Water Level
Water Level Agrowon
मुख्य बातम्या

Water : ऐन पावसाळ्यात भूजल पातळी खालावली

CD

पुणे : पावसाचा (Rain) तब्बल एक महिना उलटूनही राज्यात अद्यापही दमदार पाऊस (Heavy Rain) झालेला नाही. यामुळे भूजल पातळीत अजूनही वाढ झालेली नाही. त्यामुळे राज्यातील पुणे, सातारा, नंदुरबार, जळगाव, धुळे, अमरावती या जिल्ह्यांतील तब्बल ११४ गावांतील भूजल पातळीत (Ground Water Level) एक मीटरहून अधिक घट झाली आहे. येत्या काळात चांगला पाऊस न झाल्यास ही भूजल पातळी आणखी खोल जाण्याची शक्यता आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे दरवर्षी ऑक्टोबर, जानेवारी, मार्च व मे महिन्यात पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या विहिरींमधील भूजल पातळीचा अभ्यास केला जातो. भूजलाची उपलब्धता मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे सप्टेंबरअखेर राज्यात पर्जन्यमान व ऑक्टोबरमधील भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या जातात. त्याचा सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान व भूजल पातळीत झालेली वाढ अथवा घट यांचा तुलनात्मक अभ्यास करून राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत संभाव्य अनुमान काढले जाते.

गेल्या वर्षी सप्टेंबर २०२१ अखेर ३५५ पैकी २७० तालुक्यांतील ८५ तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत पावसात घट आढळून आलेली होती. पर्जन्यमानाचा थेट परिणाम भूजल पातळीवर होत असल्यामुळे त्याचा परिणाम सप्टेंबर २०२१ अखेर ३६६० निरिक्षण विहिरींद्वारे मोजण्यात आलेल्या भूजल पातळीच्या अभ्यासाआधारे राज्यातील २६८ गावांमध्ये सरासरीच्या तुलनेत १ मीटर पेक्षा जास्त भूजल पातळी खालावलेली आढळली. त्यापैकी १७ गावांमधील भूजल पातळीमध्ये ३ मीटर पेक्षा जास्त घट, ३८ गावांमध्ये २ ते ३ मीटर, तर २१३ गावांमधील भूजल पातळीत १ ते २ मीटर एवढी घट आढळली.

यंदा मार्च २०२२ मधील भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीतील भूजल पातळीशी करण्यात आला. विविध कामासाठी झालेला भूजल उपसा व त्यामुळे भूजल पातळीत झालेला बदल या बाबतची माहिती मार्च २०२२ मध्ये निरिक्षण विहिरींमधील घेतलेल्या स्थिर भूजल पातळीच्या अभ्यासावरून दिसून येते. मार्च २०२२ अखेर निरिक्षण विहिरींमधील भूजल पातळीच्या घेतलेल्या नोंदीची तुलना मागील पाच वर्षांच्या जानेवारीमधील भूजल पातळीच्या सरासरीशी केली असता, राज्यातील एकूण निरिक्षण विहिरींपैकी २९७८ विहिरींमधील भूजल पातळीमध्ये सरासरीपेक्षा वाढ, तर ७२० निरिक्षण विहिरींमधील भूजल पातळीत सरासरीच्या तुलनेत घट आढळून आली. यापैकी १८ निरिक्षण विहिरींतील भूजल पातळीमध्ये ३ मीटरपेक्षा जास्त, ३३ निरिक्षण विहिरींतील भूजल पातळीमध्ये २ ते ३ मीटर, ११९ निरिक्षण विहिरींत १ ते २ मीटर, तर ५५० निरिक्षण विहिरींतील भूजल पातळीमध्ये ० ते १ मीटर एवढी घट आढळून आली.

मार्च २०२२ अखेरील निरिक्षण विहिरींतील स्थिर भूजल पातळीच्या तुलनात्मक अभ्यासाआधारे अवर्षण प्रवण व शाश्वत पर्जन्यमानाच्या ६ जिल्ह्यांतील ९ तालुक्यातील निरिक्षण विहिरींतील भूजल पातळीमध्ये १ मीटर पेक्षा जास्त घट आढळून आली. यामुळे ९ तालुक्यांतील साधारणतः: ११४ गावांमध्ये पाणीटंचाई सदृश परिस्थितीचे निष्कर्ष काढले आहेत.

भूजल पातळी खोल जाण्याची कारणे ः
- पावसाचे स्थळ, वेळ आणि दोन पावसातील खंड
- सिंचनासाठी होणारा अतिउपसा
- नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव
- कमी पर्जन्यमान पर्यायाने कमी भूजल पुनर्भरण
- पर्जन्यमानाची तीव्रता व त्याचा कालावधी


जिल्हानिहाय एक मीटरहून अधिक भूजलपातळी खालावलेल्या गावांची संख्या
जिल्हा --- तालुके --- गावे
अमरावती --- चिकलठाणा ---१
धुळे --- शिरपूर ---२
नंदुरबार --- चोपडा --- ५
पुणे --- आंबेगाव, बारामती, शिरूर, वेल्हे --- ३१
सातारा --- फलटण --- ५६

रब्बी हंगामात व उन्ह्याळ्यात पाण्याचा उपसा अधिक झाला. त्यामुळे पाणीपातळी झपाट्याने खाली गेली. आता पावसाळा सुरू होऊन महिना लोटला आहे. परंतु, अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे भूजल पातळी अजून खालावण्याची शक्यता वाटते.
सी. डी. जोशी, आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

Agrowon Podcast : कांदा भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे दर काय आहेत?

Water Crisis : भूजल पातळी खालावल्याने गिरणा पट्ट्यात जलसंकट

Remuneration of Salgadi : अक्षय तृतीयेला ठरणार सालगड्यांचा मोबदला

SCROLL FOR NEXT