Akola News: भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) हमीभावाने कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू केली असली, तरी विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे खरेदीला अद्याप गती आलेली नाही. विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सुमारे सव्वातीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली आहे. मात्र यापैकी केवळ २१ हजार ३१४ शेतकऱ्यांची नावे पडताळणी करून मंजूर करण्यात आली आहेत. तर तब्बल दोन लाख ९० हजार शेतकरी पडताळणीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर १३ हजार ९२१ शेतकऱ्यांची माहिती तांत्रिक कारणांमुळे नाकारण्यात आली आहे..जिल्हानिहाय खरेदी केंद्रेअकोला ९, अमरावती १४, बुलडाणा ९, चंद्रपूर १०, गडचिरोली एक, नागपूर ११, वर्धा १३, वाशीम चार आणि यवतमाळ १८ अशी एकूण ८९ केंद्रे कापूस खरेदीसाठी देण्यात आलेली आहेत. या हंगामातील कापूस खरेदीसाठी ‘सीसीआय’ने शेतकऱ्यांना नोंदणीसाठी मोबाइल अॅप उपलब्ध करून दिले आहे. या अॅपद्वारे नावनोंदणी करताना शेतकऱ्यांना पीकपेरा, आधार कार्ड आणि फोटो जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. या माहितीची पडताळणी करण्याची जबाबदारी राज्य शासनाच्या यंत्रणांवर सोपविण्यात आली असून, बाजार समितीस्तरावर हे काम केले जात आहे. मात्र पडताळणीच्या प्रक्रियेत होत असलेल्या विलंबामुळे अनेक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर कापूस विक्री करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे..CCI Cotton Procurement : सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर कापूस ओलाव्याची मर्यादा २० टक्क्यांपर्यंत वाढवा; तेलंगणा सरकारचे केंद्र सरकारला पत्र.‘सीसीआय’ने या हंगामात विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये एकूण ८९ खरेदी केंद्रे मंजूर केली असून, त्यापैकी बहुतांश केंद्रे कार्यान्वित झाली आहेत किंवा सुरू होण्याच्या प्रक्रियेत आहेत. आतापर्यंत सुरू झालेल्या केंद्रांवर सुमारे साडेसोळा हजार क्विंटल कापूस खरेदी झाल्याची माहिती मिळाली आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे कापूस हंगाम थोडा लांबणीवर पडला होता. परंतु आता हळूहळू शेतकरी कापूस विक्रीसाठी केंद्रांवर येऊ लागले आहेत. येत्या काही दिवसांत पडताळणीचा वेग वाढेल व खरेदीला गती देण्यात येईल, अशी अपेक्षा सूत्राने व्यक्त केली..कापूस विक्रीसाठी नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी करण्याची जबाबदारी प्रामुख्याने बाजार समिती स्तरावर दिल्या गेलेली आहे. मात्र ही प्रक्रियाच संथ केल्या जात आहे. यंत्रणा अपुरी पडत असल्याने कापूस विक्रीस विलंब होऊ लागला आहे. काही ठिकाणी अॅपमध्ये माहिती सादर करताना शेतकरी स्तरावर चुका झाल्याने त्यांचे अर्जही मोठ्या संख्येने रिजेक्ट केल्या गेले आहेत..CCI Cotton Procurement : सीसीआयच्या कापूस खरेदी नोंदणीची मुदत वाढवा .बाजार फी रखडल्याने नाहरकत दिली नाहीअकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीमध्ये खरेदी सुरू झालेली नसल्याने गोंधळाची स्थिती तयार झाली आहे. अकोटमधील २२ जिनिंग धारकांकडे बाजार फी थकल्याने बाजार समिती प्रशासनाने त्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले नव्हते. परिणामी, कापूस खरेदी केंद्रे उघडू शकलेले नाहीत..हा मुद्दा ऐरणीवर आल्याने जिल्हा उपनिबंधक गितेशचंद्र साबळे यांनी तातडीने बुधवारी (ता. १२) ‘सीसीआय’, बाजार समितीला पत्र देत गुरुवारी (ता. १३) जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक ठेवल्याचे व सर्व माहितीसह उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. सोबतच या मुद्यावर जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे यांनीही पत्र देत तातडीने खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले होते. प्रशासनाने पळापळ करीत यावर तोडगा काढण्यासाठी हालचाली केल्या. तातडीने अकोटमध्ये १० खरेदीदारांना नाहरकत देण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.