Marathi Literature: त्या मरतुकड्या गाईने गेल्या कित्येक वर्षांत कसला म्हणून आवाज केला नव्हता, आज तिने थेट हंबरडा फोडला. त्या सर्व मुक्या जिवांचा सुहृद मैत्र बब्रुवाहन गेला. त्याच्या जाण्याच्या दुःखाने गावालगतच्या परिघातली सृष्टी उन्मळून पडली. गावाचं अस्सल गावपण अशा माणसांत साठून असतं, गावातला गावदेव म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसते हेच तर गावदेव असतात. गावाची सारी गुणलक्षणे शिगोशिग भरलेली ही माणसं हेच खरे निसर्गाशी एकरूप झालेले जीव होत..तसं तर बब्रुवाहनला मी बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. वटपौर्णिमेच्या दिवशी दुपारीच तो अनेक वडांच्या झाडांची पाहणी करून गेला असेल. अंधार थोडाबहुत गडद झाल्यावर त्या सर्व झाडांखाली ठेवलेले ब्लाउजपीस, पान खोबरे आणि नैवेद्य एका मोठ्या पाटीत किंवा गाठोड्यात घालून घेऊन गेला असेल. त्यातला एखाद दुसरा चोळीचा खण बायकोसाठी ठेवून बाकीचे सगळे ब्लाउजपीस तो बार्शीच्या बाजारपेठेत त्याच्या नेहमीच्या पंटरला विकेल..Human Emotions Story: संवेदनशीलतेचे पसायदान.गूळ, खोबरं वाण्याला देईन आणि नैवेद्य थोडे घरी ठेवून बाकीचे सगळे अन्नाचे घास भुकेल्या कुत्र्या, मांजरांना, गाईंना खाऊ घालेल. डझनावारी गोळा केलेले आंबे गोरगरिबांना वाटून टाकेल. बब्रुवाहनला बहुतेक सर्वच प्राणी वश आहेत, त्यातल्या त्यात गाईंचा त्याच्यावर खूप जीव आहे. त्याला झाडंदेखील वश आहेत. तो ज्या कोणत्याही झाडाखाली जाऊन बसतो, निजतो तिथे आसपास गुरं येऊन बसतात, कुत्री येतात. त्या जागेत एक वेगळाच गंध कित्येक तास दरवळत राहतो..वटसावित्रीच्या दिवशी गाव झोपी गेल्यावर, झाडाजवळचे गोळा केलेले ब्लाउज पीस विकून आलेल्या पैशातले निम्मे पैसे तो गरजू म्हाताऱ्या-कोताऱ्यांना देतो. त्यांना देखील ठाऊक नसते, की कसलाही कामधंदा न करणारा बब्रुवाहन आपल्याला पैसे कोठून आणि कसे आणून देतोय. आषाढात तर बब्रुवाहनची चांदीच असते. सारी पंचक्रोशी गावंदरीत पालथी पडलेली असते. म्हसोबा, मरीआईसाठी निवद ठेवले जातात..त्या दिवसांत बब्रुवाहन रोज पिशव्या भरभरून तिथला निवद आणतो आणि मोकाट गुरांना खाऊ घालतो. कुठं साती आसरा पूजायचे झाले की हा दत्त म्हणून हजर राहतोच! कुणाच्या घरी ‘कर’ असली, की तो तिथे सगळ्यात आधी न जाता सर्वांत शेवटी जातो, उरलेलं कालवण घेऊन गावकुसाबाहेरच्या जगात वाटतो. त्याचे बिरादरीवाले त्याला हसतात, मात्र त्याच्याकडून फुकटची डल्ली बोटी मात्र आवर्जून घेतात. बब्रुवाहन हा जणू अन्नपूर्णेचा पुत्र होता, जो तमाम जिवांसाठी मोकळ्या हाताने देत जायचा..असं असूनही बरेचसे लोक म्हणत, की तो कामचुकार आहे. त्याला कामधाम करावे वाटत नाही, नुसता भुजंग आहे! आयत्या पिठावर रेघा मारणारा आयजीच्या जिवावर बायजी उदार, नाईतर काय! अशी कुठं जिंदगानी असत्येय काय! गाव दहा तोंडाने त्याच्या विषयी वाईट साईट बोलायचं, पण तो त्या गोष्टी मनावर घेत नसे. गावात सणवार नसले की तो घरी नसायचा. जणू गायबच व्हायचा, त्याची बायको भामाबाई रोजाने कामावर जाई. बब्रुवाहनची पोरं गावात येत नव्हती, ती मोठ्या शहरात कामाला लागलीत, असं तो सांगायचा. रातांजनच्या माळाला लागून असलेल्या बरड नापीक शेतावरच्या वस्तीत त्याचं खोपट आहे, गावात मांगोड्याला लागून त्याचे घर आहे. निंबाळकरांचा जालिंदर आणि बब्रुवाहन खास दोस्त! जालिंदरला शेतीवाडी चिकार होती, तो दिवसभर पाखरं हाणत फिरायचा. बब्रुवाहन कुठं असंल, हे त्याच्या बायकोला एक वेळ ठाव नसायचं, पण जाल्याला अचूक माहिती असायची!.मागच्या खेपेला सूर्यग्रहणाच्या दोन दिवस आधीच बब्रुवाहन गावात परतला. ग्रहण संपल्यावर ‘दे दान सुटे गिराण’, म्हणत दारोदार फिरला! काहींनी त्याला पिटाळून लावलं, म्हणाले- “बब्ऱ्या हे सारं बंद झालंय रे आता. थोडी मेहनत कर आणि घर चालव. असं किती दिवस ग्रहणाची परडी घेऊन फिरणार हायीस…” त्यांचे टोकदार बाभुळकाटे त्याच्या मस्तकात घर करून राहिले. त्या वाक्बाणांनी त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. तो केवळ सुखाच्या गोष्टींमधला टाकाऊ जिन्नस उचलून घेत होता असंही काही नव्हतं! गावात मयत जरी झाली, तरी मयतीच्या चिजवस्तू दिकून तो घरी घेऊन जायचा. अशा वक्ताला भामा कळवळून जायची. लोक म्हणायचे, साल्याला लयी हाव बाबा. हे काही बरं नाही. तिला बिचारीला कधीकधी हे सारं नकोसं वाटे. पण ती माऊली मौन राही..Human Love Expression: जीवनतत्त्व : प्रेमाची अभिव्यक्ती... .काही वर्षांपूर्वी खूप खूप खोदून विचारल्यावर जाल्याने सांगितलं होतं, की बब्रुवाहनची पोरं कामाला वगैरे कुठंच नव्हती. ती त्याला कधीच सोडून गेली होती. त्याने ही गोष्ट गावापासून लपवली होती. गावात सणवार नसलं की तो सोलापूरला कामाला जातो. अनाथाश्रमात सेवा करतो. तिथल्या म्हाताऱ्या-कोताऱ्याना आधार देतो. त्यांच्यावर पैसे खर्च करतो. मला खूप नवल वाटले. त्याला विचारलं तर तो म्हणाला, की नुसतं मदत करत नाही तर त्यांना खोटं सांगतो. त्यांना आवडेल अशा गोष्टी वाढवून चढवून सांगतो. ही पिकली पानं सुखानं मरतात, त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडत आहेत हा विचार मनात घेऊन मोकळ्या मनाने मरणाला सामोरे जातात. या कामाचे तो पैसे घेत नाही. त्याचा पगार अशाच कामांवर उधळून टाकतो..यंदाच्या वर्षी वटपौर्णिमेनंतर तो बायकोला सोबत घेऊन गाव कायमचे सोडून जाणार आहे असं जालिंदरने आठवड्यापूर्वी सांगितलं, तेव्हा त्याच्या असंख्य आठवणींनी मनात फेर धरला. तो आता वयोमानाने थकला होता आणि त्याच आश्रमात भामाबाईला सोबत घेऊन राहणार होता. तेच त्याचे नवे घर झाले होते. तो गाव सोडून जाणार आहे हे एव्हाना गावाला देखील कळलं, पण फार कुणी कासावीस झाल्याचे माझ्या पाहण्यात आलं नाही. कुणी त्याच्यासाठी उसासे सोडत नव्हतं. नाही म्हणायला तो जिथे बसायचा, झोपायचा, त्या तमाम जागा मात्र उदास झाल्या. त्याच्या मागेपुढे असणारी कुत्री, मांजरं रडवेली वाटू लागली..त्याच्या येण्याजाण्याच्या वाटेवर असलेली तमाम झाडंझुडपं विमनस्क उदास वाटत होती, उखंड्यानजीकचे निर्जीव गावदेव शोकमग्न भासत होते. फार काय, वटसावित्रीच्या दिवशी दिमाखात सळसळणारा वटवृक्ष दिवसभर रुबाबातच होता, मात्र तोदेखील सांजेपासून थकल्या, हारल्यागत होता. त्याला प्रतीक्षा होती, बब्रुवाहनच्या अखेरच्या भेटीची. पौर्णिमेच्या दिवशी दिवस मावळताच तो वडापाशी गेला असेल. त्याच्या पुढंमागं भटकी गुरं असतील, कुत्री असतील. त्याने तिथल्या सर्व चीजवस्तू गोळा केल्या असतील. तो निघताना वडाच्या पारंब्यांनी त्याला प्रेमाने कवटाळले असेल. तो देखील त्यांच्या गळ्यात पाडून हमसून हमसून रडला असेल. आता गावात पुन्हा कधी येणं होईल माहिती नाही, या भावनेने तो कोसळून पडला असेल..वटपौर्णिमेच्या रात्रीलाच तो गावातून प्रस्थान करणार होता. त्या रात्रीच्या भयाण प्रहरी मी गावापासून खूप दूर इथे पुण्यात आलो. मात्र इथून देखील ते दृश्य लख्ख स्पष्ट दिसत होतं. बब्रुवाहन आणि भामा, ते दोघेही टेम्पोत सामान घालून निघाले आहेत. त्यात सारं किडूक मिडूकच होतं, पण त्यांच्या स्पर्शाने ते मौल्यवान वाटत होतं. अंधाराच्या रजईवर टिपूर चांदणे पडलेय. सर्वत्र धुवट शुभ्र प्रकाश आहे, झाडे मौन उभी आहेत. चराचर थिजून गेलेय. गावातल्या सर्वात मोठ्या वडाच्या फांद्यात कोवळं चंद्रबिंब गुंतून पडलंय. पारंब्या निर्जीव झाल्यात, वारा स्तब्ध आहे, दूरवर कुठेही चिटपाखराचा आवाज नाहीये..बब्रुवाहन आणि भामाला घेऊन जाणारा टेम्पो गावाबाहेर पडल्याचे पिंगळ्याने एक उदास शीळ घालून वाऱ्याला कळवले. तो दुःखद निरोप वाऱ्याने जड अंतःकरणाने सर्वत्र पोहोच केला. ही खबर वडापाशीही पोहोचली. त्या बातमीने एकाएकी पानांची सळसळ वाढताच, बऱ्याच वेळापासून कशाच्या तरी प्रतीक्षेत, झाडाखाली उभी असलेल्या सफेद हडकुळ्या अशक्त गाईने सर्व शक्तीनिशी अतिशय आर्त हंबरडा फोडला. तिच्या आर्त व्याकुळतेने पारंब्यांतून अश्रू वाहू लागले, झाड गदगदा हलू लागलं. सोसाट्याच्या वाऱ्याने गावकूस हलवून सोडली. गाईच्या हंबरड्याचे प्रतिध्वनी बराच वेळ उमटत राहिले. मंदिराच्या शिखरांना वळसा घालून शेतशिवारात विरले....त्या मरतुकड्या गाईने गेल्या कित्येक वर्षांत कसला म्हणून आवाज केला नव्हता, आज तिने थेट हंबरडा फोडला. त्या सर्व मुक्या जिवांचा सुहृद मैत्र बब्रुवाहन गेला. त्याच्या जाण्याच्या दुःखाने गावालगतच्या परिघातली सृष्टी उन्मळून पडली. गावाचं अस्सल गावपण अशा माणसांत साठून असतं, गावातला गावदेव म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसते हेच तर गावदेव असतात. गावाची सारी गुणलक्षणे शिगोशिग भरलेली ही माणसं हेच खरे निसर्गाशी एकरूप झालेले जीव होत. बाकी सारे रुक्ष व्यवहारिक जग!८३८०९७३९७७(लेखक समाजस्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे साहित्यिक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.