संपादकीय
संपादकीय 
संपादकीय

सेंद्रिय शेतीस मिळेल बळ

विजय सुकळकर

खरे तर सेंद्रिय शेती ही आपली पारंपरिक कृषी पद्धती आहे. हरितक्रांती पूर्वी अर्थात रासायनिक खते, कीडनाशकांचा देशात शिरकाव होण्यापूर्वी सेंद्रिय अथवा नैसर्गिक पद्धतीनेच पिकांचे उत्पादन घेतले जात होते. वाढत्या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी हरितक्रांती गरजेचीच होती. परंतु नंतरच्या काळात अधिक उत्पादनाच्या अपेक्षेने रासायनिक निविष्ठांचा अनियंत्रित वापर सुरू झाला. त्याचे दुष्परिणाम जमीन तसेच मानवी आरोग्यावर सुद्धा होत आहेत. रासायनिक शेती अधिक खर्चाची आणि कमी उत्पादनाची झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक आरोग्य सुद्धा बिघडत आहे. रासायनिक शेतीने मानवी आरोग्य धोक्यात येत असल्याने जागरुक ग्राहकांकडून सेंद्रिय शेतीमालाची मागणी वाढतेय. सेंद्रिय शेती उत्पादक तसेच ग्राहकांची सुद्धा गरज आहे. अशावेळी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळायलाच हवे. राज्यात काही शेतकरी सेंद्रिय शेती करतात. परंतु त्यांना सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान. उत्तम सेंद्रिय निविष्ठा मिळत नाहीत. सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण, शेतीमाल विक्री यातही शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी येथील सिद्धगिरी मठावर केवळ सेंद्रिय शेतीवर संशोधन आणि विस्तार करणारे देशातील पहिले कृषी विज्ञान केंद्र स्थापन झाले आहे. मार्च - २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांस तत्त्वतः मंजुरी दिली होती. त्यानंतर आयसीएआरने मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करून सेंद्रिय शेती कृषी विज्ञान केंद्राचे प्रत्यक्ष काम आता सुरू झाले आहे.

सिद्धगिरी मठावर मागील अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेतीवर काम चालू आहे. त्यांच्याकडे असलेले ६५ एकर शेती क्षेत्र हे सेंद्रिय शेतीची प्रयोगशाळाच आहे. गोशाळेत जवळपास ७०० देशी गायींचे संगोपन केले जाते. त्यात राज्यातील नव्हे तर देशभरातील नामवंत २२ प्रकारचे देशी ब्रीड आहेत. विविध पिकांचे सुमारे २०० वाणांचे देशी बियाणे बॅंकही आहे. सेंद्रिय शेती संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसारासाठीच्या मूलभूत सुविधा तेथे आधीपासूनच आहेत. त्यास मिळालेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या जोडीने या कामांना गती येईल. परिसरात सेंद्रिय शेतीचा प्रसार झपाट्याने होण्यास हातभारही लागले. सेंद्रिय पीक पद्धती विकसित करुन लागवड तंत्राच्या प्रसारासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक प्लॉट घेण्यात येणार आहेत. बहुतांश सर्वच सेंद्रिय निविष्ठा निर्माण करण्याचे प्रशिक्षण इच्छुक शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. शेतकऱ्यांकडे असलेल्या देशी गायी, बियाणे यांचे संवर्धन, संगोपनाचे धडे त्यांना दिले जातील. शेतकऱ्यांनी पीक प्रात्यक्षिक बघितल्यानंतर तसेच एखादे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याचा त्यांच्याकडून प्रत्यक्ष अवलंब करून घेण्यावर कृषी विज्ञान केंद्राचा भर असणार आहे. सेंद्रिय शेती निविष्ठा तसेच उत्पादने प्रमाणीकरण यंत्रणा उभारणीचे नियोजित आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या अशा प्रकारच्या प्रयत्नांमुळे परिसरातील शेतकऱ्यांचा कल सेंद्रिय शेतीकडे वाढणार आहे. परिसरात सेंद्रिय उत्पादने वाढली म्हणजे विक्रीत अडचणी येऊ नयेत म्हणून सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचे या कृषी विज्ञान केंद्राचे नियोजन आहे. उत्पादक कंपनी ग्राहकांच्या गरजेनुसार सेंद्रिय शेतीमाल विक्री अथवा प्रक्रिया करून विविध उत्पादनांचा पुरवठा ग्राहकांना करेल. सेंद्रिय शेती ही कमी खर्चाची, अधिक उत्पादनाची आणि अधिक मिळकतीची आहे, याची खात्री शेतकऱ्यांना पटवून देऊन अशा शेतीस शास्त्रीय आधार आणि प्रोत्साहन देण्याचे काम कृषी विज्ञान केंद्राद्वारे केले जाईल. राज्यात नव्हे तर देशात सेंद्रिय शेतीत आदर्शवत असे काम, याद्वारे होईल, हीच सदिच्छा! 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT