शेती क्षेत्रातील १९ टक्के वित्तपुरवठा (Economy) सहकार संस्थांच्या (Cooperative organization) माध्यमातून केला जातो. तर ३५ टक्के खत वितरण, ३० टक्के खत उत्पादन, १३ टक्के गहू (wheat) आणि २० टक्के धान खरेदी केवळ सहकारी संस्थांकडून केली जाते, अशी माहिती केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी शुक्रवारी दिली. ते बंगळुरू येथील सहकारी संस्थांच्या परिषदेत बोलत होते.
शहा म्हणाले, "जगभरातील ३० लाख सहकारी संस्थांपैकी ९ लाख सहकारी संस्था भारतात आहेत. यामध्ये भारतातील जवळपास 91 टक्के लोक या ना त्या मार्गाने सहकारी संस्थांशी जोडलेली आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील सोसायटीच्या माध्यमातून ७० टक्के शेतकरी जोडलेली आहेत."
"३३ राज्यस्तरीय सहकारी बँक, ३६३ जिल्हास्तरीय बँक आणि ६३ हजार राष्ट्रीय ग्रामीण बँकेचे जाळे देशात निर्माण करण्यात आले आहे. केंद्रीय सहकार खात्याची निर्मिती केल्यामुळे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेता आले. त्यातून सहकार क्षेत्रात पारदर्शकता येईल. ६३ हजार राष्ट्रीय ग्रामीण बँकांच्या संगणकीकरणासाठी २,५०० कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे." अशी माहितीही शहा यांनी यावेळी दिली.
याशिवाय देशातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन करणार आहोत. नाबार्ड, एनडीडीबी आणि मंत्रालयाने तीन वर्षांत अशा दोन लाख नवीन सहकारी संस्था स्थापन करण्याचा नियोजन करण्यात आले आहे, असेही शहा म्हणाले.