परभणी : येत्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यात २ लाख ८८ हजार १३२ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची उपलब्धता करून देण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. यंदा गहू, हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ तर ज्वारी, करडई पिकांच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. एकूण पेरणी क्षेत्रात १० हजार ७६५ हेक्टरने वाढ प्रस्तावित असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात रब्बी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर आहे. यामध्ये ज्वारीचे १ लाख ५९ हजार ७६, गव्हाचे ३० हजार ४७६, करडईचे २५ हजार २०९, हरभऱ्याचे ५३ हजार ६४, सूर्यफुलाचे ४७९८, मक्याचे ३८४२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
यंदा विविध प्रकल्पांच्या कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रब्बी पेरणी क्षेत्रात १० हजार ७६५ हेक्टरने वाढ होईल, असा अंदाज आहे. एकूण २ लाख ८८ हजार १३२ हेक्टवर पेरणी प्रस्तावित आहे. यात ज्वारीची १ लाख ५६ हजार ६३४, गव्हाची ३८ हजार ४९४, हरभऱ्याची ७९ हजार ४००, करडईची ११ हजार ६२८, सूर्यफुलाची ६१, मक्याची ७१७ हेक्टरवर पेरणी होईल.
यंदाच्या रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने विविध ग्रेडच्या ८५ हजार ४०० टन खतांची मागणी केली होती. त्यापैकी ५६ हजार ४०० टन खत साठा मंजूर झाला आहे. खरीप हंगामातील १२ हजार ७१४ टन खत शिल्लक आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उलपलब्ध व्हावेत, त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने विविध पिकांच्या बियाण्यांची महाबीजकडे १७,१९४ आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे १८,६४२ अशी एकूण ३५ हजार ८३६ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. यात ज्वारीच्या २६६३, गव्हाच्या १७ हजार ७०७, हरभऱ्याच्या ९५००, करडईच्या ३४०, सूर्यफुलाच्या ३ आणि मक्याच्या ४३ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.