्या सासूबाईंना शकुंतलाबाईंना ठिसफिस करायच्या..ती माउली काय ते समजून जायची. नवरा गेला आणि शकुंतलाबाईंचे संकट अधिक गडद झाले. त्यांची दोन्ही मुले नोकरीच्या निमित्ताने गाव सोडून मोठ्या शहराच्या गावी गेली. शकुंतलाबाई दिवस रात्र किस्नाच्या चिंतेत आयुष्य कंठत होत्या, आपल्या पाठीमागे किस्नाचे हाल होऊ नयेत या एकाच विचाराने त्यांना ग्रासले होते. रात्रंदिवस किस्नाच्या सेवेत त्यांनी स्वतःला समर्पित केले होते..दोन्ही मुले आणि सुना कामानिमित्त दूरगावी गेल्यानंतर पंचाहत्तरी गाठलेली आई आणि चाळिशीतला तिचा तो निरागस मुलगा दोघेच इकडे राहत. त्याचा दवाखाना वा आजारपण उद्भवले की एखादा भाऊ येऊन दोनेक दिवसांची चक्कर टाकून मदत करून जाई. गेल्या काही दशकात त्यांच्या कुटुंबात अनेक कार्यक्रम झाले. मात्र ती आई आणि तो मुलगा क्वचित कुठे दिसले. किस्ना हेच तिचे विश्व होतं! त्याच्यासाठी केअरटेकर ठेवणे शकुंतलाबाईंना परवडणारे नव्हते. .तुटपुंज्या उत्पन्नात कसेबसे त्या मायलेकाचे कसे तरी भागत होते. त्याची दाढी करणे, केस कापणे, लघवी-संडास काढणे ही सारे कामे ती मउली कसलीही किळस, कंटाळा न करता करे. काही दिवसांपूर्वी त्याला फुफ्फुसाचा संसर्ग झाला. आठवडाभराचे हॉस्पिटलायझेशन झाले. त्याच्या आजाराचे नेमके निदान होऊ शकले नाही. आजार बळावत गेला, एका संध्याकाळी त्याचे प्राणपाखरू उडून गेले. शकुंतला बाईंना एकाकी सोडून तो अनंताच्या प्रवासाला निघून गेला. तो असा एकाएकी जाईल असे कुणालाही वाटले नव्हते..Inspiring Story: डॉक्टरकीचं स्वप्नं रंगवत जंगलात चिमुरडी विकतेय सरबत.डोक्याचा भलामोठा भेंडा सांभाळत आपले मोठाले डोळे मिचकावत निरागस हसणाऱ्या किस्नाचा जीव आयसीयूमध्येच गेला. त्या दिवशीची संध्याकाळ शकुंतलाबाईंना खूप जड गेली. मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत रात्री उशिरा त्याचे अंतिम संस्कार करण्यात आले. त्या रात्री त्याच्या आठवणींनी शकुंतलाबाईंच्या अंगणातले आभाळ भरून आले. तो बहुतांश करून घरी असायचा आणि घरी असताना तो हाफचड्डी नि बंडीमध्ये असायचा. तळहातांच्या जोरावर घसरत घसरत पुढे सरकायचा. आईच त्याला घास भरवायची. त्याला थापटत झोपी लावायची. त्याला इच्छा झाली तर टीव्हीवर जुनी गाणी सिनेमे लावून द्यायची. .तिचा सारा दिवस त्याच्या देखभालीत जायचा. तो जन्मल्यापासून तिला वैयक्तिक आवडीनिवडी, इच्छा आकांक्षा, छंद यांचा विसर पडला होता. तिचे सुख त्याच्या मायेत समर्पित झाले होते. त्याचे वडील हयात होते तोवर त्यांची खूप मदत व्हायची. नंतर मात्र तिने एकटीने किल्ला लढवला होता. तो असा तडकाफडकी गेला तेव्हा अनेकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या, की बरे झाले आता मथुराबाईंची सुटका झाली. फार निःस्वार्थ आणि समर्पित प्रेम केलं तिने! त्याचं पुण्य तिच्या पदराला येईल! तो गेला त्या दिवशी त्या माउलीचे अश्रू सरत नव्हते! अख्ख्या गल्लीतल्या बायका तिच्या घरी येऊन हमसून हमसून रडल्या. त्याचे क्रियाकर्म मोठ्या भावाने केले. अन्य सारे विधी झाले..तिच्या दोन्ही मुलांनी आईला आपल्यासोबत येण्याचा खूप आग्रह केला, मात्र ती माउली काही त्यांच्यासोबत गेली नाही. शकुंतलाबाईंचे घर आमच्या गल्लीनजीक आहे, त्यांची जुनी ओळख आहे, शिवाय त्यांच्यासोबतचे नाते दूरचे असले तरी त्यात ओलावा आहे. त्यामुळे किस्नाच्या निधनाची बातमी समजताच, माझ्या पत्नीसोबत त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा त्या ओक्साबोक्शी रडल्या. ‘‘किस्ना असताना त्यांनी मला राहायला बोलवलं असतं तर नक्की गेले असते, आता जाऊन काय करू? तिथे गेल्यावर त्याच्या आठवणींनी उरात काहूर माजेल! जीव लागणार नाही. तिथेही नातवंडे आहेत त्यांच्यात मला किस्ना दिसेल! माझा किस्ना एकटाच मला टाकून गेला, त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही,’’ त्यांचा बांध फुटला होता. काही केल्या त्यांचा शोक ओसरत नव्हता. त्यांच्या बहिणीची विधवा मुलगी आता सोबतीस असते..गल्लीच्या कोपऱ्यालाच त्यांचे जुन्या पद्धतीचे दोन खोल्यांचे घर आहे. अंगणात तुळस आहे. बाहेर पांढऱ्या नि गुलाबी सदाफुलीची पुरुषभर उंचीची झाडे आहेत, दोन तीन नारळांची झाडे आहेत. देखणा सोनचाफाही आहे. दिवस मावळताना रोज सांजेला त्या तुळशी वृंदावनात दिवा लावायच्या, अगदी न चुकता. आताशा एक दिवा उंबरठ्यावरही दिसतो. त्या दिव्याच्या ज्योतीत त्यांना किस्ना दिसतो. न संपणारी प्रतीक्षा जिवघेणी असते, काळजाच्या न सुकणाऱ्या जखमा दाखवता येत नसतात. .सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात, सारीच दुःखे सांगता येत नसतात, सर्वांना सर्व काही सांगता येत नसते. काही माणसे हयातभर जळत असतात, झिजत असतात, झटत असतात! लोक त्याला त्याग- समर्पणाचे नाव बहाल करतात, मात्र ज्या जिवाने हे भोगलेले असते त्याच्या वेदना जगातला कुठलाही जीव समजून घेऊ शकत नाही, हेच खरे सत्य असते. त्या दिवशी त्यांच्या घरी गेल्यावर शकुंतलाबाई रडता रडता म्हणाल्या होत्या, की पुनर्जन्म असतो की नाही, मला ठाऊक नाही मात्र जर असलाच तर किस्नाच्या पोटी मला जन्माला यायचेय, त्याच्या कुशीत मला शांत झोपी जायचेय!.आता नुकताच दिवस मावळला आहे. सगळीकडे दिवेलागण झालीय, बाहेर रस्त्यावर बऱ्यापैकी अंधार आहे, घरोघरी लाईट्स लागल्या आहेत. शकुंतलाबाईंच्या घराच्या उंबरठ्यावर आजही दिवा नक्की तेवत असेल आणि घरात त्या तेवत असतील शांतपणे फुलवातीसारखं!८३८०९७३९७७(लेखक समाजस्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे साहित्यिक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.