Farmer Crisis: पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तीन जिल्ह्यांत जवळपास ३८ दिवसांपासून सार्वत्रिक स्वरूपाचा दमदार पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. या तीन जिल्ह्यांतील सुमारे १५ लाख हेक्टरवरील खरीप पिकांवर पावसाच्या दीर्घ खंडाचा प्रतिकूल परिणाम होत असून, जमिनीतील ओलावा संपल्याने पिकांची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे..या भागात ३० जुलै रोजी सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र अनेक ठिकाणी पावसाने मोठी ओढ दिली आहे. अधूनमधून काही भागांत हलका किंवा स्थानिक स्वरूपाचा पाऊस झाला असला, तरी पिकांना आवश्यक असा व्यापक आणि दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी, पिकांच्या वाढीवर परिणाम होत असून अनेक शेतांमध्ये जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत..Soil Moisture Conservation: रब्बी हंगामासाठी जमिनीतील ओलावा व्यवस्थापन.विशेषतः हलक्या व मध्यम हलक्या जमिनीतील पिकांची परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अशा जमिनीतील ओलावा वेगाने संपल्याने सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिके करपण्याच्या अवस्थेत पोहोचली आहेत. अनेक ठिकाणी पिके वाचण्याची शक्यता कमी होत असल्याचे चित्र आहे. हलक्या जमिनीवरील काही पिके तर जवळपास पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आता पाऊस झाला तरी सोयाबीन पिकाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे..हवामान खात्याच्या उपलब्ध अंदाजानुसार १४ सप्टेंबरपर्यंत या भागात सार्वत्रिक स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे पावसाचा खंड आणखी वाढल्यास पिकांचे नुकसान अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. सध्या उगवणारा प्रत्येक दिवस पिकांसाठी कसोटीचा ठरत असून, शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे..Kharif Distress : पिकांनी टाकल्या माना; चिंता वाढली.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, ते उपलब्ध पाण्याच्या आधारे पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, विहिरी, बोअरवेल आणि इतर सिंचन स्रोतांवरील वाढत्या दबावामुळे त्यांच्यासमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच कृषी पंपांसाठी पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी असूनही वेळेवर सिंचन करणे अनेकांना शक्य होत नाही..आगामी काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास या तीन जिल्ह्यांतील खरीप उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करावे आणि दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत..दृष्टिक्षेपात...अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तीन जिल्ह्यांत जवळपास ३८ दिवसांपासून दमदार सार्वत्रिक पाऊस नाही.सुमारे १५ लाख हेक्टरवरील खरीप पिके संकटात.अनेक भागांत जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून जमिनीतील ओलावा संपला.हलक्या व मध्यम हलक्या जमिनीतील सोयाबीन, कापूस व इतर पिकांची स्थिती गंभीर.आगामी काळात दमदार पाऊस न झाल्यास खरीप उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.