Food Security: शेतीमाल बाजाराला ‘एल निनो’ आणि युद्धांचा दुहेरी ‘शाॅक’ बसत आहे. त्यामुळे जागतिक अन्नधान्याच्या किमती तीन वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या आहेत. एल निनोमुळे अन्नधान्य उत्पादनाविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे, तर लाल समुद्रामार्गे वाहतूक विस्कळीत होत असून इराण-अमेरिका युद्धामुळे महागाईत तेल ओतले जात आहे. या संकटाचे व्रण जागतिक शेतीमाल बाजारपेठेवर २०२८ पर्यंत दिसू शकतात, अशी भीती अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. .फेब्रुवारी २०२६ पासून इराण-अमेरिका, इस्राईल युद्धामुळे जगाला महागाईचे चटके बसत आहेत. त्यानंतर ‘एल निनो’चा संकटरुपी हत्ती केवळ दारातच नाही तर आता घरात आला आहे. जागतिक हवामान संस्थेने ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात एल निनोची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज नुकताच दिला आहे. एल निनो मार्च २०२७ पर्यंत राहू शकतो; प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमानात सरासरीपेक्षा २.९ अंशांनी वाढ होईल, अशी शक्यता जागतिक हवामान संस्थेने व्यक्त केली आहे. तसेच या भागातील तापमान यंदाच्या एल निनो वर्षात ३.६ अंशांपर्यंत वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास २०१५-१६ च्या एल निनो वर्षात तापमानात झालेल्या वाढीपेक्षा दुप्पट वाढ यंदा होईल. ही वाढ विक्रमी असेल. त्यामुळे जागतिक पाऊस आणि तापमानाच्या घटनांची तीव्रताही त्याप्रमाणात वाढणार आहे..El Nino Challenges: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतीसमोरील आव्हाने.एल निनोचा परिणाम जागतिक पातळीवर एकाच प्रकारचा नसतो. जगाच्या काही भागात दुष्काळ, कमी पाऊस, जास्त तापमान, उष्णतेच्या लाटा, वणवे तर काही भागात जास्त पाऊस, पूर असा परिणाम होतो. ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात जागतिक तापमान जास्त राहण्याचा अंदाज आहे. भारतीय उपखंडासह आफ्रिका, दक्षिण युरोप, अरबी द्वीपकल्प, पूर्व आशिया, मध्य अमेरिका, कॅरिबियन प्रदेश, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिकेचा बहुतांश भाग आणि न्यूझीलंडमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची चिन्हे आहेत. .तर या तीन महिन्यांमध्ये भारतीय उपखंड, दक्षिण आणि पूर्व ऑस्ट्रेलिया, दक्षिण मध्य अमेरिका, कॅरिबियन प्रदेशातील काही भाग, वायव्य दक्षिण अमेरिका, उत्तर युरोप या भागात कमी पावसाची शक्यता आहे. म्हणजेच तब्बल ७४ देशांमध्ये कमी पाऊस आणि जास्त तापमान राहण्याचा अंदाज आहे. यापैकी ३३ देशांची शेती माॅन्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यातही भारतीय उपखंडातील भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका हे देश अन्नधान्य उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत. इतरही देशांमध्ये या काळात मका, तांदूळ, फळे, तेलबिया पिकांचे उत्पादन घेतले जाते. या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे..आफ्रिकेच्या हॉर्न प्रदेशाचा मोठा भाग, मध्य आशियातील काही भाग, दक्षिण युरोप, पश्चिम उत्तर अमेरिका, आग्नेय दक्षिण अमेरिका या भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. या भागात पूरस्थितीचा अनुभव मागील एल निनो वर्षात आला आहे. यंदा एल निनोची तीव्रता वाढल्यानंतर अतिपाऊस आणि पुराचे संकटही वाढण्याची भीती आहे. असे झाल्यास या प्रदेशातील पिकांचेही उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे..खतटंचाईची भरएल निनोचा जागतिक उत्पादनावर परिणाम होत असतोच. पण यात यंदा जागतिक खतटंचाई आणि वाढलेल्या किमतीची भर पडण्याची शक्यता आहे. यूएन, एफएओ, जागतिक बॅंक अशा जागतिक स्तरावरील संस्थांनी याविषयी चिंता व्यक्त केलेली आहे. इराण आणि अमेरिकेतील युद्धबंदी अपयशी झाल्यानंतर जागतिक खत आणि इंधनाचे संकट पुन्हा डोके वर काढत आहे. तर दुसरीकडे लाल समुद्रमार्गे होणाऱ्या वाहतुकीवर हल्ले होत आहेत. यामुळे मधल्या काळात कमी झालेल्या खतांच्या किमती पुन्हा वाढू शकतात. खतटंचाई आणि वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी कमी खते लागणाऱ्या पिकांकडे वळत आहेत. तसेच खतांचा वापरही कमी करत आहे. जाणकारांनी काही महिन्यांपूर्वी वर्तविलेल्या अंदाजानुसार या खत संकटामुळे जगातील लाखो लोकांची अन्नसुरक्षा धोक्यात येऊ शकते..धान्यसाठा मुबलक पण...मागील वर्षी जगभरात ला निनामुळे पाऊस चांगला पडला होता. खते आणि इंधन मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. किमतीही कमी होत्या. परिणामी, जागतिक पातळीवर २०२५-२६ मध्ये अन्नधान्य उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचले होते. भारतासह अनेक देशांमध्ये धान्याचे साठे उपलब्ध आहेत. असे असले तरी एल निनोचा नेमका परिणाम, खते व इंधनाची उपलब्धता तसेच किमती आणि लाल समुद्रामार्गे वाहतुकीचे भवितव्य यावर भविष्यातील उपलब्धता अवलंबून राहील..Global War Impact: युद्धामुळे भारतातील शेती क्षेत्राची कोंडी.यूएसडीए आणि आयएनजी रिसर्चच्या अहवालानुसार, १९९७-९८, २००२-०३, २००९-१०, २०१५-१६ आणि २०२३-२४ मध्ये एल निनो होता. पण २०१५-१६ मधील एल निनो सर्वांत तीव्र होता. इतर एल निनो वर्षात जागतिक पातळीवर काही शेतीमालाच्या उत्पादनात घट झाली, तर काही शेतीमालाच्या उत्पादनात वाढ झाली होती. पण २०१५-१६ मध्ये मका, सोयाबीन, गहू, तांदूळ, खाद्यतेल, साखर, कडधान्य या सर्व पिकांच्या जागतिक उत्पादन घट झाली होती. यंदा तर २०१५-१६ च्या तुलनेत एल निनो तीव्र असणार आहे, म्हणजेच याचा उत्पादनावरील परिणामही जास्त राहणार आहे..जागतिक बॅंकेच्या इशाऱ्यानुसार एल निनोचा परिणाम जाणवणाऱ्या देशांमध्ये तांदूळ उत्पादन २० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. उत्पादनात जास्त घट झाल्यास सध्याचा उपलब्ध साठाही कमी पडण्याची भीती आहे. गोल्डमॅन सॅचच्या अहवालानुसार एल निनोमुळे जागतिक अन्नधान्याच्या किमती १५.८ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात..रशिया आणि युक्रेन या देशांतून जगाला ३० टक्के गव्हाचा पुरवठा होतो. पण आता मालवाहतूक करणाऱ्या जहाजांवर हल्ले होत असल्याने निर्यात संकटात सापडली आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास या भागातून गहू तसेच इतर धान्य जागतिक बाजारपेठेत पोहोचवणे अवघड होईल आणि अनेक देशांमध्ये अन्नधान्य टंचाई वाढेल, असे काही संशोधन संस्थांनी म्हटले आहे. यूएनच्या एका अहवालानुसार जगात सध्या २७ कोटी लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. यापैकी निम्म्या लोकांच्या अन्नसुरक्षेवर युद्धाचा परिणाम झालेला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये वाढलेल्या तणावामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. यातील बहुतांशी लोक आफ्रिकेतील देशांमधील आहेत..भारतालाही फटकाभारत अन्नधान्य उत्पादनात महत्त्वाचे स्थान राखून आहे. जगातील एक तृतीयांश तांदूळ भारतात पिकतो. भारत कडधान्य उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर तर गहू तसेच फळे आणि भाजीपाला उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोठ्या लोकसंख्येमुळे निर्यात कमी असली तरी अन्नधान्यातील स्वयंपूर्णतेमुळे भारताचे वेगळे स्थान आहे. पण यंदा एल निनोमुळे चिंता वाढली आहे. खरिपाच्या पेरण्यांचा कालावधी संपला आहे. देशात २४ जुलैपर्यंत ७८७ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला. सरासरीपेक्षा पेरा २८ टक्क्यांनी पिछाडीवर होता. गेल्या वर्षीपेक्षा सध्याची पेरणी साडेपाच टक्क्यांनी कमी दिसत आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पेरणीची आकडेवारी आज किंवा उद्या जाहीर होईल. त्यात क्षेत्र वाढलेले दिसू शकते. पण यंदा सरासरी इतका पेरा होण्याची शक्यता धूसरच आहे. पेरणी क्षेत्र गेल्या वर्षीएवढे झाले तरी उत्पादनाविषयी चिंता आहे..माॅन्सूनचा पाऊस देशात पहिल्या दोन महिन्यांमध्ये ८७ टक्के झाला. म्हणजेच सरासरीपेक्षा १३ टक्के कमी पाऊस झाला. जूनमध्ये ४० टक्के कमी पाऊस होता. जुलैमधील पावसामुळे तूट कमी झाली, तरी पावसाचे वितरण असमान आहे. मध्य भारताच्या तुलनेत इतर भागात पाऊस कमी झाला आहे. मध्य भारतातील राज्यांमध्येही पावसाचे वितरण असमान आहे. उदा. महाराष्ट्रात जुलैपर्यंत सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला. पण जिल्हानिहाय विचार केला तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये पाऊस जास्त आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे. नंदूरबार जिल्ह्यात तब्बल ६० टक्के कमी पाऊस होता. मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये ३० ते ५० टक्के तूट आहे. विदर्भातही ३० ते ४० टक्के तूट दिसते..पावसाचे असमान वितरण आणि कमी कालावधीत झालेला जास्त पाऊस याचा पिकावर परिणाम दिसत आहे. तसेच पेरण्या उशिरा झाल्या. भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस कमीच राहण्याची आणि तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचा उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमी अधिक उत्पादनासह खरीप निघून जाईल. पण खरे संकट रब्बी हंगाम, बारमाही पिके आणि फळपिकांवर असेल. कारण देशातील धरणांमधील साठा गेल्या वर्षीपेक्षा ३६ टक्क्यांनी कमी आहे. त्यातही भागनिहाय धरणासाठी कमी-जास्त आहे. आपल्या राज्याचा विचार केला तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी धरणांमध्ये पाणीसाठा वाढलेला आहे पण मराठवाडा आणि विदर्भात पाणीसाठा खूपच कमी आहे. पुढील काळात कमी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पिकांसाठी पाण्याची टंचाई भासण्याचे संकेत आहेत. उन्हाळा अधिक तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत. या परिस्थितीचा परिणाम पीक उत्पादन आणि मानवी जीवनावर होणार आहे..देशात अन्नधान्याचा साठा मुबलक असल्याचा दावा सरकार करत आहे. पण रब्बीतील हरभरा, गहू आणि तांदूळ ही पिके देशाची अन्नसुरक्षा अभेद्य ठेवण्यासाठी महत्त्वाची आहेत. या पिकांचे भवितव्य पुढील दोन महिन्यांतील होणाऱ्या पाणीसाठ्यावरून अवलंबून आहे. भारताच्या शेतीमाल उत्पादनावर केवळ भारतच नाही शेजारच्या अनेक देशांचे कमी अधिक प्रमाणात अवलंबित्व आहे. कापूस, सोयापेंड, फळे, भाजीपाला, तांदूळ, मसाले, कडधान्य, साखर या शेतीमालाची निर्यात होते. ही निर्यात कमी झाली किंवा भारतच आयात करत असेल तर जागतिक बाजारात दरवाढीला आमंत्रण मिळेल. त्यामुळे हा केवळ भारतापुरता प्रश्न नाही, तर त्याचे चटके जागतिक पातळीवर जाणवणार आहेत.(लेखक ॲग्रोवन डिजिटलचे कंटेन्ट लीड आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.